अन्सारी-भाजप संघर्षाला हेरगिरीची झालर

गुप्तचर यंत्रणेकडे दिल्याच्या या पत्रकाराच्या खुलाशावरून अन्सारी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले
अन्सारी-भाजप संघर्षाला हेरगिरीची झालर

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पाकिस्तानी पत्रकाराला भारतात बोलवून भारतीय संरक्षण व्यवस्थेसंबंधातली कागदपत्रं सुपूर्द केल्याचा आरोप भाजपने केला. ही कागदपत्रं पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडे दिल्याच्या या पत्रकाराच्या खुलाशावरून अन्सारी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. भाजप आणि अन्सारी यांच्यातील वाद नवीन नाही; मात्र ते पुन्हा एकवार सप्रमाण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा याने पाहुणे म्हणून भारतात येऊन हेरगिरी केल्याच्या दाव्यावरून माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पुन्हा भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. पाकिस्तानी पत्रकाराने हमीद यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरून भाजपने अन्सारी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. अन्सारी यांनी आपल्या कार्यकाळात पाकिस्तानी पत्रकाराला पाच वेळा भारतात बोलावलं. यावरून भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी अन्सारी यांच्याबरोबरच काँग्रेसच्या तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या धोरणांपुढेही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलं. अन्सारी यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले असले, तरी त्यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे. या वादावरून परराष्ट्र मंत्रालय, उपराष्ट्रपतींचं कार्यालय, त्यांच्या कार्यपद्धती, बाहेरच्या देशांमधल्या लोकांना भारतात बोलावण्याचे नियम आदींचीही चर्चा सुरू झाली आहे. अन्सारी यांनी आणि भाजप आणि मीडियाचा एक भाग आपल्याविरोधात खोटं पसरवत असल्याचा आरोप केला आहे. भाजपकडून अन्सारी यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. उपराष्ट्रपतीपदावर असतानाही नरेंद्र मोदी सरकारशी त्यांचे संबंध चांगले नव्हते. अन्सारी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात आपण कधीही पाकिस्तानी पत्रकाराला फोन केला नाही किंवा भेटलो नाही, असं स्पष्ट केलं आहे. अन्सारी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, भारताचे उपराष्ट्रपती या नात्याने परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय त्या वेळच्या सरकारचा होता.

११ डिसेंबर २०१० रोजी अन्सारी यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि मानवाधिकार या विषयावरील न्यायवैद्यक परिषदेचं उद्घाटन केलं होतं. सहसा अशा संमेलनातील पाहुण्यांची यादी आयोजकांकडून तयार केली जाते. भाजपच्या अन्य एका आरोपाबाबत अन्सारी म्हणाले की, इराणमधील भारताच्या राजदूताचं काम सरकारच्या माहितीत आहे. मी देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे आणि त्यावर वक्तव्य करण्यापासून स्वतःला नेहमीच दूर ठेवतो. भारत सरकारकडे सर्व माहिती आहे आणि तेच सत्य सांगू शकतं. इराणमधला माझा कार्यकाळ रेकॉर्डवर आहे. यानंतर मला न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचा स्थायी सदस्य बनवण्यात आलं. माझ्या कामाचं देशात आणि जगात कौतुक झालं आहे. अन्सारी यांचं असं म्हणणं असलं, तरी आता काँग्रेसचं त्या वेळचं सरकार अडचणीत आलं आहे. भारतात एखाद्याला पाहुणे म्हणून निमंत्रण देताना त्याची पार्श्‍वभूमी गुप्तचर विभागाकडून तपासली जात नव्हती का, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतर सलग दोन पूर्ण टर्म भारतातलं दुसरं सर्वोच्च घटनात्मक पद भूषवण्याची संधी अन्सारी यांनी मिळाली. २०१७ मध्ये संपलेल्या त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या तीन वर्षांमध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार होतं. अन्सारी यांनी आपल्या ‘बाय मेनी अ हॅप्पी अॅक्सिडेंट: रिकलेक्शन्स ऑफ अ लाइफ’ या पुस्तकात लिहिलं आहे की, राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी गदारोळात कोणतंही विधेयक मंजूर होऊ दिलं नाही. त्यांच्या पुस्तकात मोदी यांच्यावर आरोप आहे. मोदी एके दिवशी त्यांच्या कार्यालयात आले आणि गदारोळात विधेयकं का मंजूर केली जात नाहीत, असा प्रश्‍न विचारला. मोदी तेव्हा म्हणाले की, “तुमच्याकडून मोठ्या जबाबदाऱ्या अपेक्षित आहेत; पण तुम्ही मला मदत करत नाही.” त्यावर अन्सारी यांनी, “राज्यसभेतलं आणि बाहेरच्या जगातलं माझं काम जगजाहीर आहे,” असं उत्तर दिलं. अन्सारी यांनी निरोप समारंभात याचा उल्लेख केला. मोदी यांनी भाषणात आपल्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल अन्सारी यांनी खेद व्यक्त केला होता.

ऑगस्ट २०१७ मध्ये राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा शेवटचा दिवस होता. त्या वेळी अन्सारी म्हणाले की, “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हवाला देऊन मी २०१२ मध्ये काही तरी बोललो होतो. आजही मी त्यांचे शब्द उद्‌धृत करत आहे. लोकशाहीचं वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्याकांना रास्त प्रमाणात संरक्षण दिलं जाणं. लोकशाहीत विरोधी गटांना सरकारच्या धोरणांवर मोकळेपणाने आणि उघडपणे टीका करण्याची परवानगी नसेल, तर त्याचं रूपांतर अत्याचारात होतं. त्याच वेळी अल्पसंख्याकांची जबाबदारीही आवश्यक आहे. त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे; पण त्या अधिकाराचा अर्थ संसदेत अडथळा आणणं असा नाही.” गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही मोदी यांनी अन्सारी यांना टीकेचं लक्ष्य बनवलं होतं. आता तर भाजपच्या हाती आयतं कोलित पडलं आहे. भारतात जसे पाकिस्तानमधले काही पत्रकार येत असतात, तसंच भारतातले काही पत्रकारही पाकिस्तानमध्ये जात असतात. दोन्ही देशांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी असे उपक्रम आयोजित केले जातात. पाकिस्तानमधून भारतात आलेल्या काही पत्रकारांनी ‘आयएसआय’साठी माहिती गोळा केली होती, असा दावा नुसरत मिर्झा या कथित पाकिस्तानी गुप्तहेराने केल्याने अन्सारी भाजपनेत्यांच्या निशाण्यावर आले. या वर्षाच्या सुरुवातीला ‘भारतीय-अमेरिकन मुस्लीम कौन्सिल’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मानवाधिकारांसंदर्भात भारतावर टीका केल्याबद्दल अन्सारी यांची निंदा करण्यात आली होती.

जानेवारी महिन्यात, सद्य मानवाधिकार परिस्थितीवर डिजिटल चर्चेत भाग घेताना अन्सारी यांनी हिंदूराष्ट्रवादाच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली होती. अन्सारी म्हणाले होते, अलीकडच्या वर्षांमध्ये आम्ही अशा प्रवृत्ती आणि वर्तनांचा उदय पाहिला आहे, जे आधीच प्रस्थापित नागरी राष्ट्रवादाच्या विरोधात आहेत आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाची काल्पनिक व्यवस्था लागू करू पाहतात. अन्सारी यांनी दावा केला की, सध्याच्या निवडणुकांमध्ये बहुसंख्याकांना धार्मिक बहुसंख्य म्हणून ओळख दिली जाते. त्यांना राजकीय सत्तेची मक्तेदारी निर्माण करायची आहे. या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहार सरकारमधले मंत्री सय्यद शाहनवाज हुसैन यांनी अन्सारी यांच्यावर निशाणा साधत जगातल्या मुस्लिमांसाठी भारतापेक्षा चांगलं राष्ट्र असू शकत नाही, असं म्हटलं होतं. नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा चांगला नेता आणि हिंदूंपेक्षा चांगला मित्र कोणीच असू शकत नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी अन्सारी यांना उत्तर दिलं होतं. पाकिस्तानी यूट्यूबर शकील चौधरी यांच्याशी झालेल्या संभाषणात पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी दावा केला होता की, ते भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि संस्थापक जफरुल इस्लाम यांच्या निमंत्रणावरून भारतात आले होते. यादरम्यान त्यांना भारताशी संबंधित बरीच गोपनीय माहिती मिळाली होती. ती त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ला पाठवली होती.

अन्सारी यांनी आपल्याला पाच वेळा भारतभेटीचं निमंत्रण दिल्याचा दावाही नुसरत मिर्झा यांनी केला आहे. भाजपने या प्रकरणावरून राजकारण सुरू केलं आहे. भाजपने काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला आणि म्हटलं की, काँग्रेसने दहशतवादाबाबत आपली धोरणं काय आहेत हे स्पष्ट करू नये, तर माजी उपराष्ट्रपतींनी पाकिस्तानी पत्रकाराला पाच वेळा निमंत्रण का दिलं, ते देशाला सांगावं. अन्सारी यांना देशानं एवढा सन्मान दिला आणि त्या बदल्यात त्यांनी काय दिलं, असा सवाल करत दहशतवादाशी लढण्याचं काँग्रेसचं धोरण हेच होतं का, याबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी भाजपने केली. कोणतंही सरकार किंवा संस्था देशाच्या हिताच्या विरोधात काम करू शकत नाही. सहसा अशा संमेलनातल्या पाहुण्यांची यादी आयोजकांकडून तयार केली जाते. उपराष्ट्रपतींकडून परदेशी मान्यवरांना निमंत्रणपत्रं सरकारच्या सल्ल्यानुसार, सामान्यतः परराष्ट्र मंत्रालयामार्फत पाठवली जातात, हे सर्वज्ञात सत्य आहे. भाजपच्या आरोपांबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रियेत अन्सारी यांनी भाजप खोटेपणाची लबाडी करत असल्याचं म्हटलं. गुजरातमधल्या निवडणुकीच्या वेळी मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग आणि अन्सारी यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजपने सारवासारव केली होती. पंतप्रधानांनी डॉ. मनमोहन सिंग किंवा हमीद अन्सारी यांच्या देशाप्रति असलेल्या बांधिलकीपुढे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलं नाही किंवा त्यांना प्रश्‍नही विचारायचा नव्हता, असं भाजपने म्हटल्याचा पलटवार काँग्रेसने केला; मात्र आता पाकिस्तानी पत्रकारानेच माहिती उघड केल्याने अन्सारींच्या भूमिकेवरून वातावरण तापलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in