नवी मुंबई पालिकेने अर्थसंकल्पात करवाढ करू नये; आमदार गणेश नाईक यांची सूचना

रोली-कटाई उन्नत मार्गावर ठाणे-बेलापूरच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिकांचे निर्माण करण्यासाठी निधी राखीव ठेवण्याची सूचना केली आहे.
नवी मुंबई पालिकेने अर्थसंकल्पात करवाढ करू नये; आमदार गणेश नाईक यांची सूचना

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने २०२४- २५ च्या अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षे कोणताही मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढवू नये, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सन २०२४-२०२५चा अर्थसंकल्प महापालिका लवकरच सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात शहर विकास, सोयीसुविधा आणि भविष्यकालीन गरजा पाहता आमदार गणेश नाईक यांनी मौलिक सूचना केल्या आहेत.

नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. लोकप्रतिनिधी मंडळ अस्तित्वात नाही. या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी वेळोवेळी नवी मुंबईकरांच्या हिताचे अनेक निर्णय प्रशासनाकडून मंजूर करून घेतले आहेत. आमदार गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार नवी मुंबईकरांवर मागील २४ वर्षे कोणताही करवाढीचा बोजा लादण्यात आलेला नाही. मागील वर्षी प्रशासकीय काळात देखील करवाढ करण्यात आली नव्हती. यापुढेही हा करदिलासा सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्ताकडे केली आहे.

ऐरोली-कटाई उन्नत मार्गावर ठाणे-बेलापूरच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिकांचे निर्माण करण्यासाठी निधी राखीव ठेवण्याची सूचना केली आहे. त्याच बरोबर नाला व्हिजन अंतर्गत कामांना गती देण्यासाठी निधीची तरतूद करण्याची सूचना केली आहे. सर्वच नोडमध्ये सार्वजनिक रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालयांच्या निर्मितीसाठी निधी ठेवावा.

महापालिका शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भरीव निधी ठेवावा. अत्याधुनिक पद्धतीने घनकचऱ्याची व्यवस्था करण्यासाठी निधीची तरतूद करावी. शहराला जोडणारा कोस्टल रोडसाठी निधी राखीव ठेवावा. कांडोनियम अंतर्गत कामे करण्यासाठी निधीची तरतूद करावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही योजना दोन प्रभावीपणे राबविण्यासाठी निधी राखीव ठेवावा, अशा मौलिक सूचना करून आमदार नाईक यांनी पालिकेचा आतापर्यंतचा कारभार आर्थिक शिस्तीचा राहिल्याने पालिकेला डबल ए प्लसचे आर्थिक मानांकन प्राप्त झाले आहे.

पुढील काळात मोठे प्रकल्प करताना डेफर पेमेंट आणि बॉण्ड्स या आर्थिक सोयीचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी पालिका प्रशासनाला दिला असून यामुळे अर्थसंकल्पावर भार पडणार नाही.सोयीसुविधांवर भरीव तरतुदीची मागणी नवी मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येला पुरेल इतका

पाणीसाठा भविष्यात लागणार आहे. नवी मुंबईची भविष्यकालीन पाण्याची गरज भागवण्यासाठी भिरा हायड्रो एक हजार एमएलडी पाणी योजना आमदार गणेश नाईक यांनी सुचवली असून या योजनेसाठी देखील बजेटमध्ये भरीव तरतूद करण्याची सूचना त्यांनी केली आहे. शहरातील अंतर्गत दळणवळण उत्तम राहून सुरळीत वाहतुकीसाठी नाईक यांनी सिटी मोबिलिटी प्लॅनची संकल्पना मांडली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असून या अंतर्गत शहरात आवश्यक ठिकाणी त्यांनी उड्डाणपूल बांधण्याची सूचना केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in