

उरण : नवी मुंबईची ओळख बनलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे हक्काचे ठिकाण असलेला 'डीपीएस' (DPS) तलाव सध्या प्रशासकीय लालफितीत अडकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव मंडळाने एप्रिल २०२५ मध्ये या तलावाला 'संरक्षण राखीव' (Conservation Reserve) दर्जा देण्यास मंजुरी दिली असली, तरी अद्याप अधिकृत शासन निर्णय (जीआर) निर्गमित झालेला नाही. परिणामी, तलावाच्या देखभाल आणि संवर्धनाची कामे ठप्प झाली असून, यंदा फ्लेमिंगोंचे आगमनही लांबणीवर पडल्याची स्थिती आहे. तलावाची सद्यस्थिती चिंताजनक आहे. पाण्याच्या मोठ्या भागावर हिरव्या शैवालाचा जाड थर साचला असून, त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटले आहे. याचा थेट परिणाम जलचर आणि जैवविविधतेवर होत आहे.
सृष्टी कन्झर्व्हेशन फाऊंडेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ मृगांक प्रभू यांच्या मते, सध्या फ्लेमिंगो गुजरातमधील कच्छ परिसरात मुबलक पाण्यामुळे स्थिरावले आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून त्यांची हालचाल मुंबईच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. मात्र, तलावाचा अधिवास खराब राहिल्यास पक्षी दुसरीकडे वळण्याची भीती नवी मुंबई पर्यावरण संवर्धन संस्थेचे संदीप सरीन यांनी व्यक्त केली आहे.
सिडकोचे फलक
दरम्यान, सिडकोने हा परिसर आपल्या अखत्यारित असून तो 'विकासयोग्य भूखंड' असल्याचा दावा कायम ठेवला आहे. हा प्लॉट सिडकोचा असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होईल, असा फलकही परिसरात लावण्यात आला आहे. मॅग्रोव्ह सेलने तलाव स्वच्छतेची मोहीम हाती घेतली होती; मात्र, जीआर प्रलंबित असल्याने आणि मालकी हक्काच्या वादामुळे कामात अडथळे येत आहेत. शासन निर्णय निघेपर्यंत तलावाचा ताबा वन विभागाकडे पूर्णपणे हस्तांतरित होऊ शकत नसल्याची तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.
तलाव असा तुकड्या-तुकड्यांच्या नियंत्रणाखाली राहू शकत नाही. अधिक पर्यावरणीय हानी होण्यापूर्वी तो अधिकृतपणे वन विभागाकडे सोपवणे अत्यावश्यक आहे. 'संरक्षण राखीव' दर्जाचा जीआर तात्काळ जारी करावा.
बी. एन. कुमार, संचालक नॅटकनेक्ट फाऊंडेशन