एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील फरसबी, भेंडी, गवारीच्या वाढत्या दराने ग्राहक चिंतेत

राज्यातील विविध भागात कमी जास्त प्रमाणात कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका एपीएमसी भाजीपाला मार्केटला
एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील फरसबी, भेंडी, गवारीच्या वाढत्या दराने ग्राहक चिंतेत
ANI
Published on

पावसामुळे नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. तर येणारा मालातील निम्म्याहून अधिक माल पाणी लागल्याने खराब होत असल्याने व्यापारी चिंतेत सापडले आहेत. आवक कमी आणि येणारा मालही काही खराब होत असल्याने मागील ५ दिवसांपासून एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. घाऊक बाजारातच भाज्या ५० ते १०० रुपये किलोपर्यंत महागल्या असून घाऊक भाजीपाला बाजारात फरसबीचे प्रतिकिलोचे दर १२० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. तर भेंडी ८० रुपये, गवारीला ९० रुपये दराने विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

राज्यातील विविध भागात कमी जास्त प्रमाणात कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका एपीएमसी भाजीपाला मार्केटला बसला असून राज्याबरोबर परराज्यातून होणारी भाज्यांची आवकही घटली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी मार्केटमध्ये ६०० हून अधिक गाड्यांची आवक होत होती. मात्र सद्यस्थितीत तीच आवक ४५० ते ५०० एवढी घटली आहे. अशातच राज्यातील कानाकोपऱ्यातून येणारा माल मार्केटमध्ये येईपर्यंत पाणी लागल्याने खराब होत असल्याने व्यापाऱ्यांच्या हाती कमी माल लागत आहे. परिणामी भाज्यांच्या दरात वाढ होत असून ग्राहकांनी देखील दर वाढल्याने पाठ फिरवल्याचे व्यापारी गणेश खोकले यांनी सांगितले. सध्या बाजारात भेंडी, गवार, फरसबी, वांगी आणि पालेभाज्या यांचे दर वाढले आहेत.

भाजीपाला हा माल जास्त काळ टिकत नाही. पाणी लागल्याने हा माल अल्प काळात नाशवंत होतो. यंदाच्या पावसाने मोठ्या प्रमाणात माल खराब होत आहे. त्यात आवकही कमी आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. पावसाचा जोर कायम राहिला तर पुढील दोन महिने दर चढेच राहणार आहेत.

गणेश खोकले, व्यापारी, एपीएमसी भाजीपाला मार्केट

logo
marathi.freepressjournal.in