भ्रम विभ्रम
निशा भोसले
मंगळवेढ्यातील एका कुटुंबात वस्तू गायब होणे, धमकीच्या चिठ्ठ्या येणे अशा घटना घडत होत्या. हे अघोरी प्रकार आहेत, असे पाहून घाबरलेल्या कुटुंबाने मांत्रिकाकडे धाव घेतली; मात्र 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांनी संवाद साधून भीती दूर केली आणि या 'मोबाईल भानामती'ला पूर्णविराम दिला.
मंगळवेढा तालुक्यातील एका गावात घडलेली ही घटना. साधारणतः ६० ते ६५ वयोगटातील एक शेतकरी आपली पत्नी, मोठा मुलगा, त्याची पत्नी, त्यांच्या तीन मुलांपैकी दोन मुली व एक मुलगा आणि आजीसोबत राहतो. या शेतकरी जोडप्याची आणखी दोन मुले आहेत. त्यांची लग्नं झालेली असून, ते आपल्या कुटुंबांसह पुण्यात नोकरीसाठी राहतात. अचानक त्यांच्या घरात (गावी) काही चमत्कारिक प्रसंग घडू लागले. ते घाबरले… तर काय घडत होतं त्यांच्या घरात…? त्यांच्या घरातल्या वस्तू गायब होत होत्या आणि काही काळाने त्या खराब झालेल्या अवस्थेत परत मिळत होत्या; सुरुवातीला त्यांच्या घरातील एका मोबाईलमधले सीमकार्ड गायब झाले. फोन समोरच ठेवलेला होता. दोन दिवसांनी ते कार्ड २१३ तुकडे झालेल्या अवस्थेत सापडले. त्यानंतर घरातून गाडीची चावी, कधी तेलाचा डबा, तर कधी टी.व्ही.चा रिमोट गायब होऊ लागला; अगदी सेटटॉप बॉक्समधले कार्डसुद्धा हॉलमधून गायब झाले. आता घरातील इतर वस्तू गायब होऊ लागल्या. आजोबांचे आधारकार्ड, त्यांच्या पाकिटातील पैसे. दुसऱ्या दिवशी त्याचे तुकडे घराच्या आजूबाजूच्या परिसरात सापडले. तशात आजोबांच्या मोठ्या मुलाचा मोबाईलच गायब झाला. दोन दिवसांनंतर त्याच हरवलेल्या मोबाईलवरून, ‘तुमचा आणि तुमच्या मुलाचा खून करणार आहे,’ असा मेसेज आला. तेव्हा त्या आजोबांनी दोन्ही मुलांना व सुनांना बोलावून घेतले. ते आल्यावर सर्व स्थिती पाहिली. घरचे अत्यंत भयभीत झाले होते. काळजीपोटी ते एका मांत्रिकाकडे गेले. त्याने सर्व ऐकून घेतले आणि भस्म दिले व सांगितले की, तुमच्या घरात काळी छाया घुसली आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरातील माणसांच्या जीवालाही धोका आहे. सध्या भस्म घरात व घराभोवती टाका आणि पुढच्या आठवड्यात काय होते ते सांगायला या. भस्म फेकल्यावर दोन दिवस घरात काहीच घडले नाही; पण तिसऱ्या दिवशी दारात उभ्या असलेल्या दुचाकीवर, ‘तुमच्या नातवाला ठार मारीन!’ अशी चिठ्ठी दिसली. आजी-आजोबा घाबरले. त्या मुलाची आई रडायला लागली. मग पुन्हा मांत्रिकाकडे जायचे ठरले. त्याच दरम्यान त्यांच्या नात्यातील एकजण साताऱ्याजवळील एका गावात राहत होता. त्याने त्यांच्या घरी फोन केला. पुण्यात राहणाऱ्या मुलाला, ‘अंनिस’च्या एखाद्या कार्यकर्त्याचा फोन नंबर मिळव, किंवा मी मिळवून देतो, तुम्ही त्यांच्याशी बोला,’ असे सांगितले. त्यांनी नंबर शोधला. त्यांना राहुल थोरात यांचा नंबर मिळाला. ते त्यांच्याशी बोलले. तेव्हा राहुल थोरात (सांगली) यांनी माझा नंबर दिला. त्यांचा मला फोन आला. मी त्यांच्याशी सविस्तर बोलले. त्यांना धीर दिला. ‘आम्ही घरी येऊन हे सर्व बंद करतो,’ असे सांगितले. ‘दोन दिवसांनी येतो,’ असे सांगून वार व तारीख ठरवली. पण दुसऱ्या दिवशी म्हणाले की, ‘आज आमच्या घरात येणारी विजेची वायर कापली गेली.’ ते खूपच घाबरले होते, त्यांच्या आवाजावरून ते स्पष्ट जाणवत होते.
दुसऱ्याच दिवशी आम्ही त्यांच्या गावी पोचलो. घरातील सर्वजण आमच्याभोवती गोळा झाले आणि काय-काय घडतं आहे, ते सांगू लागले. प्रत्येकजण भयभीत झालेला होता. आम्ही परिसराची पाहणी केली. वायर कशी कापली गेली, वस्तू कुठे-कुठे सापडल्या – हे सगळं पाहून घेतले. घराभोवती फिरताना आम्ही ‘त्या’ कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरखत होतो. काही गोष्टींचा अंदाज येऊ लागला होता. घरातील सर्वांना समोर बसवले. त्यावर काय-काय उपाय केले, ते विचारले. तेव्हा त्यांनी मांत्रिकाकडे गेल्याचे सांगितले आणि दोन दिवसांनी त्याने २५ हजार रुपये घेऊन परत बोलावल्याचेही सांगितले. तेव्हा मी त्यांना सांगितले, “आम्ही तुमच्या घरात घडणारे सर्व प्रकार आजच बंद करणार आहोत. पुन्हा असे काही होणार नाही; पण तुम्ही मांत्रिकाकडे परत जाणार नाही, हे कबूल करा.” तेव्हा आजोबा चक्क रडायला लागले. ते म्हणाले, “अहो ताई, दीड महिन्यांपासून हे सगळं घडतंय. आम्हाला झोप नाही, जेवण जात नाही. तुम्ही हे सगळं थांबवा. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. आम्ही कोणत्याही मांत्रिकाकडे जाणार नाही. आमची यातून सुटका करा.”
