

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात २८ जूनअखेर मोरबे धरणात अवघा १७.८६३ द.ल.घ.मी. (९.३६%) पिण्यायोग्य जलसाठा शिल्लक आहे. आता या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कंबर कसली आहे. हा साठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविणे आणि पुढील वर्षाचे नियोजन करणे या उद्देशाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा विभागाचा सविस्तर आढावा घेऊन महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन विभाग स्तरावर तातडीने ‘मायक्रो प्लॅनिंग’ करून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. शहरात १०% पाणी कपात लागू करण्यात आली आहे.
गृहनिर्माण संस्थांमध्ये जलतरण तलाव, बागा आणि वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णपणे बंद केले आहे. येत्या ५ दिवसांत शहरातील सर्व विहिरी आणि बोअरवेल्सची स्वच्छता करून त्या सुरू केल्या जातील. तेथे सौरऊर्जेवर आधारित पंपिंग सिस्टीम आणि आर.ओ. प्रणाली बसवली जाईल. व्यावसायिक ग्राहकांसाठी २०% पाणी कपात बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल.
महापालिकेच्या तृतीय स्तरीय प्रक्रिया केंद्रातून रोज उपलब्ध होणारे ५२.५० द.ल.लि. पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरले जाईल. सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांमध्ये १००% प्रक्रियाकृत पाणी किंवा विहिरींचे पाणी वापरणे बंधनकारक असेल. बांधकाम व्यावसायिक आणि मोठ्या सोसायट्यांना त्यांच्या उद्यानांसाठी हे पाणी टँकर फिलिंग पॉइंट्सद्वारे उपलब्ध करून दिले जाईल.
पाण्याचा अपव्यय झाल्यास फोन करा
शहरात कुठेही पाण्याचा अपव्यय किंवा अनधिकृत वापर होत असल्यास जागरूक नागरिकांनी तत्काळ १८००२२२३०९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.