संपादकीय: काँग्रेसच्या १३८ व्या वर्धापनदिनानिमित्ताने

राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा समारोप करताना म्हणाले होते, लोकांचे खऱ्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप धार्मिक विद्वेषाचा शस्त्रासारखा वापर करतो आहे.
संपादकीय: काँग्रेसच्या १३८ व्या वर्धापनदिनानिमित्ताने

- प्रसाद माधव कुलकर्णी

भारतातील सर्व राजकीय पक्षांमध्ये स्वातंत्र्य आंदोलनाचे मध्यवर्ती नेतृत्व केलेला व स्वातंत्र्यानंतरही सक्रिय असलेला, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक नेते-विचारवंत देणारा, सर्वात जुना-जाणता, सर्वाधिक काळ रुजलेला व जनाधार मिळवलेला, सर्वाधिक काळ सत्तास्थानी राहिलेला, भारताच्या सर्वांगीण विकासात मौलिक स्वरूपाची भागीदारी केलेला, भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावणारा आणि विरोधकांना काँग्रेसमुक्त भारताचे ‘दिवास्वप्न ‘पाहू देणारा, पण त्यात तथ्यांश नाही हे कालांतराने त्यांनाच सिद्ध करायला लावणारा जर कोणता पक्ष असेल तर तो ‘काँग्रेस‘ आहे. सत्ताधारीवर्ग कोणताही मूळ प्रश्न गांभीर्याने घेत नाही. त्याबाबत बोला असे म्हटले की विरोधकांचे घाऊक निलंबन करून सभागृहात मनमानी केली जाते. हे चित्र बदलायचे असेल तर काँग्रेसने खऱ्या अर्थाने तळागाळात शिरून ओठात आणि पोटात हुकूमशाही असणाऱ्यांचा बुरखा फाडला पाहिजे. त्याचबरोबर इंडिया आघाडीचे (इंडियन नेशनल डेवलपमेंटल इनक्लूसिव अलायंस) नेतृत्व सजगपणाने करण्याची नितांत गरज आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीचे ढोल सध्या वाजत आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजीच्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते यात शंका नाही. इतिहासात कधी नव्हे एवढ्या विकलांग अवस्थेत आज काँग्रेस आहे हे खरे आहे. पण देशाला प्रगतीपथावर नेण्याचे, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उंचावण्याचे काम काँग्रेसने केले हे नाकबुल करता येत नाही. व्यक्तीला धर्म आहे पण राष्ट्राला धर्म असणार नाही हा धर्मनिरपेक्ष भूमिकेतील खरा संदेश राहुल गांधी यांनी गतवर्षी भारत जोडो यात्रेमधून दिला होता हे लक्षात घेतले पाहिजे. कार्यकर्त्यांचा होत असलेला वैचारिक गोंधळ दूर करणे आणि पक्षाची विचारांवर आधारित बांधणी करणे हे आज काँग्रेसचे अग्रक्रमाचे कर्तव्य आहे.

राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा समारोप करताना म्हणाले होते, लोकांचे खऱ्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप धार्मिक विद्वेषाचा शस्त्रासारखा वापर करतो आहे. २४ तास हिंदू-मुस्लिम विभागणी करून द्वेष पसरवला जातो आहे. याला काही वृत्तवाहिन्या देखील खत पाणी घालतात. या यात्रेचे उद्दिष्ट भारताला जोडण्याचे आहे. माध्यमे आमचे मित्र आहेत. पण आमचे म्हणणे पुरेसेपणे ती मांडत नाहीत. पण आपण त्यांच्यावर चिडायचे नाही. लाखो लोकांना भेटल्यावर मला हेच जाणवले की हा देश एक आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती या सर्व लोकात परस्परांबद्दल प्रेमच आहे. सगळ्या देशात द्वेष पसरला आहे असे मला वाटत होते. पण प्रत्यक्षात मी चालायला लागलो तेव्हा वस्तुस्थिती समजली. प्रत्येक जण परस्परांवर प्रेम करत असल्याचे दिसून आले. या देशातील विमानतळे, बंदरे, रस्ते, उद्योगधंदे, शेती हे सारे सध्या सत्ताधीशांच्या मालकांच्या खिशात आहे. आज देशात नरेंद्र मोदींचे नव्हे तर अंबानी, अदानींचे सरकार आहे. हे दोघे मोदी यांचेही मालक आहेत. खरेतर राहुल गांधी भारत जोडो यात्रेत भारतात तीव्र झालेले महागाई, बेरोजगारी, लघु मध्यम उद्योगांचे बंद होणे, रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन, देशाला बुडवून फरार होणारे लुटारू, अडचणीत आलेली बँकिंग व्यवस्था, शेती क्षेत्रापुढील आव्हाने, नवे केलेले कायदे, स्वायत्त संस्थांचा मनमानी वापर, नोटाबंदी ते जीएस्टीचे चुकीचे निर्णय, वाढती धर्मांधता, परधर्म द्वेष, आंतरराष्ट्रीय राजकारणातील चुकीच्या भूमिका अशा अनेक मुद्यांवर भाष्य करत होते. भाजप, त्याचे समर्थक आणि अंधभक्त यातील एकही मुद्याबाबत बोलणार नाहीत हे उघड आहे. उलट ते विकृत टीका करण्यात धन्यता मानतात. पण स्वत:ला काँग्रेसचा कार्यकर्ता मानणाऱ्यानी या मुद्यावरून वातावरण सतत तापवत ठेवले पाहिजे. याचे भान या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठेवले पाहिजे. देश प्रेमाच्या, अहिंसेच्या, सत्याच्या विचारांनी जोडला जात असतो. चाटूगिरी, फेकुगिरी आणि फोटुगिरीनी नाही हे दाखवून द्यावे लागेल.

काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न कर्झनपासून आजपर्यंत अनेकांनी बघितले व बघत आहेतही, पण ते फळाला आले नाही वा येऊ शकणार नाही. कारण कोणीही, कितीही टीका केली तरी काँग्रेस पक्ष हा सर्वसामावेशक अशा अस्सल भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. ती हिटलर, मुसोलिनीचा आदर्श मानणारी संकुचित वंश – वर्णवादी, परधर्माला दुय्यम नागरिकत्व देऊ पाहणारा संकुचित विचार मांडणारी संघटना नाही हे भारतीय जनतेने पिढ्यानपिढ्या अधोरेखित केले आहे. काँग्रेसला अनेक चढ – उतार अनुभवावे लागले हे जितके खरे तितकेच काँग्रेस कधी लाटेवर स्वार झाली नाही. त्यामुळे तिला लौकर ओसरण्याचीही काळजी करावी लागली नाही हेही तितकेच खरे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना जागृत करून,संघटित करून ब्रिटिशांच्या राजकीय व आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठविण्याचे एक मिशन म्हणून काँग्रेसने भूमिका बजावली. म्हणूनच काँग्रेसची स्थापना व वाटचाल भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासातील एक महत्वाची घटना ठरते. स्वातंत्र्यापूर्वी ६२ वर्षे आणि स्वातंत्र्यानंतरची ७६ वर्षे काँग्रेस कार्यरत आहे. देशाच्या विकासात या पक्षाचे योगदान मोठे आहे. काहीजण हे नाकारतात हा राजकीय कृतघ्नपणा आहे. काँग्रेसने अनेक चुका केल्या आणि त्याची अनेकदा किंमतही मोजली.

काँग्रेसवर वारंवार जहाल टीका झाली पण काँग्रेसने विरोधकांना देशद्रोही ठरवत तशी पदवी वाटप करणाऱ्या पक्षशाखा गावोगावी काढल्या नव्हत्या. मात्र अलीकडे ‘सरकारवर टीका केली म्हणजे राष्ट्रद्रोह नव्हे’ हे न्यायालयाला सांगावे लागावे अशा अवस्थेला देश पोहोचला आहे हे वास्तव आहे. काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या, अनेक राज्ये जिंकली पण एक दोन निवडणूका जिंकून आपण म्हणू तीच पूर्वदिशा,जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणे,सर्व स्वायत्त संस्थांचे व्यक्तीगतिकरण करणे,अनाकलनीय व लोकद्रोही तुघलकी निर्णय प्रक्रिया अवलंबणे,भांडवलदारांची उघड उघड तळी उचलून त्यांना राव व कामगार,शेतकरी,कष्टकरी जनतेला रंक करणारी धोरणे आखणे यासारख्या अनेक बाबतीत कमालीची सक्रियता काँग्रेसने दाखवली नाही. पं. जवाहरलाल नेहरूंपासून ते डॉ.मनमोहनसिंग यांच्या पर्यंतच्या कोणाही पंतप्रधानांना आपले नाव कापडातच विणलेला दसलाखी सूट घालायची ओंगळ प्रसिध्दीलोलुप मानसिकता दाखविण्याची गरज वाटली नव्हती. अथवा सतत कॅमेरा पुढे ठेऊन प्रतिमा निर्माण लादण्याची गरज वाटली नाही.भावनिक आवाहने व सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भरमसाठ आश्वासने देऊन नंतर तो चुनावी जुमला होता असे म्हणण्याची गरज काँग्रेसला सत्तेच्या राजकारणासाठी वाटली नाही. भले अनेक पराभव झाले, काही निर्णय चुकले तरी काँग्रेसवर देशाचा विकासदर वेगाने खाली आणला. शून्याच्याही खाली नेला व उणे २५ केला असा आरोप नव्हे तर वास्तविक आकडेवारी दाखवूनएवढ्या वर्षात कोणाला सिद्ध करता आले नाही.

