Navi Mumbai : ऐरोलीतील मराठी भाषा भवन उपकेंद्र कागदावरच; ५ वर्षांत भूखंडावर अद्याप एकही वीट रचली नाही

नवी मुंबई ऐरोली येथील मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी २०२१ साली ३ हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड सिडकोकडून सरकारला देण्यात आला.
Navi Mumbai : ऐरोलीतील मराठी भाषा भवन उपकेंद्र कागदावरच; ५ वर्षांत भूखंडावर अद्याप एकही वीट रचली नाही
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई ऐरोली येथील मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी २०२१ साली ३ हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड सिडकोकडून सरकारला देण्यात आला. मात्र, अद्याप त्या भूखंडावर भाषा भवनाचे उपकेंद्र बांधण्यात आलेले नाही. याबाबत मनसेनेचे राज्य प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

ऐरोलीत मराठी भाषा आणि संस्कृतीचा विकास, संवर्धन आणि जतन व्हावे म्हणून हे उपकेंद्र महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातर्फे बांधण्यात येणार होते. या उपकेंद्राच्या इमारतीमध्ये मराठी भाषा संचालनालय, विश्वकोश महामंडळ इत्यादी कार्यालये सुरू होणार होती सोबतच सभागृह, बालविभाग, जेष्ठ नागरिकांसाठी दालन सुरू करण्याचा सरकारचा मानस होता.

कोटींचे बजेट मंजूर, पण परिस्थिती ‘जैसे थे’च

२६ कोटींचे बजेट मंजूर होऊनही अजून राज्य सरकारला भूमिपूजनासाठी वेळ नाही ही बाब अत्यंत दुःखद आहे. नोव्हेंबर २०२२ ला येऊन मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषा विभागाचे आणि महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत या भुखंडाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी पुढच्या ८ दिवसात मुख्यमंत्री आणि मराठी साहित्यिकांना घेऊन या मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन होईल, असा जाहीर शब्द माध्यमांसमोर दिला होता; मात्र, त्यानंतर ३ वर्षे लोटली तरी परिस्थिती जैसे थेच आहे, असे मनसेने म्हटले आहे.

उद्घाटन करा, नाहीतर प्रतीकात्मक भूमिपूजन केले जाईल

किमान मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्व संध्येला तरी राज्य सरकारला जाग येईल आणि अधिवेशन संपण्याअगोदर या उपेकेंद्राचे उद्घाटन करावे अशी मागणी मनसेने केली आहे. आमदारांनीही याबाबत अधिवेशनात सरकारला प्रश्न विचारावे. अन्यथा लवकरच या भूखंडावर मनसे प्रतीकात्मकरित्या भूमिपूजन सोहळा करावा लागेल, असा इशारा मनसेने दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in