
भ्रम विभ्रम
डॉ. दीपक माने
भारतात गो-मूत्राला धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व देण्यात आले आहे; मात्र विज्ञाननिष्ठ संशोधनानुसार, गो-मूत्रात घातक जीवाणू आढळले असून, ते प्राशन करणे आरोग्यास अपायकारक आहे. परंपरागत समजुतीमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन खुंटला आहे. जो पदार्थ टाकाऊ म्हणून शरीराबाहेर टाकला जातो, तो पुन्हा शरीरात उपचारासाठी घेणे हे तर्कबुद्धी न वापरता दुष्परिणामाकडे डोळेझाक करून आत्मविचारांना तिलांजली देणे ठरेल.
जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये उपयुक्त पशूंचे पालन गतकाळापासून सुरू आहे. परिसरातील उपयुक्त पशू गाय, म्हैस, रेनडिअर, कांगारू, शेळी, मेंढीविषयी काही समज, पशुजन्य पदार्थ, उपपदार्थ यांचा वापर, भरण-पोषण, उपचाराबाबत झाले आहेत. या पशुजन्य धारणांना पावित्र्य, वर्ज्य अशा गोष्टी लावून त्या धारणांची चिकित्सा व संशोधन यावर मर्यादा आल्याने योग्यायोग्यता पडताळणी नीट होत नाही.
आपल्या भारतीय सिंधू संस्कृतीत गो-पालन फार पुरातन असल्याचे दिसते. त्याला अनेक मिथकांमध्ये, कथांमध्ये चर्चिले आहे. आपल्याकडे बहुतांश मंडळी बालसंस्कार, गप्प बस संस्कृतीमुळे शब्दप्रामाण्य म्हणजे कोणी महान व्यक्ती सांगेल तेच खरे आणि ग्रंथ प्रामाण्य म्हणजे पुरातन ग्रंथात सांगितले आहे, तेच त्रिकाल सत्य मानणारे असतात. गो-मूत्र म्हणजे गो-वर्ग मूत्र यात बैल मूत्र असले पाहिजे; पण लिंगभेद, येथेही परंपरा, भेदाभेद वृत्तीमुळे फक्त गाईचे मूत्र हा समज प्रचलित आहे. विज्ञानानुसार, मूत्र, मल, घाम हे शरीरातील उत्सर्जित (टाकाऊ) घटक आहेत. हे प्राथमिक शिक्षण स्तरावर शिकतो. गाय व म्हैस हे एकाच बोव्हाईन संवर्गात आहेत. शरीर रचना, चयापचय क्रिया, अन्नग्रहण, उत्पादनबाबत वशिंड, त्वचा प्रकारसारखे तुरळक फरक वगळता दोन्हीमध्ये बहुसाम्य आहे. भिन्न भौगोलिक रचनेनुसार त्यांचे उपप्रकार गुणात्मक फरकाने उदा. खिलार, डांगी, लाल कंधार गाय व पंढरपुरी, नागपुरी, मुऱ्हा म्हैस आहेत.
तुलनात्मक अभ्यास करता गायीच्या दुधापेक्षा म्हैस दूध पौष्टिक घटक, प्रथिने, स्निग्धांश व घनता यात सर्वोत्तम आहे. गो-पालनापेक्षा म्हैस पालन हे फक्त आशिया खंडात असूनही बहुधा जंगली वास्तव्य, उशिरा पाळीव स्वरूपात आल्याने वा उपद्रव मूल्यांक जास्त प्रमाणामुळे माणसाळणे उशिरा झाले म्हणून मिथके, दंतकथा यातून म्हैस वर्ग खलनायकी रूपात दिसतात. सध्या अजूनही ‘रानगवा’ जंगली स्वरूपात आहे. त्याची उपयुक्तता व गरज वाटल्यास हजारो वर्षांनी तो पाळीव होऊ शकतो.
गो-मूत्र उपयुक्तता ही प्राचीन ‘चरक संहिता’, मनुस्मृती ग्रंथात मांडलेली दिसते; पण त्यावर आधुनिक विज्ञानानुसार निरीक्षण, तर्क, प्रयोग, अनुमान, प्रचिती याद्वारे चिकित्सा पुराव्यानिशी झालेली दिसत नाही. मात्र गो-मूत्र हे ‘वॉटर ऑफ लाइफ’ व ‘नेक्टर ऑफ गॉड’ म्हणजे अमृत समजण्यात येते.
