

नवी मुंबई : न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी केवळ १८ वर्षाखालील मुले बेपत्ता झाल्यास पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेत होते. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांवरील कुठलाही प्रौढ व्यक्ती बेपत्ता झाल्यास त्यासंदर्भात तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांना कसून शोध घेण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण व कठोर आदेश जारी केले आहेत. या नव्या नियमाची तत्पर अंमलबजावणी करत नवी मुंबई पोलिसांनी पहिलावहिला गुन्हा दाखल केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, कोणत्याही बेपत्ता व्यक्तीची माहिती मिळताच तत्काळ गुन्हा दाखल करावा, असे आदेश यापूर्वी २२ मे २०२६ रोजी सर्व राज्यांना आदेश दिले होते.
नवी मुंबईत पहिली ऐतिहासिक कारवाई
या नव्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी करत नवी मुंबईतील एन.आर.आय. सागरी पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर रोजी रात्री भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील तक्रारदाराचा मुलगा चीन सीमेवर कार्यरत आहे. त्यांची २३ वर्षीय सून पतीसोबत फोनवर झालेल्या वादानंतर घरातून निघून गेली. पती सीमावर्ती भागात कार्यरत असल्याने सुनेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या नवीन आदेशाचे पालन करत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून वेगाने तपासाला सुरुवात केली आहे.