नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आश्वासन दिले आहे. मातोश्रीवर प्रकल्पग्रस्त नेत्यांची आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबतच निर्णय घेण्यात आला आहे. स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाला होकार दिला आहे. तसेच त्यांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला माझा विरोध कधीच नव्हता, असे यावेळी स्पष्ट केले.
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव पुढे आला होता. त्यामुळे यावरुन मोठा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. मात्र, मंगळवारी प्रकल्पग्रस्त नेत्यांसह आगरी-कोळी, कुणबी समाजातील नेत्यांनी २४ जून रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्त नेत्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केली. तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी ठाणे आणि रायगड जिल्ह्यामधील प्रकल्पग्रस्तांच्या भावनेचा विचार करुन नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली होती.
सदर बैठकीप्रसंगी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, प्रकल्पग्रस्त नेते राजाराम पाटील, ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, एम. व्ढो. मढवी, रोहिदास पाटील, शहरप्रमुख प्रविण म्हात्रे, माजी नरसेवक सोमनाथ वास्कर, करण मढवी, चेतन नाईक, संजय तरे, उपशहरप्रमुख सुर्यकांत मढवी, दीपक घरत, आदींसह रायगड आणि नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते.