शिवसेनेच्या मुसक्या आवळण्यासाठीच..!

शिवसेनेनं हिंदुत्वावर मतं मागितली म्हणून शिवसेनाप्रमुखांचा मताधिकार सहा वर्षासाठी गोठवला.
शिवसेनेच्या मुसक्या आवळण्यासाठीच..!

सत्तासंघर्षाच्या या नाट्यात मला आठवण झाली ती शिवसेना-भाजप युतीचे एक शिल्पकार प्रमोद महाजन यांची! १९८७ मध्ये भाजप शिवसेनेच्याविरोधात जनता पक्षासोबत असतानाही विलेपार्ले विधानसभेची पोटनिवडणूक 'हिंदुत्वा'च्या मुद्द्यावरून जिंकली. डॉ रमेश प्रभू निवडून आले. त्यावेळी शिवसेनेनं हिंदुत्वावर मतं मागितली म्हणून शिवसेनाप्रमुखांचा मताधिकार सहा वर्षासाठी गोठवला. 'हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मिळतात' हे पाहून प्रमोद महाजन यांनी शिवसेनेपुढं युतीचा प्रस्ताव ठेवला. त्याआधी मराठी अस्मितेचा जागर करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना सोबतकार ग. वा. बेहरे, दि. वि. गोखले, विद्याधर गोखले आदि संघीय पत्रकारांनी घेरलं होतं. त्यांच्या गळी हिंदुत्व उतरवलं होतं. महाजनांनी केलेल्या प्रयत्नानंतर शिवसेना-भाजप युती कार्यरत झाली. पण भाजपतूनच विरोध झाला.

सर्वश्री सूर्यभान वहाडणे, ना. स. फरांदे, वामनराव परब, मधु चव्हाण यासारख्या काही भाजप नेत्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख हे सतत संघ-भाजपवर उघडपणे टीका करत असतात, अशावेळी ही युती कशासाठी? असं म्हणत युतीला पक्षाच्या बैठकीत विरोध केला. त्यावेळी महाजनांनी या मंडळींना शांत करताना सांगितलं होतं की, 'आपल्याला शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे नकोत तर मोठ्यासंख्येनं तिथं असलेले शिवसैनिक आपल्याला हवेत; त्यासाठी ही युती करतो आहोत!' असा धुर्तपणे डाव टाकला. आज तीच भूमिका घेऊन भाजप वावरतेय. त्यांनी आता ठाकरे यांना दूर सारून शिवसैनिकांना जवळ घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना 'शत प्रतिशत भाजप' म्हणत एकहाती सत्ता आणायचीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या आमदारांनी ठाकरे यांच्याच विरोधात बंड करून 'बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वा'साठी भाजपला जवळ करत असल्याचं म्हटलंय. १९८८ साली प्रमोद महाजनांना जे काही अभिप्रेत होतं त्याला सुरुवात झालीय असंच म्हणावं लागेल. संघालाही शिवसेनेला संपवायचंय. 'हिंदुत्वा'च्या एका म्यानात शिवसेना आणि भाजप या दोन तलवारी राहणार कशा? त्यासाठी शिवसेनेला संपवणं क्रमप्राप्त आहे! उद्धव यांनी अलीकडंच्या भाषणातून संघावर टीका करताना 'संघ हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नव्हता!' 'आमचं हिंदुत्व हे संघाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं आहे. ते शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही!' आणि 'संघाची काळी टोपी का आहे!' असं म्हटलं होतं. या वक्तव्यानं रेशीमबाग दुखावली असणार. उद्धव यांची ही भूमिका त्यांचे वडील बाळासाहेबांची नाही; तर आजोबा प्रबोधनकारांची आहे. उद्धव हीच आजोबांची भूमिका घेऊन ब्राह्मणवादी हिंदुत्वाला विरोध करताहेत. तर बहुजनवादी हिंदुत्वाचा, शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या भूमिकेचा पुरस्कार करताहेत. संघाला हे सहन होत नाही, त्यामुळंच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होतोय.

संघाचं हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद आहे असंच म्हटलं जातं. त्यात उपयुक्ततेला जास्त महत्त्व आहे. म्हणजे ज्याचा उपयोग आहे, त्याला महत्त्व द्यायचं आणि ज्याचा उपयोग नाही, त्याला संपवायचं! त्यांच्यादृष्टीनं आज ठाकरेंचं महत्व संपलंय मात्र शिवसैनिकांचं अद्यापि आहे, म्हणूनच ठाकरेंना दूर सारून त्यांनी शिवसैनिकांना जवळ करणं चालवलंय. त्यांना मानाचं पान दिलं जातंय आणि ठाकरेंची मात्र अवमान, अवहेलना चालवलीय. आपल्यापेक्षा वेगळा विचार टिकूच द्यायचा नाही, ही संघाची भूमिका असते. त्यासाठी संघ कुठल्याही थराला जाऊ शकतो. शिवसेना संघाच्या या ब्राह्मणवादाला आडवी जाणार म्हटल्यावर तिला संपवली पाहिजे, असा कुटिल डाव संघानं टाकलाय. त्यासाठी उद्धव यांना दूर करायचं त्याचवेळी शिवसैनिकांना गोंजारत त्यांची ताकद वापरायची, त्यांची मतपेढी भाजपकडं वळवायची अशी त्यांची भूमिका आहे!

