

पेण : पेण-खोपोली मार्गावरील भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मोठा खड्डा पडलेला होता. रिक्षाचालकाने तो टाळण्याचा प्रयत्न करत वाहन डावीकडे वळवले. मात्र, त्या ठिकाणी कोणताही संरक्षक कठडा किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्याने रिक्षा थेट भोगावती नदीच्या पात्रात कोसळली. या अपघातात एकनाथ किसन किंजवडे (५३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर भूषण पाटील (रा. कराडे, पो. रसायनी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
स्थानिकांचा संताप
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली. संबंधित रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वारंवार तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या पेण शाखेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एका व्यक्तीचा जीव वाचवता आला नाही. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.