
नवी मुंबई : वाशी येथे झालेल्या खाटीक समाजाच्या मेळाव्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेले वक्तव्य राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून दिले आहे. मंत्री नाईक यांनी सांगितले की, मी देखील बिबट्याची पिल्ले आणि हरणाची पिल्ले पाळली होती. परंतु वनमंत्री झाल्यावर ही बाब कायदेशीर नाही, म्हणून मी त्यांना सोडून दिले.
या वक्तव्यानंतर बेलापूर विधानसभा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पाटकर म्हणाले की, एखाद्या जबाबदार व्यक्तीने बिबट्याची आणि हरणाची पिल्ले पाळणे हे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या विरुद्ध आहे. जर पिल्ले मिळाली असतील, तर तत्काळ पोलिस किंवा वनविभागाला कळवणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ती स्वतःकडे ठेवून पालनपोषण केले, ही गंभीर बाब आहे. यामध्ये तपास आवश्यक आहे की पिल्ले कुणी आणली होती आणि सध्या ती कुठे आहेत.
शिवसेना नेते किशोर पाटकर म्हणाले की, वनमंत्री झाल्यानंतर 'मी सोडून दिले' असे वक्तव्य करणे, हे बेजबाबदारपणाचे शिखर आहे. त्यांच्या अशा कबुलीजबाबाने चुकीचा संदेश जातो. वेळ पडल्यास मी या प्रकरणात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार, बिबट्या, हरिण यांसारख्या प्राण्यांना बेकायदेशीरपणे पाळल्यास तीन ते सात वर्षांचा कारावास आणि दंड होऊ शकतो.
माझ्या एका सार्वजनिक कार्यक्रमातील संवादातील विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. माझ्याकडे विचारणा केली असती तर मी याबद्दल सविस्तर माहिती दिली असती. मी स्पष्ट सांगू इच्छितो की, माझे वक्तव्य हे केवळ वन्यप्राण्यांबद्दल असलेल प्रेम आणि जिव्हाळ्याचे उदाहरण म्हणून होते. वन्यप्राण्यांची शिकार कोणीही करू नये, त्यांना पाळू नये तसेच त्यांना सोडून द्यावे, यासाठी मी उदाहरण दिले होते. अनेक वेळा शेतात वन्यप्राणी येतात, काही जखमी असतात. अशा वेळेस प्राण्यांवर दयाभाव दाखवून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये सोडून द्यावे. प्राण्यांची योग्य जागा नैसर्गिक अधिवास आहे. माझ्याकडे कधीही कोणत्याही प्रकारे वन्यप्राणी बेकायदेशीररीत्या ठेवले नव्हते. वन्यप्राणी जंगलातच सुरक्षित असतात आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी शासनाने आखलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे, आवश्यक आहे.
गणेश नाईक, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य