वाशी एपीएमसी बाजारात प्रतिदिन हजारो वाहनातून शेतमाल दाखल होतो. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या वाहनांना आज पार्किंग व्यवस्था नाही. एक ट्रक टर्मिनस होता त्या जागेत ही सिडकोच्यावतीने गृहसंकुल उभारण्यात येत आहे. बाजारात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे बाजार आवाराच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांना बेकायदा पार्किंग कारवाई होतात. बाहेर उभ्या वाहनांमधून शेतमाल चोरीला जाणे, बाजार आवारात स्वच्छतेचा अभाव तसेच शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे वेळेवर न मिळणे आदी समस्या आज उद्भवत आहेत. या सर्व समस्यांचा पाढा शनिवारी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याजवळ वाचला. यावेळी या मांडलेल्या समस्या बाजार समिती तसेच शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन राजू शेट्टी यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांना दिले.