

नवी मुंबई : मान्सूनपूर्व कामांतर्गत रस्ते दुरुस्ती, पदपथ बांधकाम आणि खड्डे बुजविण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिका मार्फत सुरू असतानाच, महावितरण विभागाकडून वारंवार होणाऱ्या खोदकामामुळे या कामांचे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी उपमहापौर दशरथ भगत यांनी आयुक्तांकडे केली आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथ आणि इतर मालमत्तांवर विनापरवानगी खोदकाम करून तोडफोड केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेने नुकतीच दुरुस्ती केलेली कामे काही दिवसांतच पुन्हा उकरून टाकली जात असल्याने लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे.
यासोबतच, काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वस्थिती न राखल्याने शहराच्या सौंदर्यावर परिणाम
होत असून विकासकामांच्या गतीतही अडथळे निर्माण होत आहेत. संबंधित विभागांकडे केबल्सचे नकाशे व अचूक माहिती नसल्याने कामादरम्यान केबल डॅमेज होण्याच्या घटनाही वाढत असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात महावितरण विभागाला अनेकदा पत्रव्यवहार करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच, परवानगीपेक्षा जास्त केलेले नुकसान पूर्ववत करून द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
पालिकेची परवानगी न घेता शहरात मनमानी पद्धतीने खड्डे खोदणे, पदपथ तोडणे आणि अनियमितपणे केबल टाकणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शहराचे सौंदर्य बाधित होतेच, शिवाय मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान दरवर्षी होत आहे. हे त्वरित थांबले पाहिजे.
दशरथ भगत, उपमहापौर