राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. यामुळे अनेक ठिकाण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरलं आहे. काही ठिकाणी पुलावर पाणी आल्याने गावांशी संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून नागिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच काम सुरु आहे. पुराच्या पाण्यामुळे ज्यांच्या घराचं नुकसान झालं त्यांना दहा हजाराची मदत तर ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालं त्यांना ५० हजारांची आर्थिक मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, कोल्हापूर, रायगड या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे.
कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाण्यासह उपनगरात तसंच नवी मुंबईत देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. मागील २४ तासांत नवी मुंबई महानगरपालिका परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. या परिसरात शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपासून ते शनिवार सकाळी 8.30 वाजेपर्यंत सरासरी 59.91 मिमी पाऊस झाला. नवी मुंबई महापालिका हद्दीत सर्वाधिक पाऊस ऐरोली प्रभागात ७६.२० मिमी एवढा झाला. तर बेलापूरमध्ये ६२.४ मिमी पाऊस झाला. तसंच नागरी कार्यक्षेत्रात झाड पडण्याच्या दोन घटना घडल्या. तसंच एक ठिकाणी शॉर्ट सर्किट झाल्याची घटना देखील घडली. दरम्यान, मुंबईत जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक भागात अजूनही पाऊस सुरु आहे.
राज्यातील अनेक भागात सुरु असलेल्या अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच हवामान खात्याने रेड आणि ऑरेंज अलर्ट केलेल्या भागातील नागिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलं आहे.