

नवी मुंबई : नवी मुंबईत विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळाच्या आधारे अनेक महिलांची फसवणूक केल्या प्रकरणी अटक असणाऱ्या आदर्श म्हात्रेचे धक्कादायक कारनामे समोर येत आहे. म्हात्रेच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत असून आतापर्यंत त्याच्या विरोधात राज्यभरातून १५ पेक्षा अधिक गुन्हा दाखल आहेत.
विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर स्वतःचे प्रोफाइल लोड करून त्या द्वारे लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या कडून पैसे उकळत होता. या यादीत तिशीच्या पुढील महिला, गर्भश्रीमंत महिला, उच्च शिक्षित, अधिकारी डॉक्टर, इंजिनियर, पोलीस आदी महिलांचा समावेश असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
१० वी पास असलेल्या आदर्शने विवाह जुळवणाऱ्या विविध संकेत स्थळावर स्वप्नील वारुळे, नहुष म्हात्रे, जयेश नाईक तन्मय म्हात्रे, जयेश पाटील, रुपेश गोवेकर, हेमंत गायकर, रुद्रेश गोधळी, जयेश सोनवणे या नावाने प्रोफाइल लोड केले. यात शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी श्रीमंत असल्याची थाप मारत होता. महिलांना भेटण्यासाठी जाताना महागडया गाड्या घेऊन जात होता. त्याच्या विरोधात १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
त्याच्या जाळ्यात ७८ महिला अडकल्या असायचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्या समाजातील बदनामीच्या भीतीने समोर येत नसल्याने पोलिसही हतबल झाले आहेत.
गुन्हे पद्धत
आदर्श हा विवाह जुळवणाऱ्या संकेत स्थळावर प्रोफाइल लोड करायचा. एखादी महिला जाळ्यात अडकली कि तिला आलिशान हॉटेलमध्ये घेऊन जात होता. अनेकांशी त्याने शरीर संबंध प्रस्थापित केले. अचानक एखाद्या दिवशी कुठले तरी गंभीर कारण सांगून १५/२० लाखांची मागणी करत होता. त्या महिलेने पैसे दिले कि संपर्क कमी करत होता. एखाद्या महिलेने फारच तगादा लावला तर दुसऱ्या महिलेकडून घेऊन त्यातील थोडेफार रक्कम देत होता.
सहा पेक्षा अधिक विवाह जुळवणाऱ्या संस्थांना पोलिसांनी बोलावून मार्गदर्शन केले. कुठलीही प्रोफाइल लोड करण्यापूर्वी त्याची तपासणी करण्याचे सूचित केले. शिवाय आदर्श म्हात्रे हा विविध नावांनी , बनावट कागदपत्रा लोड करत होता. मात्र फोटो एकाच होता. हे तुम्हाला कसे कळलं नाही अशीही विचारणा करण्यात केली.
प्रत्येक कागदपत्रे तपासा
विवाह जुळवणाऱ्या संकेत स्थळावर आपण विवाह जुळवत असाल तर प्रत्येक गोष्टीची खात्री करून घ्यावी. आदर्श म्हात्रे याने स्वतः शास्त्रज्ञ , पी डब्ल्यू डी मध्ये उच्च पदस्थ अधिकारी असल्याची थाप मारत ओखपत्र जोडले होते. त्याची खात्री उच्च शिक्षित असणाऱ्या एकही महिलेने केली नाही परिणामी फसवणूक झाली. यासाठी प्रत्येक कागदपत्र तपासून खात्री करून घ्यावी, असे आवाहन तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.