नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील नालेसफाईत कशी बनवाबनवी केल्याचा भंडाफोड शिवसेना (उबाठा) पक्षाने शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही केला.
ऐरोली परिसरातील नाल्यांची सफाई करण्यात आल्यानंतरही या नाल्यांमध्ये गुडघ्यापर्यंत गाळ असल्याची पोलखोल शिवसेनेच्या रणरागिणींनी नाल्यात उतरून केली. नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदार धूळफेक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नवी मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नवी मुंबईतील नाल्यांची सफाई पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने १६ मे ही डेडलाइन दिली होती. मात्र ही डेडलाइन संपून आठवडा उलटला असला तरी शहरातील नालेसफाई व्यवस्थित झाली नाही. ठेकेदारांनी फक्त दर्शनी भागातील नाले साफ करून बाकीच्या नाल्यांमध्ये कचरा तसाच ठेवला आहे. शिवसैनिकांनी काल तुर्भे एमआयडीसीतील नालेसफाईचा पंचनामा केल्यानंतर शुक्रवारी ऐरोली आणि घणसोलीमधील नालेसफाईची पोलखोल केली. उपशहर संघटक मंजू म्हात्रे, माजी नगरसेविका नंदा काटे आणि उपविभागप्रमुख शैलेश फणसे यांनी ऐरोलीतील सेक्टर ३ मधील नाल्यामध्ये उतरून ठेकेदाराची बनवाबनवी उघड केली. या नाल्यात साफसफाई नंतरही गुडघ्यापर्यंत गाळ आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभा प्रमुख अतुल कुळकर्णी, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत मढवी, संतोष घोसाळकर, एकनाथ दुखंडे, विजय पाटील, आशा काळे, नीता केणी, मंदार परब आदी उपस्थित होते.