हत्येनंतर मनपाला आली जाग, उड्डाणपुलाखालील बेघरांवर कारवाई
नवी मुंबई : रविवारी पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास सीबीडी शहाबाज गावात असणाऱ्या उड्डाणपुलाखाली एका ६५ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संशयित आरोपीस उपस्थित लोकांनी चोप दिल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेनंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सोमवारी सकाळपासून त्यांनी शहरातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, या निराश्रित यांच्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नवी मुंबईत सीबीडी शहाबाज गाव, सी वुड्स, कोपरखैरणे महापे, सानपाडा, वाशी अशा विविध उड्डाणपुलाखाली निराश्रित भिकाऱ्यांची वस्ती असते. सी वुड्स येथील उड्डाणपुलानजीक एक मोठा मॉल असून येथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या भिकाऱ्यांचा प्रचंड त्रास होत असतो. यापूर्वीही भिकाऱ्यांवर कारवाई करताना मनपाचे अतिक्रमण पथक आणि पोलिसांवरही दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र मनपाने ठोस कारवाई केली नव्हती.
उड्डाणपुलाखाली आश्रय घेणे दिवसभर चौकात भीक मागून गुजराण करणे असा दिनक्रम त्यांचा असतो. मात्र रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून अनेक जण धिंगाणा घालून आरडाओरडा केल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त होतात. मात्र कारवाई बाबत पोलीस प्रशासन आणि मनपा एकमेकांच्याकडे अंगुलीनिर्देश करत असल्याचे चित्र आहे.
मात्र रविवारी शहाबाज गावातील उड्डाणपुलाखाली झोपलेल्या ६५ वर्षीय प्रकाश लोखंडे यांच्या डोक्यावर दगड घालून हत्या अभिषेक पाल नावाच्या व्यक्तीने केली. या घटनेने मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
"उड्डाणपुलाखाली राहणारे हे भारतीय नागरिक आहेत. त्यांना राहण्यासाठी बेलापूर येथे जागा करून देण्यात आलेली आहे. आता अन्य जागेचा शोध मनपा घेत आहे. अशा लोकांसाठी अजून काही ठिकाणी रात्रनिवारा करून देण्याबाबत मनपा लवकरच ठोस निर्णय घेणार आहे." - डॉ. कैलास गायकवाड (अतिक्रमण उपायुक्त)