
धनंजय कवठेकर/रायगड
रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जलवाहतुकीसाठी विविध संस्थांना परवानगी देण्यात आलेली आहे. या संस्थामार्फत ज्या प्रवासी बोटी कार्यरत आहेत, त्यांची तांत्रिक आणि प्रवासी सुरक्षा अनुषंगाने तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
नियमानुसार तरतूद नसणाऱ्या बोटींवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. गेट वे मुंबई येथील बोट अपघाताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ज्याज्या प्रवासी बोटींना परवाना देण्यात आला आहे, त्या बोटींमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची तपासणी मेरीटाइम बोर्डकडून करण्यात येत आहे. अनधिकृत व मंजूर प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करीत असलेल्या बोटींवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
प्रत्येक जेट्टीवर बोटीमध्ये किती प्रवासी आहेत, याची नोंद संबंधितांनी ठेवावी असे आदेश दिले आहेत. तसेच प्रत्येक बोटीवर लाइफ जॅकेट, रिंग बोयाज, टॉर्च, प्रथमोपचार पेटी, फ्लोटिंग रोप इ. सुरक्षा साहित्य उपलब्ध आहे, अथवा कसे याची तपासणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र मेरीटाइमच्या तज्ज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी
बोटीवर प्रवेश करतानाच प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट व सुरक्षेच्या सूचना देण्याबाबत संबंधित बोट/फेरी मालकांना देण्यात याव्यात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीवर चढणार नाहीत, याची नियमित तपासणी करण्यात यावी. ऑनबोर्ड तिकीट देण्यास प्रतिबंध करावा, जेणेकरून प्रवासी संख्येवर नियंत्रण करणे शक्य होईल. सर्व प्रवासी बोटींची महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या तज्ज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी करावी, असे निर्देश देखील जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले आहेत.
बोटींवरील सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करा- जिल्हाधिकारी
बुधवारी गेट वे ऑफ मुंबई ते एलिफंटा जलप्रवासाच्या मार्गावर घडलेल्या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रवासी बोटींवरील सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याचे आदेश जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले आहेत.
सदर अपघाताच्या पार्श्वभूमीवर आपल्या तालुक्यातील ज्या ज्या प्रवासी बोटींना प्रवासी वाहतूक परवाना देण्यात आला आहे, त्या बोटींमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याची तपासणी करावी. अनधिकृत व मंजूर प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करित असलेल्या बोटींवर तातडीने नियमोचित कारवाई करावी. प्रत्येक जेट्टीवर बोटीमध्ये किती प्रवासी आहेत, याची नोंद संबंधितांनी ठेवण्याबाबत सूचना द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ऑनबोर्ड तिकीट देण्यास प्रतिबंध करावा.
जेणेकरून बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्येवर नियंत्रण करणे शक्य होईल. सर्व प्रवासी बोटींची महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या तज्ज्ञांमार्फत तांत्रिक तपासणी करून घेण्याच्या सूचना बोट/फेरी मालकाला द्यावी, अशा सूचना सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून संबधित तहसीलदारांना दिल्या आहेत.