
नवी मुंबई :आपल्या जेवणाची चव वाढवणारी हिरवी मिरचीने आपल्या महागाईचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. एरवी ५० रुपये किलोने मिळणारी हिरवी मिरची १६० रुपये किलोवर पोहचली आहे. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने मिरचीची दरवाढ झाली आहे, असे एपीएमसीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमधून हिरवी मिरची एपीएमसी, वाशीला येते. यंदा जोरदार पाऊस झाल्याने मिरचीचे पीक खराब झाले. त्यामुळे मिरचीचा पुरवठा कमी झाला आहे. वातावरण सुधारल्यानंतर व नवीन पीक येऊ लागल्यावर हिरव्या मिरचीचे दर कमी होऊ शकतील. सध्या किरकोळ बाजारात मिरची १३० ते १८० रुपये किलोने विकली जात आहे.
३१ जुलैला बाजारात ७ ट्रक व ३० टेम्पो हिरवी मिरची आली. दर सोमवारी बाजारात भाज्यांची आवश्यक जास्त असते. तर अन्य दिवशी भाज्यांची आवक कमी असते. टोमॅटोच्या दरात अजूनही घट झालेली नाही. टोमॅटो अजूनही १५० रुपये किलोने विकले जात आहेत.
३१ जुलैला एपीएमसी बाजारात टोमॅटोचे ७ ट्रक व २६ छोटे ट्रक आले. टोमॅटोची सरासरी खरेदी किंमत ९५ रुपये प्रति किलो होती. मुंबई, नवी मुंबईची टोमॅटोची रोजची मागणी ३०० टन आहे. सातारा, नाशिकमधून टोमॅटोची आवक होत असते. सध्या बाजारात येणाऱ्या टोमॅटोचा दर्जा खराब आहे. परिस्थिती सुधारायला आणखी महिना जाणार आहे.