

उरण : पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर असणाऱ्या दुष्काळी भागातून मेंढपाळांचा मोठा समुदाय आपल्या हजारो मेंढ्या घेऊन चारा आणि पाण्याच्या शोधात उरण तालुक्याच्या पूर्व भागात दाखल झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे मेंढपाळ कुटुंबाचे अर्थचक्र चालवण्यासाठी काही महिन्यांसाठी उरण परिसरात तळ ठोकणार असून, हिवाळ्यानंतर पुन्हा आपल्या मूळ गावी परत जातील.
पुणे आणि जेजुरी परिसरातील दुष्काळग्रस्त भागातून दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या संख्येने मेंढपाळ रायगड जिल्ह्यात येतात. यंदा पावसाने उशिरापर्यंत हजेरी लावली असली तरी, या मेंढपाळ बांधवांनी आपला पारंपरिक येण्याचा क्रम कायम ठेवला आहे. सध्या हे मेंढपाळ चिरनेर, कळंबुसरे, टाकीगाव, विंधणे, मोठीजुई, कोप्रोली, पिरकोन, सारडे, वशेणी यांसारख्या उरणच्या पूर्व भागातील गावांच्या परिसरात मुक्काम करत आहेत. येथील शेतजमिनी आणि माळरानांवर मुबलक चारा व पाण्याची उपलब्धता असल्याने दरवर्षी या भागात त्यांचा तात्पुरता मुक्काम असतो. मेंढपाळ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतर हा एकमेव मार्ग आहे. त्यांची उपजीविका केवळ मेंढ्यांवर अवलंबून नसून, ते स्थानिक शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचे ठरतात. शेतकरी आपल्या शेतात मेंढ्या बसविण्यासाठी मेंढपाळांना काही धान्य आणि रोख रक्कम देत असत. मेंढ्यांनी शेतात मुक्काम केल्याने पिकांसाठी नैसर्गिक खत मिळते आणि जमीन कसदार होते. यामुळे शेतकरी व मेंढपाळ यांचे एक पारंपरिक आणि परस्परपूरक संबंध आजही या भागात टिकून आहेत. यंदा मात्र पाऊस उशिरापर्यंत झाल्यामुळे, ज्या शेतात पिके कापून झाली आहेत, तेथेही पाणी साचलेले असल्याने मेंढ्यांना बसविण्यासाठी अडचण येत आहे.
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतर
घाटमाथ्यावर चारा-पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इकडे यावे लागते. या भागात आमच्या मेंढ्यांना भरपूर चारा आणि पाणी मिळते. शिवाय शेतात मेंढ्या बसविल्याने शेतकऱ्यांकडून धान्य व पैसेही मिळतात, असे एका मेंढपाळाने सांगितले.