

राजकुमार भगत/ उरण
नवी मुंबईतील उलवे परिसरात रस्त्यांच्या डिव्हायडरवर उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरांबाबत ‘नवशक्ति’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश नगरविकास विभागाला दिले असून, या वादग्रस्त प्रकल्पाची अधिकृत छाननी सुरू झाली आहे.
उलवे येथील रहिवासी व नागरिक संघटनांनी डिव्हायडरवर टॉवर उभारण्याच्या कामाविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण नगरविकास विभाग-२ चे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. गोविंद राज यांच्याकडे वर्ग केले आहे.
कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था न ठेवता भर रस्त्यात टॉवर उभारण्याच्या पद्धतीला विरोध आहे. पारदर्शकता न ठेवल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
संतोष काटे, अध्यक्ष उलवे युनिट राष्ट्रवादी काँग्रेस
प्रशासकीय यंत्रणा सक्रिय
‘नवशक्ति’ने उलवे परिसरातील सुमारे २० ठिकाणी रस्त्यांचे डिव्हायडर खोदून मोबाईल टॉवर उभारले जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. या कामामुळे सार्वजनिक सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या वृत्तामुळे प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणार आहे.