

विशेष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तब्बल १२ वर्षे म्हटले की आपण सवयीने एक तप असे म्हणतो. तप या शब्दातच तावून-सुलाखून निघण्याचा संघर्ष आहे, ध्येयपूर्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लक्ष्यप्राप्तीसाठीचा संकल्प. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचे एक तप पूर्ण झाले, असे म्हणतो तेव्हा तिन्ही कसोटीवर परीक्षण केले जाणे आवश्यक आहे.
तपश्चर्येला दोन बाजू असतात. ही तपश्चर्या समाजासाठी असली तर त्याचे फळ समाजालाच मिळते, समाजातील अनेक घटकांना त्याचा लाभ होतो. मोदीजींच्या या तपश्चर्येचे फळ म्हणजे भारतातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आलेली अभूतपूर्व क्रांती आहे. मोदीजींची २०१४ ते २०२६ ही १२ वर्षांची वाटचाल अशाच एका परिवर्तनकारी युगाची साक्ष देणारी आहे. ही केवळ सत्तेची बारा वर्षे नसून विश्वास, विकास, सुशासन, सांस्कृतिक पुनर्जागरण आणि जनकल्याण यांचा अभूतपूर्व संगम आहे.
आज आणखी एक विशेष बाब आहे, निर्वाचित पंतप्रधान म्हणून सलग ४३९९ दिवस मोदीजींनी पूर्ण केले. असे करताना त्यांनी पं. नेहरू यांचा विक्रम मोडला. नेहरूजी आणि मोदीजी यांची तुलनाच होऊ शकत नाही अशी वल्गना काही लोक करतील. नेहरूजी ज्या काळात प्रधानमंत्री झाले तेव्हा नेहरूजींना पर्याय नाही अशीच काहीशी भारतीय समाजाची मानसिकता होती, पण मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा लोक संवैधानिकदृष्ट्या प्रगल्भ झाले होते. त्यांना मतदानाचा अधिकार, त्याचे महत्त्व समजले होते. आपल्या आशा, आकांक्षा काय आहेत, याची जाणीव स्पष्ट झाली होती. सरकार लोककल्याणासाठीच आहे, हे त्यांना माहिती होते. अशा काळात मोदीजी यांचे सरकार आले होते, त्यामुळे जे कॉँग्रेसला ५०-६० वर्षांत जमले नाही ते करून दाखवण्याचे आव्हानच जनतेने त्यांच्या नेतृत्वाला भरभरून मते देऊन २०१४ मध्ये दिले आणि त्या आव्हानाला शिरोधार्य मानत मोदीजींचा ‘सब का साथ-सब का विकास’ हा प्रवास सुरू झाला. मग ‘सब का विश्वास-सब का प्रयास’ असे वेळोवेळी जोडले गेले. २०१४, २०१९ आणि २०२४ असे यशाचे टप्पे पार करीत ते आज भारताला वैश्विक नेतृत्व प्रदान करीत आहेत.
२०१४ आणि २०१९ मधील सुस्पष्ट जनादेशानंतर २०२४ मधील विजय हे केवळ निवडणुकीतील यश नव्हते, तर जनतेने विकास, सुशासन आणि स्थिर नेतृत्वावर व्यक्त केलेला पुनर्विश्वास होता. १९६२ नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळवणारे नरेंद्र मोदी हे देशातील पहिले नेते ठरले. जगातील अनेक लोकशाही व्यवस्था राजकीय अस्थिरतेशी झुंज देत असताना भारताने स्थैर्य, सातत्य आणि निर्णायक नेतृत्वाचा मार्ग निवडला. गेल्या दशकात मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने राजकीय स्थैर्याला विकासाची जोड दिली. आर्थिक सुधारणा, सामाजिक परिवर्तन, पायाभूत सुविधा विकास, राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रभावी परराष्ट्र धोरण यामुळे भारत आज जागतिक स्तरावर अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी राष्ट्र म्हणून उदयास आला आहे. २४ हून अधिक राष्ट्रांनी त्यांना दिलेले सर्वोच्च सन्मान ही त्याची पावती आहे.
हा फक्त एक नेतृत्वाचा प्रवास नव्हता, यामध्ये भारतीय जनता सहभागीदार होती हेच या प्रवासाचे वैशिष्ट्य आहे आणि फलित म्हणाल तर भारताची अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन डॉलरवरून ४.१८ ट्रिलियन डॉलर! जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था. सामाजिक न्यायाची स्थापना करायची असेल तर आधी आपली आर्थिक बाजू समृद्ध असली पाहिजे, ही मोदीजींनी फक्त जाणले नाही तर त्यासाठी त्यांनी सर्व स्तरावर प्रयत्न केले. मेक इन इंडिया असो किंवा आत्मनिर्भर भारत असो, यांनी भारतीयांना आत्मविश्वास तर दिला पण भारतीय वस्तूंबद्दल जगामध्ये विश्वास जागवला. आज स्वदेशी शस्त्रास्त्रांची मागणी इतकी वाढली आहे की, पुढील दहा वर्षांचे उत्पादनही अपुरे पडेल. हीच आत्मनिर्भर भारताची खरी ताकद आहे.
देशातील १२ राज्यांमधून नक्षलवादाचा प्रभाव कमी करणे ही मोदी सरकारची ऐतिहासिक उपलब्धी आहे. अनेक दशकांपासून विकासापासून वंचित असलेल्या भागात आता विकासाची गंगा पोहोचत आहे. देशभरात २० कोटी लोक भीती आणि गरिबीच्या सावटाखाली जगत होते. नक्षलवादामुळे विकास पोहोचत नव्हता. हजारो युवकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. पण आज परिस्थिती बदलत आहे. गडचिरोलीसारख्या भागात स्टील उद्योग उभे राहत आहेत. विद्यापीठे, मेडिकल कॉलेज, मोठ्या शैक्षणिक संस्था सुरू होत आहेत. कारण बंदुकीच्या आवाजावर विकासाच्या आवाजाने विजय मिळवला आहे.
