
- भावेश ब्राह्मणकर
देश-विदेश
केरळच्या वायनाडमध्ये अख्खा डोंगरच कोसळून तब्बल चार गावे त्याखाली गाडली गेली आहेत. भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या घटना नवीन नाहीत. वारंवार त्या होत आहेत आणि तरी त्यातून ना आपण धडा घेतला आहे, ना काही संदेश. निष्पाप जीवांचा बळी जातोच आहे आणि सरकार व प्रशासन ढिम्मपणे पहातच आहे. म्हणूनच पश्चिम घाटसारख्या विविध अहवालांचे काय झाले? हा प्रश्न विचारण्याची हीच वेळ आहे अन्यथा विकासाचा रोग भूस्खलनाचे प्रमाण वाढवतच राहील.
नैसर्गिक आपत्ती ही किती महाकाय असते याचा प्रत्यय विविध माध्यमातून येत असतो. कधी त्सुनामी, कधी भूकंप, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. केरळच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वायनाडमध्ये निसर्गाच्या कुशीतील चार गावे अचानक गडप झाली आहेत. आतापर्यंत १२३ हून अधिक जणांचा बळी गेल्याचे समोर येत आहे. शोधकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत. भूस्खलन किंवा दरड कोसळण्याच्या आपत्तीला तोंड देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. १९६८ मध्ये दार्जिलिंग (१ हजार मृत्यू), १९९८ मध्ये उत्तराखंड (३०० मृत्यू), २०१३ मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ (५७०० मृत्यू), २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण (१५१ मृत्यू), २०२० मध्ये केरळचे पेट्टीमुडी (६५ मृत्यू), २०२३ मध्ये रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी (२६ मृत्यू) या घटनांचा समावेश आहे. १६ जुलै रोजी कर्नाटकच्या शिरूरमध्येही दरड कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा बळी गेला आहे. मात्र, वायनाडमध्ये नदीच्या वेगवेगळ्या किनाऱ्यावर असलेली गावे दरड कोसळून चक्क एकत्र आली आहेत. कल्पनातीत असावे असेच हे आहे. पण, निसर्गाच्या रौद्ररूपापुढे मानव अत्यंत थिटा पडतो, हेच शाश्वत सत्य आहे.
निसर्ग खूपच लहरी बनला आहे का? जागतिक तपमान वाढीमुळे हे होते आहे का? हवामान बदलाचा हा परिणाम आहे का? की कसला तरी कोप झाला आहे? अशा प्रकारच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. मुद्दा हा आहे की, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्या तरी आपण त्यातून काहीच धडा घेत नाहीत. केवळ आपत्ती घडल्यानंतर तेथे शोध व बचावकार्य राबविले जाते, लाखोंची आर्थिक मदत जाहीर होते, बेघर झालेल्यांना शासकीय योजना किंवा निधीतून घर बांधून दिले जाते. यापलीकडे फार फार तर सरकारकडून तज्ज्ञांची समिती नेमली जाते. त्याचा अहवाल येतो. औपचारिकता म्हणून हे सारे केले जाते. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! उदाहरणच द्यायचे तर केंद्र सरकारने ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाटासाठी समिती नेमली. शास्त्रोक्त अभ्यास करून अहवाल सादर झाला. आज त्याचे काय झाले आहे? सरकारने तो अहवाल लाथाडल्याने पश्चिम घाट अक्षरशः संकटात सापडला आहे.
गुजरातच्या डांग जिल्ह्यापासून सुरू होणारा पश्चिम घाट महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकपासून थेट खाली केरळपर्यंत आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा ‘जैविक हॉटस्पॉट’ म्हणून तो ओळखला जातो. अत्यंत वैविध्यपूर्ण आणि मौल्यवान अशी नैसर्गिक संपदा या घाटात आहे. मात्र, विकासाच्या मृगजळाने झपाटल्यामुळेच या पश्चिम घाटाला ओरबाडण्याचे आणि निसर्गात अनन्यसाधारण हस्तक्षेप करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. रस्ते, पूल, बोगदा, धरण, उद्योग, खाणकाम, उत्खनन, घरे व हॉटेल्सची निर्मिती अशा बहुविध कारणांसाठी निसर्गावर जणू अत्याचार सुरू आहेत. भूसुरुंग लावून डोंगर पोखरणे, खोदणे हे तर नित्याचेच झाले आहे. डोंगर आणि पर्वतांवर आघात करून विकसित केलेल्या रस्त्यांवर मानवनिर्मित वाहनांमधून वावरणे आणि डोंगराच्या माथ्यावर थेट वाहनातून जाणे शक्य झाले आहे. यात समाधान शोधले जात असले तरी प्रत्यक्षात आपत्तीलाच आमंत्रण दिले जात आहे.
बेसुमार उत्खनन आणि खाणकामामुळे डोंगर ओसाड झाले आहेत. खनिजांचा उपसा दिवसागणिक वाढतोच आहे. तसेच, या भागातील वृक्षराजीही गायब करण्यात आली आहे. म्हणूनच डोंगररांगेतील जमिनीची प्रचंड धूप होते आहे. यात पावसाचे पाणी पडले की ही जमीन आणखीनच भुसभुशीत होते. यातूनच डोंगराचा एखादा भाग किंवा कठडा कोसळतो. विशेष म्हणजे, हे सारे आपल्याला ठाऊक आहे. आपण एवढे निगरगट्ट झालो आहोत की परिणाम माहीत असूनही आपले धाडस दिवसेंदिवस वाढतच आहे. डोंगर फोडणे, भूसुरुंग लावणे, अमर्याद उत्खनन करणे, वृक्षतोड करून डोंगर बोडका करणे या साऱ्या अवैध उद्योगांमुळेच भूस्खलनाच्या घटनांना चालना मिळत आहे.
