

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या २४ तासांत हत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. रबाळे एमआयडीसी, एपीएमसी आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या तीन घटना घडल्या असून, किरकोळ वादापासून ते पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यापर्यंतच्या गुन्हेगारांच्या क्रूरतेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे.
दिघा येथील इलठणपाडा परिसरात सोमवारी पहाटे २.३० च्या सुमारास पंढरीनगर येथील पोटभरे चाळीत राहणारा सोनराज सुरेश शिंदे (३०) याची त्याच्याच ओळखीच्या लोकांनी निर्घृण हत्या केली.
आरोपी कुणाल उर्फ घनश्याम चौधरी याने घराचे नवीन बांधकाम करून बाहेर शिडी लावली होती. याच शिडीच्या वादातून आरोपीने त्याचे इतर ४ मित्र (कुणाल राठोड, वैभव मोरे, महिंद्र नारायणकर आणि आकाश लाड) यांना बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून सोनराजला घेराव घातला आणि प्रथम लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
किरकोळ वादातून मजुराची फरशीने मारून हत्या
वाशी येथील एपीएमसी मसाला मार्केट परिसरात १२ एप्रिल रोजी राधे किशन उर्फ मोदी या मजुराची हत्या करण्यात आली. आरोपी सिद्धार्थ महादेव म्हस्के आणि राधे किशन उर्फ मोदी यांच्यात साकुरा सायन्स प्रा. लिमिटेडसमोर अज्ञात कारणावरून वाद झाला. या वादातून ही हत्या झाली.
महिलेची हत्या करून मृतदेह जाळला
पनवेल तालुक्यात चिंचवली आणि वाकडी गावाच्या सीमेजवळ राजमाती वनविभागाच्या जंगलात एका अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अज्ञात आरोपीने महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ टाकून तिचा मृतदेह जाळून टाकला. पोलीस पाटील महादु पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी तपास पथके स्थापन केली.