स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आदिवासी वाड्यांवर प्रकाश

उरणमध्ये अनेक केंद्राचे जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल त्यावर आधारित छोटे छोटे प्रकल्प निर्माण आहेत
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आदिवासी वाड्यांवर प्रकाश

उरण : इतिहास प्रसिद्ध चिरनेर गावाच्या ग्रामपंचायत हद्दीतील चांदायल वाडी या आदिवासी वाड्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर पहिल्यांदा वीज पोहचली आहे. आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नानंतर महावितरणने आदिवासींच्या जीवनातील कित्येक वर्षांचा अंधार संपवला आहे. या वाड्यांवर लाइटची व्यवस्था नसल्याने तेथील कुटुंबांना अंधारात जीवन जगावे लागत होते.

चिरनेर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जवळपास पाच आदिवासी वाड्या वास्तव्य करीत आहेत. या वाड्यांना अनेक समस्यांना ग्रासले आहे. पाणी समस्या रस्त्याची समस्या या कायमस्वरूपी त्यांच्या वाट्याला आहेत. परंतु चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील ३५ कुटुंब आणि जवळजवळ ९० मतदाते असणाऱ्या चांदायली आदिवासी वाडीवर स्वातंत्र्याचा पंचहत्तरीनंतरही अंधारात जीवन जगावे लागते होते.

आज उरणचा विकास झपाट्याने होत आहे. उरणमध्ये अनेक केंद्राचे जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल त्यावर आधारित छोटे छोटे प्रकल्प निर्माण आहेत, अनेक गोदामे वसली आहेत. सिडको अनेक प्रकल्प निर्माण करत आहेत. शिवडी-न्हावा सारखा प्रकल्प, अलिबाग- विरार सारखा मल्टी मॉडलं प्रकल्प निर्माण होत आहे. मात्र या सर्व प्रकल्पांच्या जवळ असणाऱ्या चिरनेरच्या चांदायली आदिवासी वाडीतील बांधवांना स्वातंत्र्याचा पंचहत्तरीनंतररही वीज पोहचलेली नव्हती. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन, तसेच अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. आदिवासी बांधवांनी उत्तम प्रकारचे शिक्षण घेतले पाहिजे त्यांचे जीवन उंचावले पाहिजे. मात्र तसे या चांदायली वाडीवर होताना दिसत नाहीत. दिवस भर मोलमजुरी केल्यानंतर त्यांना रात्र ही आंधरातच काढावी लागत होती. आदिवासी बांधवानी देखील या नववर्षाची सुरूवात घरामध्ये विजेच्या रोषणाईने केली. नुकतेच मराविविमं सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्या उपस्थितीत खारघर येथे झालेल्या बैठकीत आमदार महेश बालदी यांनी, प्रत्येक आदिवासी वाडी, पाड्यांना लवकरात लवकर वीज पोहोचली पाहिजे अशी आग्रही मागणी करत वन विभागाच्या परवानग्या तसेच इतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती.

आमच्या वाडीत लाइट आम्हाला कधीच बघायला मिळाली नाही, मात्र महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे आणि महावितरण, वनविभाग यांच्या सहकार्यामुळे आमच्या घरात वीज पोहचली आहे. उशिरा का होईना, आम्हाला वीज मिळाली याचा आम्हाला आनंद आहे.

-भरत कातकरी, चांडायली वाडी आदिवासी

logo
marathi.freepressjournal.in