आत्ता मात्र जीडीपी मोजण्याची पद्धत बदलूनही गेल्या पंच्याहत्तर वर्षातील सर्वात वाईट आर्थिक संकटात देश आहे. त्यात काँग्रेसचाच हात आहे असे म्हणता येणार नाही. उलट काँग्रेसच्या काळात उभारलेली सार्वजनिक क्षेत्रे विकून टाकली जात आहेत. भाषणात आम जनतेच्या कळवल्याची भाषा आणि भांडवलदारांच्या कल्याणाची निर्णयपद्धती हा कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे. शेतकरी कायदे चर्चेविना केले आणि चर्चेविना मागे घेतले यावरून सारे दिसून आले आहे. आज काँग्रेसने व्यापक प्रमाणात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून जनतेशी नाळ अधिक घट्टपणे जुळवणे गरजेचे आहे. तशा शक्यतांचे अवकाश परिस्थितीने तयारही केले आहेत. भारत जोडो यात्रेने तशी जमीन तयार केली आहे नेते व कार्यकर्ते यांच्यातील अंतर कमी कमी करत आणण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात निवडणुकीच्या गणितात दारुण आलेले अपयश आणि सत्ताच्युत होण्याचे वाढते प्रमाण यामुळे सुस्तावलेल्या व धास्तावलेल्या पक्ष कार्यकर्त्यांत विश्वास निर्माण करण्यासाठी कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याची नितांत गरज आहे. ब्रिटिशांकडून मिळवलेल्या स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी व कर्तव्य काँग्रेसचेच आहे याचे भान ठेवून काँग्रेसने वाटचाल अधिक सक्षम केली पाहिजे.

भारतातील विविध जाती – धर्म – पंथातील सर्व सर्वसामान्य माणसाचा विकास साधणारी व त्याचे स्वत्व जपणारी व त्यातून एकता मजबूत करणारी धोरणात्मक भूमिका काँग्रेसला पुन्हा एकदा जनमानसात रुजवावी लागतील. ती केवळ त्या पक्षाची नव्हे तर या वैविध्याने नटलेल्या व संकुचिततेला नाकारणाऱ्या देशाचीही गरज आहे. तसेच भाजपेतर अन्य जे राज्यघटना मानणारे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याशी सहमतीचे राजकारणही पुढे नेण्याची गरज आहे. एक सुव्यवस्थित राजकीय व्यवस्थापन करूनच काँग्रेसला वाटचाल करावी लागेल. काँग्रेसच्या या १३८ व्या वर्धापनदिनी एक मध्यममार्गी पक्ष म्हणून भरभरून शुभेच्छा.

दृष्टिक्षेप

काँग्रेस पक्ष आपला १३८ वा वर्धापन दिन २८ डिसेंबर २०२३ रोजी साजरा करत आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेस हा मध्यवर्ती व मुख्य प्रवाह होता. तसेच डावे आणि समाजवादी गटही होते. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष गतवर्षी पूर्ण झाले. स्वातंत्र्यानंतर तयार झालेल्या भारतीय राज्यघटनेने आता अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्यआंदोलनातील योगदानाचा आणि इंग्रजांनी सर्वार्थाने खिळखिळा केलेला भारत स्वातंत्र्यानंतर कसा उभा केला हे अभिमानाने सांगण्यासारखा वसा व वारसा काँग्रेस पक्षाकडे नक्कीच आहे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनीचे कार्यकर्ते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in