शिवसेना संपवायची असेल तर शिवसेना आणि ठाकरे हे नातं संपवलं पाहिजे! त्यातून हा अनैतिक खेळ एकनाथ शिंदेंवर राज्य देऊन भाजपनं खेळलाय. त्यांना केवळ शिवसेनेची सत्ता संपवायची नव्हती, तर शिवसेनाच संपवायचीय. पण हा प्रयत्न अधिक कपटी, धोकादायक आहे. यापूर्वी झालेल्या बंडखोरीत आमदारांच्या इतक्या संख्येनं शिवसेना कधीच फुटली नव्हती आणि दुसरं म्हणजे थेट 'शिवसेना आमचीच' असा दावा कुणीही केला नव्हता! म्हणूनच या बंडाकडं शिवसेनेला अत्यंत गांभीर्यानं पाहावं लागेल. मुळातच इतकं मोठं षडयंत्र उभं करणं हे शिंदेंच्या आवाक्यातलं नाही. त्यांचा बोलविता धनी दुसराच आहे. शिवसेनेनं घडवलेले हे आमदार सामान्य कुटुंबातले सरळ आणि रांगडे शिवसैनिक आहेत. ते शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर श्रद्धा ठेवणारे आहेत. पण उद्धव हे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करून संपवत आहेत. त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलंय. ही आघाडी अनैसर्गिक आहे. तर शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती आहे वगैरे मुद्द्यांनी आमदारांना भावनिक केलं गेलं. आमदार या जाळ्यात अलगद अडकले. त्यांना सर्वात मोठा दिलासा हा दिला गेला की, तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच राहाल आणि तुम्हालाच खरी शिवसेना वाचवायची आहे! त्यात सर्वात मोठे षडयंत्र म्हणजे, संख्याबळावर त्यांनी शिवसेना संघटनेवर केलेला दावा होय! संघ आणि भाजपच्या आसुरी राजकीय खेळांत अनेक प्रादेशिक पक्षांचे बळी जात आहेत. ‘शत प्रतिशत भाजप!' या इराद्याद्वारे भाजपनं नैतिकतेचा खून केलाय.

अनेक बंड होऊनही शिवसेना कधी संपली नाही. मग शिवसेना संपवायची असेल तर शिवसेना आणि ठाकरे हे नाते संपवलं पाहिजे! हा अनैतिक खेळ शिंदेंवर राज्य देऊन भाजपनं खेळलाय. 'पानिपत झालं तर मराठ्यांचं, आणि अटकेपार झेंडे लावले तर पेशव्यांनी!' असा हा त्यांचा जुना खेळ आहे!' आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानंतर शिवसेना संपणार की वाचणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, ५६ वर्षांपूर्वी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर शिवसेनेचा ठसा आहे. या काळात शिवसेना तीन वेळा सत्तेवर आली. पण शिवसेनेला सत्तेवर येण्यासाठी अन्य पक्षांशी युती करावी लागली, त्यात दोन वेळा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं, सत्तेत नसतानाही शिवसेनेचे बऱ्यापैकी संख्येने आमदार निवडून आले होते. याचा अर्थ असा की, महाराष्ट्राच्या राजकारणात गेली काही दशकं शिवसेनेचा प्रभाव आहे. तो आता पुसला जाणार नाही शिवसेनेचं भवितव्य शिवसैनिकांवर अवलंबून राहणार आहे. कारण यापूर्वीही जी बंडं झाली तेव्हा बंड केलेल्या त्या आमदारांचं एखाददुसरा अपवाद वगळता राजकीय आयुष्य संपुष्टात आलं आहे. हा इतिहास आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्याचं राजकीय भवितव्य अवघड आहे. सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या राजकारणात नैसर्गिक अनैसर्गिक असं काही नसतं, त्यात नाममात्र विचार आणि बहुतांश स्वार्थ असतो. तो घडवून आणलेला एक कृत्रिम व्यवहार असतो, त्याचा सौदा 'समान किमान कार्यक्रम-कॉमन मिनिमम प्रोग्रॅम' नावानं केला जातो. त्यासाठीच युत्या आघाड्या बनतात आणि सोयीनं मोडतातही. आजवरचे बंड शिवसैनिकांनी मोडून काढलेत, त्यांनी बंडखोरांना राजकारणातून बाद केलंय, तेवढी हिम्मत आणि जिद्द त्यांच्यात नक्कीच आहे!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in