

राजकुमार भगत/उरण
जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावर सुरू असलेल्या पुरातत्त्व विभागाच्या उत्खननातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बेटावर सुमारे १५०० वर्षांपूर्वीचे, दगड आणि विटांनी बांधलेले एक भव्य ‘टी’ आकाराचे जलकुंड सापडले असून, यामुळे प्राचीन काळातील प्रगत अभियांत्रिकी आणि जलव्यवस्थापन प्रणालीवर प्रकाश पडला आहे. हे कुंड बेटावरील रहिवाशांना वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
घारापुरी बेट हे प्रामुख्याने पाषाणात कोरलेल्या लेण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या पथकाला मोराबंदर परिसरात सापडलेला हा जलाशय खडकात कोरलेला नसून तो दगड आणि विटांच्या सहाय्याने बांधलेला आहे. अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. अभिजित आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू आहे.
डॉ. आंबेकर यांच्या मते, ‘बेटावर पावसाचे प्रमाण अधिक असले तरी खडकाळ जमिनीमुळे पाणी जमिनीत मुरत नाही आणि समुद्रात वाहून जाते. अशा स्थितीत पावसाळ्यानंतरच्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी हे कुंड अतिशय नियोजित पद्धतीने बांधले आहे.’ गुजरात आणि राजस्थानमधील स्टेपवेल्सशी (पायऱ्यांची विहीर) या रचनेचे साधर्म्य आढळते.
या उत्खननात केवळ जलकुंडच नव्हे, तर घारापुरी बेटाचे प्राचीन जागतिक व्यापाराशी असलेले संबंधही स्पष्ट झाले आहेत. या उत्खननात काही महत्वपूर्ण वस्तूंचा शोध लागला आहे.
जलकुंड आयाताकृती
रचनेची वैशिष्ट्ये: हे जलकुंड आयताकृती असून एका बाजूला काटकोनी पायऱ्यांच्या जोडणीमुळे त्याला 'टी' (T) आकार प्राप्त झाला आहे. याची लांबी सुमारे १४.७ मीटर असून रुंदी १०.८ मीटर आहे. आतापर्यंत ५ मीटर खोलीपर्यंत उत्खनन झाले असून, त्यात २० पायऱ्या उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे, या पायऱ्यांसाठी वापरलेले दगड बेटावरील नसून ते बाहेरून आणलेले आहेत.