गो-मूत्राचा वापर :
पंचगव्य : गो-मूत्र, शेण, दूध, तूप आणि दही मिश्रण.
जीवामृत : गो-मूत्र, गूळ, रायझोस्पेअर माती हे किण्वन क्रियाद्वारे निर्मिती
आयुर्वेदिक उपचार : गाळून प्राशन, जखमा उपचार, त्वचारोग
खत निर्मिती : सेंद्रिय खत
पारंपरिक विधी : विविध विधीत शेणासोबत मूत्र वापरतात.
परिसर शुद्धता : अपवित्र ठिकाण शुद्ध करण्यासाठी गो-मूत्र शिंपडतात.
वैज्ञानिक परिभाषेत गो-मूत्र (गो-वर्गीय मूत्र) त्यातील घटकांचे प्रमाण : पाणी-९५ टके, युरिया - २.५ टके, क्षार, मिनरल इ.- २.५ टक्के. मूत्रात नायट्रोजनचे प्रमाण जास्त व इतर सोडियम, सल्फर, मँगेनिज घटक असतात. ते खत निर्मितीस उपयुक्त व वनस्पती वाढीस योग्य पोषण पुरविणारे असतात.
म्हशीच्या मूत्रातही सर्व घटक व प्रमाण जवळजवळ सारखेच आहेत; पण त्याला पारंपरिक धारणेची मान्यता नसल्यामुळे त्याची महती वर्णन करण्यास कोणी रक्षक, संघ इत्यादी यंत्रणा नाही.
एप्रिल २०२३ मध्ये भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील सर्वोत्तम संस्था आहे, तिचे बरेली केंद्रातील डॉ. भोजराज सिंग यांचे सहकारी यांनी संशोधन प्रसिद्ध केले आहे. त्यांनी जून २०२२ ते नोव्हें. २०२२ कालावधीत विविध ७३ प्रकारचे गाय, म्हैस, मानव यांचे ताजे मूत्र नमुने घेऊन त्याचे योग्य तपासण्यांद्वारे तुलनात्मक विज्ञाननिष्ठ अभ्यासाचा निष्कर्ष जाहीर केला तो असा -
गायीच्या मूत्रात (गो-मूत्र) १४ प्रकारचे शरीरास घातक असणारे जीवाणू (बॅक्टेरिया) आहेत. जसे इ. कोलाय (पोटविकार), एस. इपिडरमीडिस (त्वचा विकार) इ. सारखे १४ जीवाणू आहेत.
गो-मूत्रात म्हशीच्या मूत्रापेक्षा कमी जंतुनाशक (अॅन्टिसेप्टिक) क्षमता आहे.
म्हैस मूत्र हे गो-मूत्रापेक्षा जास्त जंतुनाशक म्हणून उपयुक्त आहे.
गो-मूत्र प्राशन मानवी आरोग्यास धोकादायक आहे.
भारतात व विदेशात वैज्ञानिक शब्द वापरून व काही प्रमाणात स्वअनुभूती दाखले देत प्रचंड मोठ्या प्रमाणात गो-मूत्र विकले जाते. कारण त्याचा असाध्य, दुर्धर आजार, कॅन्सर, संधिवात, विषाणू संसर्ग (कोरोनासारखे) श्वासाचे आजार, मेंदूचे आजार यावर हमखास उपयोग होतो, असे सांगून “लिबिडो सिंड्रोम” किंवा स्वयंसूचना स्वीकारल्यामुळे तात्पुरते समाधान मिळते; पण आजार बळावत जातो. जो पदार्थ टाकाऊ म्हणून शरीराबाहेर टाकला जातो, तो पुन्हा शरीरात रोग उपचारासाठी घेणे हे फक्त ‘जुनं ते सोनं’ मानून तर्कबुद्धी न वापरता दुष्परिणामाकडे डोळेझाक करून आत्मविचारांना तिलांजली देणे ठरेल.
संत तुकाराम म्हणतात तसे ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ सर्वच मूत्र हे घातक आहेत, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. आता अवैज्ञानिक, अनिष्ट, द्रव (गो-मूत्र) प्राशन करणे टाळावे.
पशुवैद्यक