
राजकुमार भगत/उरण
गेल्या काही वर्षांत उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास सुरू झाला आहे. तालुक्यात ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल यासारखे मोठ मोठे प्रकल्प आणि जेएनपीटीच्या अनुषंगाने निर्माण झालेले मोठमोठे गोदामे यामुळे या परिसरात नोकऱ्या आणि रोजगाराच्या संध्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. या विकासामुळे उरण तालुक्यात नागरीकरण देखील झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरिकरण, औद्योगिकी करणासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी मात्र तालुक्यातील नागरिकांना दुसऱ्या तालुक्यांवर अवलंबून राहावे लागत आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील नागरिकांवर नवीन पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
उरण तालुक्यात पाण्याचे स्रोत हे खूप कमी आहेत. तालुक्यात एमआयडीसीचे मध्यम आकाराचे रानसई धरण आणि जलसंपदा विभागाचे पुनाडे धरण हे दोनच पाण्याच स्रोत आहेत.
उरण तालुक्यात झपाट्याने नागरिकरण वाढत आहे. मागील वर्षीपासून उरण तालुक्यात रेल्वे लोकल देखील सुरू झाली आहे. न्हावा-शिवडी अटल सेतू यामुळे मुंबई थेट उरण तालुक्याशी जोडली गेल्याने उरणमध्ये आणखी शहरीकरण वाढणार आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या विकासाच्या अनुषंगाने तालुक्यात आणखी पाण्याचे स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे.
उरणमध्ये इतर धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तो कमी पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे स्थानिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भास आहे.
रोज ५० ते ६० एमएलडी पाण्याची गरज
उरण तालुक्याला सध्याच्या स्थितीत रोज ५० ते ६० एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र रानसई धरण आणि पुनाडे धरणाची क्षमता तेवढी नाही. रानसई धरणाची पाणीसाठा साठवण्याची क्षमता १० एमसीएम एवढी आहे तर पुनाडे धरणाची क्षमता जेमतेम १.७५ एमसीएम एवढी आहे. या दोन धरणांच्या पाणीसाठ्यावर अवलंबून राहिल्यास तालुक्याला फक्त ३ ते ४ महिनेच पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडकोचे हेटवणे धरण आणि एमजेपीचे बारवी धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते.
पाणीपुरवठ्याचा तपशील
हेटवणे धरणातून उरणच्या पूर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, भोम, मोठीजूई, कोप्रोली, खोपटे, विंधणे, दिघोडे, वेश्वी, चिर्ले, जांभूळपाडा, गावठाण तर द्रोणागिरी नोड आणि करंजा या भागाला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणातून जेएनपीटी वसाहत आणि जेएनपीए बंदराला पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणातून २० ग्रामपंचायती, ओएनजीसी, एनएडी, जीटीपीएस, बीपीसीएल, जीटीपीएस वसाहती असे मिळून रोज ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तर पुनाडे धरणातून पूर्व भागातील १० गावांना पाणीपुरवठा केला जातो.
पाण्याचे स्रोत वाढविण्याची गरज
सध्या सिडकोतर्फे आणि म्हाडातर्फे मोठमोठे गृह प्रकल्प उभे करण्यात आले आहेत, तर खासगी बिल्डरांकडून देखील टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. रेल्वे सुरू झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात नागरिक राहण्यासाठी सुरूवात झाली आहे. सिडको आणि म्हाडाच्या इमारतीतील घरे अगोदरच बुक करण्यात आली आहेत. तालुक्यात नदी नाही, मोठे धरण नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र काळाची गरज ओळखून डोंगर कपारीत, लहान सहान पाणवठे तयार करून पाण्याचे स्रोत वाढविण्याची गरज आहे. अन्यथा पुढचा भविष्यकाळ अंधारमय आहे.