

नवी मुंबई : राज्यातील भरती परीक्षा पद्धतीच्या विविध बाबींचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीच्या माध्यमातून विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, तज्ज्ञ तसेच संबंधित घटकांशी संवाद साधून त्यांची मते, अनुभव व सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. कोकण विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, तज्ज्ञ तसेच भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित घटकांनी आपले अनुभव व रचनात्मक सूचना समितीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी केले आहे.
भरती परीक्षा प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका तयार करणे व त्यांची सुरक्षित हाताळणी, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, परीक्षेची सुरक्षितता व विश्वासार्हता, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, विविध यंत्रणांमधील समन्वय, उमेदवारांशी संवाद व तक्रार निवारण तसेच परीक्षा प्रक्रिया अधिक सुलभ व उमेदवाराभिमुख करण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा समितीमार्फत अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग म्हणून समिती राज्यातील महसूल विभागांमध्ये प्रत्यक्ष सल्लामसलत करणार आहे.
या बैठकीमध्ये विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित यंत्रणा, विषयतज्ज्ञ तसेच इतर संबंधित घटकांना आपले अनुभव, अपेक्षा आणि सूचना मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित महसूल विभागामार्फत विभागीय सल्लामसलतीची दिनांक, वेळ, स्थळ व सहभागाची प्रक्रिया स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
अनुभवी सूचनांना महत्त्व
भरती परीक्षा पद्धती अधिक व्यापक, पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवातून मिळणाऱ्या सूचनांना विशेष महत्त्व आहे. कोकण विभागातील विद्यार्थी, उमेदवार, संस्था आणि तज्ज्ञांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या रचनात्मक सूचना समितीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी केले आहे.
इथे पाठवा सूचना
कोकण विभागासाठी सूचना व अभिप्राय konkanexamreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात. भरती परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी संबंधितांनी आपल्या अनुभवांच्या आधारे वस्तुनिष्ठ व रचनात्मक सूचना मांडाव्यात, असेही आवाहन विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी केले आहे.