

नवी मुंबई : नवी मुंबई मनपाला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरण जलाशयामधील पाणीसाठ्यात दैनंदिन घट होत आहे. मोरबे धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १९०.८९० द.ल.घ.मी. इतकी असून, सद्यस्थितीत मोरबे धरणात प्रत्यक्ष १९.११ टक्के इतका उपयुक्त जलसाठा २२ मे अखेर उपलब्ध आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात येत्या २५ मे पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणी बचत करण्यासाठी नवी मुंबईमधील विविध विभागांमध्ये २५ मे पासून आठवड्यातून २ दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बेलापूर विभागात सोमवार आणि गुरुवार (संध्याकाळी), नेरुळ विभागात मंगळवार आणि शनिवार (संध्याकाळी), तुर्भे विभागात बुधवार आणि रविवार (संध्याकाळी), वाशी विभागात गुरुवार आणि सोमवार (संध्याकाळी), कोपरखैरणे विभागात मंगळवार आणि शनिवारी (संध्याकाळी), घणसोली विभागात बुधवार आणि रविवार (संध्याकाळी), ऐरोलीमध्ये दर शुक्रवारी (एमआयडीसी शटडाऊनमुळे) तर दिघा मध्ये एमआयडीसीच्या शटडाऊन वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, सिडको नोडमधील खारघर आणि कामोठे भागात मोरबे धरणातून होणारा पाणीपुरवठा दर शुक्रवारी पूर्णपणे बंद राहणार आहे, असे ‘नमुंमपा'तर्फे सूचित करण्यात आले आहे. धरणात पुरेसा पाऊस पडून पाणीसाठ्यात सुधारणा होईपर्यंत पाणी कपात लागू राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले.