

नवी मुंबई : सीबीडी परिसरातील गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणी तब्बल ११ महिन्यांनंतर अमली पदार्थ विरोधी पथकाच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
गुरुनाथ चिचकर यांची दोन्ही मुले धीरज आणि नवीन यांची नावे 'हायड्रा गांजा' तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये समोर आल्यानंतर चिचकर यांची चौकशी सुरू होती. या चौकशीच्या ताणाला कंटाळून त्यांनी २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. माथाडी कामगार ते राजकीय नेते आणि विकासक असा प्रवास केलेल्या चिचकर यांचा शहरातील राजकीय वर्तुळात दबदबा होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या मुलांनी परदेशात राहून हायड्रा गांजाची तस्करी करणारे रॅकेट उभारले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाकडून चिचकर यांच्यावर सतत चौकशीचा ताण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आत्महत्येपूर्वी चिचकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत "एनसीबीने चौकशीसाठी बोलावले असून आता सहन होत नाही," असे नमूद करत आईची माफी मागितली होती. तसेच, त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावेही त्यांनी चिठ्ठीत लिहिल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, सुरुवातीला गुन्हा नोंद झाला नव्हता.