

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विविध वाहतूक साधनांशी जोडले जाणार असून येथे किमान चार मेट्रो मार्गिकांचे पॅसेंजर इंटरचेंज विकसित केले जाणार आहेत. याशिवाय हे विमानतळ कुर्ला स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मानखुर्द येथील आंतरराज्य बस टर्मिनसशीदेखील जोडले जाईल, अशी माहिती सोमवारी विधानपरिषदेत देण्यात आली.
विधान परिषदेत या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात लेखी उत्तर सादर केले. ते म्हणाले, २९ मार्चपासून या विमानतळावरून ७६ देशांतर्गत विमान फेऱ्या सुरू होतील, ज्यामध्ये कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांचाही समावेश असेल.
नवी मुंबई मेट्रो मार्गिका ८ चा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार असून केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी २० टक्के व्हायबिलिटी गॅप फंडिंग या प्रकल्पाला मिळणार आहे.
मुंबई, नवी मुंबईतील प्रवास अधिक वेगवान होणार
विमानतळावरील प्रवाशांवर विनाकारण आर्थिक भुर्दंड पडत आहे किंवा नागरी सुविधांचा अभाव आहे, असे दावे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फेटाळून लावले. आमदार सत्यजित तांबे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सध्या विमानतळ जोडणीचे काम वेगाने सुरू असून आगामी काळात मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास अधिक वेगवान करण्याचा सरकारचा विचार असल्याचे लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.
इंटरचेंज सुलभता उपलब्ध
मेट्रो मार्गिका ८ द्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर प्लॅटफॉर्म स्तरावर एकत्रीकरण केले जाईल. यामुळे ही मार्गिका मेट्रो ७ आणि ३ शी जोडली जाईल. या व्यतिरिक्त मेट्रो मार्गिका ४, मेट्रो २-बी आणि प्रस्तावित नवी मुंबई मेट्रो मार्गिका १-ए सोबत प्रवाशांना अदलाबदल करण्यासाठी इंटरचेंज सुलभता उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.