पावसाचा लहरीपणाही कमालीचा वाढला आहे. पाऊस पहिल्यासारखा राहिला नाही, असे स्पष्ट मत जुनेजाणते व्यक्त करतात. पण त्याची कुठलीही दखल आपण घेत नाही. पाऊस कधी येतो तर कधी प्रतीक्षा करायला लावतो. महिन्याभराचा किंवा संपूर्ण मौसमाचा पाऊस केवळ एकाच दिवशी किंवा काही तासांतच कोसळण्याचेही पराक्रम नोंदले जात आहेत. दोन पावसांमधील असंख्य दिवसांचे अंतर (ड्राय स्पेल) चिंताजनकच आहे. कमी-अधिक प्रमाणात बरसणाऱ्या पावसाचा लहरीपणा काळजी करायला लावतो. त्यातच ढगफुटी किंवा अतिवृष्टी झाल्यानेही डोंगराचा मोठा भाग कोसळतो. पावसाच्या लहरीपणाचाही भूस्खलनाशी संबंध आहे.
पोकलेन, जेसीबी, डम्पर, ट्रक यांसारख्या वाहनांचा कोकण किंवा पश्चिम घाटातील सुळसुळाट निसर्गावर घाव घालणाराच आहे. मात्र, यालाच आपण ‘विकास’ म्हणतो आहोत. यातूनच अतिवृष्टी किंवा पुरामुळे नद्यांचे प्रवाह सुद्धा बदलत आहेत. याचा प्रत्यय वेळोवेळी देशाच्या विविध भागात आपण घेत आहोत. आपल्या डोळ्यादेखत निष्पाप बळी जाताना आपण पाहत आहोत. केदारनाथचेच उदाहरण घ्या. पत्त्याच्या बंगल्यांसारखी घरे, हॉटेल्स आणि इमारती कोसळल्या. ५,७०० बळी गेले. शेकडो व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. तरीही त्या परिसरामध्ये ना विकासकामे घटली, ना खबरदारीच्या उपायांमध्ये वाढ झाली. ईर्शाळवाडीतील आपदग्रस्त अद्यापही निवाऱ्यापासून वंचित आहेत.
परवा एक धक्कादायक बातमी वाचनात आली. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात चारधाम बाह्यवळण प्रकल्प प्रस्तावित आहे. यास मोठा विरोध झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्चाधिकार समिती नेमण्यात आली. तेथे कुठलेही विकास कार्य करू नये, असे समितीने स्पष्टपणे सांगितले. दरड कोसळणारे ठिकाण असे सरकारनेच जाहीर केले. आता चार वर्षांनंतर याच प्रकल्पाला मंजुरी मिळावी म्हणून पर्यावरण मंत्रालयाकडे पुन्हा अर्ज करण्यात आला आहे. याचा अर्थ काय? संबंधित प्रकल्प बासनात टाकणे हा एकमेव पर्याय असताना तो धुडकावून लावत आता तिथे बिनदिक्कतपणे रस्ते, डांबर आणि डोंगर फोडण्याचे उद्योग केले जातील. तेथून मानवी हालचाली, वाहनांची वर्दळ वाढेल आणि अचानक एके दिवशी महाकाय आपत्ती कोसळेल. मग, पुन्हा सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण जाईल. चौकशी होईल. समिती नेमली जाईल. प्रकल्प अवैध असल्याचे पुन्हा अधोरेखित होईल. पण, झालेल्या नुकसान आणि जीवितहानीचे काय? त्याची जबाबदारी कुणाची?
संवेदनाहीन आणि अविवेकी बनल्यानेच विकासाचा रोग आपल्याला लागला आहे. हा दुर्धर आणि बरा न होणारा आजार असल्याची जाणीव आपल्याला आहे. मात्र, केवळ त्यासाठी थातूरमातूर औषधे घेऊन उपचाराचा सोपस्कार पार पाडला जात आहे. वेळप्रसंगी विविध चाचण्या करायच्या, निदान काढायचे, थोडी फार औषधे बदलायची, डोसचे प्रमाण वाढवायचे. यातून रुग्ण बरा तर होत नाहीच. त्याच्या वेदनाही कमी होत नाहीत. उलट शरीराच्या आतल्या भागात विविध प्रकारच्या वाईट किंवा अनाकलनीय प्रक्रिया घडतात. परिणामी, हा रुग्ण लवकर मरत तर नाहीच, पण त्याची तगमग, तडफड वाढते. त्याला जीव नकोसा होऊन जातो. कधी एकदाचे मरण येते, याचा तो सतत धावा करतो. हा रुग्ण दुसरा तिसरा कुणी नसून विकासाचा बुरखा पांघरलेला मानव आहे. नैसर्गिक आणि मानवी आपत्ती घडल्यानंतरचे सोपस्कार किंवा उपचार हे आजचे मरण उद्यावर ढकलणारे आहेत. एवढेच!
bhavbrahma@gmail.com (संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार)