

नवी मुंबई : मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, सिडकोच्या अखत्यारितील तारघर, खारकोपर आणि बामणडोंगरी ही तीन महत्त्वाची रेल्वे स्थानके २२ जून रोजी अधिकृतपणे मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आली. या निर्णयामुळे नवी मुंबईतील प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि सुसज्ज सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शिवसैनिकांनी खासदार म्हस्के यांचे आभार मानले आहेत.
मध्य रेल्वे आणि सिडको या दोन्ही प्राधिकरणांमधील अंतर्गत मतभेद आणि एकमेकांकडे बोट दाखवण्याच्या भूमिकेमुळे सामान्य रेल्वे प्रवासी अनेक वर्षे गैरसोयींचा सामना करत होते. ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आजपर्यंत एकही देखभाल करार करण्यात आलेला नव्हता.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नव्हत्या. मात्र, आता स्थानके रेल्वेच्या ताब्यात गेल्यानंतर प्रवाशांना अधिक चांगल्या, दर्जेदार आणि सुसज्ज सुविधा मिळतील. उर्वरित स्थानकांच्या हस्तांतरणाची प्रक्रियाही सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. काही अतिरिक्त जागा, खुल्या जागा आणि त्यांच्या देखभालीसंदर्भातील विषयांवर सध्या चर्चा सुरू आहे. प्रवाशांच्या हिताच्या या निर्णयासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो.
नरेश म्हस्के, खासदार
सिडको भवनात सामंजस्य करार
या निर्णयाच्या पहिल्या टप्प्यात २२ जून रोजी बेलापूर येथील सिडको भवनात आयोजित विशेष बैठकीत सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेदरम्यान मध्य रेल्वेच्या वतीने अभिषेक कुमार गुप्ता (डिव्हिजनल इंजिनिअर-हार्बर), संतोष गुंजन, जी. जवाहरलाल आणि संजय चौरसिया (सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, मुंबई विभाग) उपस्थित होते, तर सिडकोच्या वतीने उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी आणि सहाय्यक अभियंता सी. पितळे उपस्थित होते.