Navi Mumbai : कचऱ्यातून उजळणार नशिबाचे अक्षर; १३ रणरागिणींची शिक्षणाकडे झेप!

पहाटेच्या धुक्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून उपजीविका शोधणाऱ्या महिला आणि दुपारी वही-पुस्तकं हातात घेऊन वर्गात बसलेल्या विद्यार्थिनी हे चित्र आज नवी मुंबईत वास्तव बनले आहे. स्त्री मुक्ती संघटनेने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू केलेल्या 'स्लम मॉडेल' मधून उभ्या राहिलेल्या कचरा वेचक महिलांचा हा प्रवास आता थेट दहावीच्या (SSC) बोर्ड परीक्षेपर्यंत पोहोचला आहे.
Navi Mumbai : कचऱ्यातून उजळणार नशिबाचे अक्षर; १३ रणरागिणींची शिक्षणाकडे झेप!
Navi Mumbai : कचऱ्यातून उजळणार नशिबाचे अक्षर; १३ रणरागिणींची शिक्षणाकडे झेप!
Published on

नवी मुंबई : पहाटेच्या धुक्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून उपजीविका शोधणाऱ्या महिला आणि दुपारी वही-पुस्तकं हातात घेऊन वर्गात बसलेल्या विद्यार्थिनी हे चित्र आज नवी मुंबईत वास्तव बनले आहे. स्त्री मुक्ती संघटनेने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू केलेल्या 'स्लम मॉडेल' मधून उभ्या राहिलेल्या कचरा वेचक महिलांचा हा प्रवास आता थेट दहावीच्या (SSC) बोर्ड परीक्षेपर्यंत पोहोचला आहे. वर्षानुवर्षे शिक्षणापासून दूर राहिलेल्या या महिलांपैकी १३ जणी यंदा दहावीची परीक्षा देत आहेत. ही केवळ परीक्षा नसून आयुष्याला कलाटणी देण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेले पाऊल असल्याची भावाना नगरिकांमार्फत व्यक्त होत आहे.

स्त्री मुक्ती संघटनेने नवी मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांमध्ये महिलांचे संघटन उभारून 'स्लम मॉडेल' सुरू केले. मॉडेलमधील शेकडो महिला घरोघरी जाऊन ओला-सुका कचरा संकलन करतात. त्याचे या प्रकल्प केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या सर्वांगीण विकासाकडे वळला आणि त्यातूनच शिक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला. वर्गीकरण करून खतनिर्मिती केली जाते. या उपक्रमामुळे महिलांना नियमित उत्पन्न मिळाले. मात्र हा प्रा. वृषाली मगदूम यांच्या पुढाकाराने दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू झाली. सुरुवातीला २५ महिला पुढे आल्या, मात्र अखेर १३ जणींनी सर्व अडचणींवर मात करत परीक्षा देण्याचा निर्धार कायम ठेवला. बहुतेकांचे शिक्षण १५ ते २० वर्षांपूर्वी सुटले होते. लग्नानंतर नाव बदलणे, काहींचे सिंगल पॅरेंट असणे, कागदपत्रांची कमतरता यामुळे फॉर्म भरण्यापासून बोर्ड नोंदीपर्यंत अनेक अडथळे आले. पण सर्व अडचणींवर मात करत अखेर त्यांच्या नावांची बोर्डात अधिकृत नोंद झाली. सुरुवातीची भीती आणि संकोच आता आत्मविश्वासात बदलला आहे. स्त्रीमुक्ती संघटनेमुळे आम्हाला ही संधी मिळाली आहे; तिचे सोने करू, असा ठाम विश्वास या महिलांनी व्यक्त केला. दहावीनंतर काहीजणी पुढील शिक्षण, काही समाजकार्य, तर काही आपल्या - मुलांसाठी मार्गदर्शक होण्याचे स्वप्न पाहत आहेत. फक्त कचरा वेचक म्हणून नाही, तर शिकलेल्या, आत्मनिर्भर महिला म्हणून जगायचे आहे, हा त्यांचा समान सूर आहे.

सकाळी काम, नंतर वर्ग

इतकी वर्षे शाळेपासून दूर असलेल्या महिलांना शिकवायचे कसे, अभ्याससाहित्य कुठून आणायचे, मार्गदर्शन कोण करणार असे प्रश्नही उभे राहिले. प्रभात ट्रस्टचे प्रशांत थोरात यांनी शैक्षणिक साहित्य पुरवले. समन्वयक आशा गायकवाड यांच्या पुढाकारातून प्रशांत गाडेकर, अजित खताळ, अशोक गालवे, आशा पाटील, निशा राठोड, सचिन आमडोस्कर, पल्लवी घारगे, मधुकर वारभुवन या शिक्षकांनी अध्यापनाची जबाबदारी स्वीकारली. आज कोपरखैरणे येथील स्त्रीमुक्ती संघटनेच्या इमारतीत त्यांचे नियमित वर्ग भरतात. सकाळी घरकाम, त्यानंतर कचरा संकलन आणि दुपारी थेट वर्ग असा त्यांचा दिनक्रम आहे. सुरुवातीला काहींना कुटुंबाचा विरोध झाला, मात्र त्यांची जिद्द पाहून कुटुंबीयही हळूहळू पाठीशी उभे राहिले. एका महिलेची मुलगी स्वतः दहावीत असून ती रोज आईचा अभ्यास घेते, हे चित्र अनेकांना प्रेरणा देणारे आहे.

या महिला फक्त परीक्षा देत नाहीत, त्या समाजाला धडा देत आहेत. शिक्षणासाठी ना वय अडथळा असतो, ना परिस्थिती. कचऱ्यातून कागद वेचणाऱ्या हातांनी आज वही उचलली आहे, हीच खरी क्रांती आहे.

प्रा. वृषाली मगदूम, विश्वस्त स्त्री मुक्ती संघटना

चित्रपटातून मिळाली उभारी

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला 'आता थांबायचं नाही' हा मराठी चित्रपट या महिलांना दाखवण्यात आला. त्या चित्रपटातील संघर्षात त्यांना स्वतःचे प्रतिबिंब दिसले आणि 'आपणही शिकू शकतो आपणही दहावी देऊ शकतो' हा विचार प्रथमच ठामपणे त्यांच्या मनात रुजला. या महिलांपैकी बहुतांश महिलांच्या मनात लहानपणी शिकण्याची तीव्र इच्छा होती. मात्र दारिद्रय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लहान वयातच कामावर जावे लागल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट सुटले. कुणी सातवीत, कुणी आठवीत, तर कुणी नववीत शाळा सोडली. त्यानंतर लग्न, संसार आणि जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला आणि शिक्षणाची पाटी अपूर्णच राहिली.

logo
marathi.freepressjournal.in