गेल्या १२ वर्षांत भारताने पायाभूत सुविधांच्या विकासात अभूतपूर्व झेप घेतली आहे. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे ९१ हजार किलोमीटरवरून सुमारे १.४६ लाख किलोमीटरपर्यंत विस्तारले. दररोज सरासरी ३४ किलोमीटर महामार्ग बांधले जात आहेत. ग्रामीण भारताच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत लाखो किलोमीटर रस्त्यांची उभारणी करण्यात आली. या रस्त्यांमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. रेल्वे क्षेत्रात ब्रॉडगेज विद्युतीकरण गतीने होत असून वंदे भारत एक्स्प्रेस, अमृत भारत स्टेशन योजना आणि आधुनिक रेल्वे स्थानकांमुळे भारतीय रेल्वेची ओळख बदलली आहे. मेट्रो नेटवर्क २४८ किलोमीटरवरून १,०९५ किलोमीटरपेक्षा अधिक वाढले आहे.
मोदी सरकारने ‘अन्नदाता’ शेतकऱ्याला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्यात आले. सरकार स्थापन झाल्यानंतर तिसऱ्या कार्यकाळातील पहिली फाइलही शेतकरी कल्याणाशी संबंधित असल्याने सरकारची प्राथमिकता स्पष्ट झाली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेेंतर्गत ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ अभियानामुळे लाखो हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले. कृषी उत्पादनात विक्रमी वाढ झाली असून भारत आज जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे ८१ कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरवण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४ कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे मिळाली. उज्ज्वला योजनेमुळे ११ कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी मिळाली. आयुष्मान भारत योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना मोफत आरोग्य संरक्षण मिळाले. जलजीवन मिशनमुळे १६ कोटींपेक्षा अधिक घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचले.
मोदी सरकारच्या धोरणांमध्ये महिलांना विशेष स्थान देण्यात आले. जनधन खात्यांमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. ‘लखपती दीदी’ अभियानामुळे लाखो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या. सुकन्या समृद्धी योजना, मातृत्व लाभ, स्वयं-सहाय्यता गटांचे सक्षमीकरण आणि सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या वाढत्या सहभागामुळे महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताने डिजिटल क्रांतीचा नवा इतिहास घडवला. जनधन, आधार आणि मोबाईल या माध्यमातून लाखो कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचले. यूपीआय व्यवहारांमध्ये भारताने जागतिक नेतृत्व मिळवले आहे. भारतनेट प्रकल्पाद्वारे लाखो ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कशी जोडण्यात आले आहे. डिजिटल गव्हर्नन्स, फेसलेस कर प्रणाली आणि जेम पोर्टलमुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम झाले आहे.
भारत आता जगाशी समानतेच्या नात्याने संवाद साधत आहे. भारताला व्यापार हवा आहे, गुंतवणूक हवी आहे, तंत्रज्ञान हवे आहे, पण आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या आधारावर! रशिया-युक्रेन युद्धाच्या काळातही भारताने स्वतःचे राष्ट्रीय हित सर्वोच्च ठेवले. जगाच्या दबावाखाली न झुकता स्वतंत्र भूमिका घेण्याचे सामर्थ्य आज भारताने दाखवून दिले आहे.
आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘पीएलआय’ योजनांमुळे उत्पादन क्षेत्राला नवी गती मिळाली आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात अनेकपटीने वाढ झाली आहे. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी मोठ्या गुंतवणुकी आकर्षित झाल्या असून भारत जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. स्टार्टअप संस्कृतीला मिळालेल्या प्रोत्साहनामुळे देशात दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्स आणि शेकडो युनिकॉर्न निर्माण झाले आहेत.
मोदी सरकारच्या १२ वर्षांत भारताने आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा अभिमानाने पुनर्शोध घेतला आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल लोक, केदारनाथ पुनर्विकास यासारख्या प्रकल्पांनी देशाच्या आध्यात्मिक चेतनेला नवी ऊर्जा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करीत आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या मोदीजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ‘पंचतीर्थ’, बिरसा मुंडा जयंतीला ‘जनजातीय गौरव दिवस’, सरदार पटेलांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्मान, कर्तव्य पथ आणि नवीन संसद भवन हे राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक बनले आहेत.
महाराष्ट्र तर सर्वाधिक लाभ मिळवणारे राज्य ठरले. महाराष्ट्राची प्रत्येक अडचण मोदीजींनी सोडविली. कोणताही प्रकल्प असो, त्याला लगेच मदत केली. इंदूमिल स्मारकाला जागा देणे असो, अमरावतीत टेक्सटाईल पार्क, वाढवणचे बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी, अटलसेतू, कोस्टल रोड, मेट्रो अशा प्रत्येक प्रकल्पाच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले.
आज भारताला जग केवळ मोठी बाजारपेठ म्हणून नव्हे तर जागतिक समस्यांवर उपाय सुचवणारा, विश्वासार्ह आणि जबाबदार देश म्हणून पाहत आहे. आजचा भारत आत्मविश्वासाने जगासमोर उभा आहे. विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी ही १२ वर्षे भक्कम पायाभरणीची ठरली आहेत. विश्वास, विकास आणि जनसहभागाची ही यात्रा पुढील काळातही अधिक वेगाने पुढे जाईल, हा देशवासीयांचा दृढविश्वास आहे.