नेहमीप्रमाणे आम्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी स्वतंत्रपणे संवाद साधला. एक गोष्ट लक्षात आली – पुण्यात राहणारे गावी असतानाही घटना घडत होत्या, आणि गावी नसतानाही. आजी, आजोबा, मोठा मुलगा, मोठी सून – अशा क्रमाने एकेकाशी बोललो. सर्वांचे एकच म्हणणे – “कसं होतंय, कळत नाही. कोणीतरी बाहेरचं आपल्यावर करणी-भानामती करतंय.” या मतावर सर्वांचं एकमत होतं. आता उरली मोठ्या मुलाची तीन मुले. दोन मुलींपैकी एक आठवीत, दुसरी सातवीत, आणि मुलगा पाचवीत. ही केस ऐकल्यापासून माझ्या संशयाची सुई या मुलांकडेच वळली होती. आठवीतल्या मुलीशी बोलले. क्लास कसे चाललेत? मोबाईल कोणता आहे? रेंज येते का? मोबाईलमध्ये किती गेम आहेत? तुझा आवडता गेम कोणता? ती म्हणाली, “आमच्या दोघींचे व्हिडिओ येतात मोबाईलवर; पण माझा भाऊ (वय ११ वर्षे, पाचवी) इंग्रजी माध्यमात असल्याने त्याची ऑनलाईन शाळा असते. त्यामुळे मोबाईल जास्त वेळ त्याच्याकडे असतो. पुण्याच्या काकांनी त्याच्यासाठी खास सात हजार रुपयांचा मोबाईल घेतला आहे. मी आणि बहिण गेम खेळतो, पण मला येत नाही, आणि ते मला मोबाईल देतही नाहीत.”
दुसऱ्या बहिणीशी बोलले. ती म्हणाली, “यांच्या घरात मोबाईलचं सगळं माझ्या छोट्या भावाला कळतं. एका मिनिटात तो सीम काढून बसवतो. तो खूप हुशार आहे. मोबाईलचेही खूप ज्ञान आहे.” आता आमचा संशय पक्का झाला. शेवटी तो ११ वर्षांचा नातू खोलीत आला. अतिशय शांत, निष्पाप चेहरा, गोड आवाज, साधारण बांधा. सुरुवात केली हलक्याफुलक्या प्रश्नांनी. मग थेट विचारले, “काय रे, हे सर्व कसं घडतंय?” तो म्हणाला, “मला काय माहीत. पण वस्तू गायब झाल्या की मलाच दिसायच्या. मग मी घरच्यांना घेऊन जायचो, तिथे चावी, मंगळसूत्र, बाबांचा मोबाईल, काकांचं सीमकार्ड सापडायचं.” मी विचारले, “तुलाच सापडायचं; पण हे सगळं फेकताना, सीमकार्ड कापताना कोणी पाहिले नाही?” तो म्हणाला, “मी काहीच केले नाही. मांत्रिक म्हणाला ना काळी शक्ती आहे म्हणून. मला काहीच माहीत नाही.” चेहरा निर्विकार. मी त्याला कागद व पेन दिला. “जे व्हिडिओ गेम तुला येतात, त्यांची नावं लिही.” हात थरथरत होता. त्याने काही साध्या गेम्सची नावं लिहिली. मी विचारले, “मोबाईल कशाने उघडतो?” “टाचणीने.” “सीम कशाने कापतो?” – थोडा सावध झाला, म्हणाला, “मी सीम कापत नाही.” मग मी जवळ बोलावले, प्रेमाने पाठ थोपटली आणि सांगितले, “काल तू जिवंत करंट असलेली वायर कापलीस. हा गंभीर गुन्हा आहे. याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. खरं सांग.” तो म्हणाला, “मोठ्या कात्रीने!” “का?” “कारण काकांनी दिलेला मोबाईल लॉक आहे. गेम आणि यूट्यूब ओपन होत नाही. म्हणून दुसऱ्यांचे सीम घेत होतो, तोडून फेकत होतो. नंतर इतर वस्तूही गायब करू लागलो. चिठ्ठी मीच लिहिली, अक्षरं खराब करून.” आता तो रडायला लागला. भीती होती. मी समजावले , “जर काही गायब झाले, तर तक्रार करीन. कारण तुझं सगळं रेकॉर्ड केलेय. आता सर्व प्रकार बंद झाले पाहिजेत. आम्ही कोणालाही सांगणार नाही. अभ्यास कर, पोलीस हो. हस आता.” तो हसला. आम्ही हसलो. बाहेर येऊन दोन चमत्कार दाखवले, त्यामागचे सायन्स समजावले. “आता रोज या विषयावर चर्चा करू नका. सगळं थांबले आहे,” सांगून निघालो.
अशा प्रकारे मोबाईलची भानामती संपली.
- अंनिस कार्यकर्त्या