

पेण : उन्हाच्या कडाक्यानंतर पहिल्या पावसाची जशी सर्वांनाच प्रतीक्षा असते, तशीच मांसाहारी खवय्यांना पहिल्या पावसात मिळणाऱ्या वळगणीच्या ‘चिवनी’ मच्छीचीही आतुरता असते. रायगड जिल्ह्यात ही मच्छी केवळ पहिल्या पावसानंतर साधारण २० ते २५ दिवसच उपलब्ध होत असल्याने बाजारात तिची मोठी मागणी असून, चांगला भावही मिळत आहे.
समुद्र आणि खाड्यांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यात पापलेट, सुरमई, बांगडा, मांदेली, बोंबील, कोळंबी यांसारखे मासे वर्षभर उपलब्ध असतात. मात्र, पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने समुद्रातील मोठ्या माशांचा पुरवठा कमी होतो. बाहेरून येणाऱ्या माशांचे दरही वाढतात. पहिला पाऊस पडताच खाड्यांना उधाण येते आणि त्यानंतर चिवनी मच्छी मोठ्या प्रमाणात दिसू लागते. कोळी बांधव तसेच स्थानिक तरुण खाडी परिसरात उक्षी लावून ही मच्छी पकडतात.
यंदा मागील वर्षाच्या तुलनेत चिवनीचे उत्पादन कमी झाल्याची माहिती मासे विक्रेती विठाबाई म्हात्रे यांनी दिली. चिवनी मच्छीचे कालवण तसेच तळलेली मच्छी भाकरी आणि भातासोबत विशेष चविष्ट लागते. त्यामुळे स्थानिक खवय्यांसह रायगड जिल्ह्यात येणारे पर्यटकही या हंगामी मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात.
अल्प कालावधीसाठीच उपलब्ध
पावसाळ्यात चिवनी बहुतेक वेळा अंड्यांनी (गाभोळीने) भरलेली असते. लहान चिवनी मच्छीचा एक वाटा साधारण २०० ते ३०० रुपये दराने विकला जातो, तर मोठी आणि गाभोळी असलेली चिवनी ४०० ते ५०० रुपये दरानेही ग्राहक आवर्जून खरेदी करतात. अल्प कालावधीसाठीच उपलब्ध होत असल्याने या मच्छीला मोठी मागणी असते.