नवी मुंबई : वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबईतील वकिलांनी राहुरी येथे वकील दाम्पत्याच्या हत्येचा निषेध करीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. तसेच सदर घटनेची राज्य गुन्हे अन्वेषण मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे राजाराम आढव आणि मनीषा आढव यांचे २५ तारखेला अपहरण झाले होते. त्यांचे शव गावातील स्मशानभूमीतील एका विहिरीत आढळून आले. स्थानिक पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणी काही जणांना अटक केली आहे. आढव दाम्पत्याचा ५ लाखांच्या खंडणीसाठी छळ करून प्लास्टिक पिशवीच्या साह्याने गुदमरून ठार करण्यात आले.
या घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईतील वकिलांनी वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. यावेळी सदर तपास राज्य गुन्हे अन्वेषण मार्फत करावा तसेच महाराष्ट्रामध्ये वकील संरक्षण कायदा परीत करावा अशी मागणी करण्यात आली. अशी माहिती नवी मुंबई बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुनील मोकल यांनी दिली. यावेळी ॲड. ज्ञानेश्वर श्रीमंत कवळे, ॲड. मुरलीधर पाटील, ॲड. अजिंक्या गव्हाणे, ॲड. राजकिरन वसंत सोनार, ॲड. अनुषा अरविंद शेटे यांच्यासह अनेक वकील उपस्थितीत होते.