
प्रभंजनमधून भारतीय जनता पक्षाबद्दल जे काही मी लिहितो, त्यानं नाराज झालेले चार तरुण मला भेटायला आले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक होते. त्यांच्या मते ‘संघानं घडवलेल्या हजारो कार्यकर्त्यांना सत्तेसाठी भाजपनं देशात आणि राज्यात जो व्यवहार चालवलाय तो पटत नाही, रुचत नाही; पण जे काही चाललंय ते थांबवा, असंही त्यांना म्हणवत नाही. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ असं जे म्हणतात, तशी या कार्यकर्त्यांची अवस्था झालीय. काही कार्यकर्त्यांना जे काही चाललंय, ते पटत नसलं तरी त्याशिवाय अन्य पर्याय नसल्यानं चाललंय ते चांगलंच आहे, असं मानावं लागतंय. तसं म्हणायची वेळ येईल, तेच म्हणावंही लागतंय! माझ्याकडं आलेले तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजपात फरक असायचाच, असं म्हणत होते. सत्ता हेही परिवर्तनाचं एक साधन आहे. संघाला समाजात जे घडवून आणायचंय, त्याला सत्ता भाजपच्या हातात असण्यानं सहाय्यच होईल.
सध्या संघाच्या विचार-आचारानुसार काही गोष्टी घडत नसल्या तरी हळूहळू भाजपला संघ आचार-विचार आणि सरकारचा व्यवहार यात सुसंगती आणावीच लागेल. आज भाजपात संघातून घडलेल्या कार्यकर्त्यांखेरीज अन्य अनेक जण आहेत. त्यांच्यामुळं आणि काही प्रमाणात काही घटना दोषास्पद घडत असतीलही; पण हळूहळू सर्वांनाच संघविचार-आचार मानावेच लागतील, असं मानणारे ते तरुण होते. त्यांना केंद्र सरकारनं घेतलेल्या काही निर्णयांचं समर्थन करणंही अशक्य होत होतं, राज्यातल्या नेत्यांचं वागणंही रुचत-पटत नव्हतं. केंद्र सरकारचं मूल्यमापन आणि सरकारविरोधात कठोर टीका करणं योग्य नाही. त्यांना सांभाळून घ्यायला हवंय. सुधारणा करायला वेळ द्यायला हवाय, असा त्यांचा आग्रह होता. आपल्या विचारांशी ही मुलं प्रामाणिक होती. त्यांना राजकारणी मतलबी बुद्धीचा विलास दाखवायचा नव्हता. भाजप चुकत असेल; पण त्याला राज्य करू द्यायला हवंय, असं त्यांना वाटत होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहनजी भागवत यांची वेळोवेळी होणारी वक्तव्ये, संसदेतला गोंधळ, काश्मीरमधली परिस्थिती, नोटाबंदी, जीएसटी, न्यायाधीशांचं प्रकरण, पाकिस्तान-चीनची घुसखोरी, महागाई, बेकारी, राज्यातली आंदोलनं अशा काही बाबी बोलण्यातून निघाल्या. त्या मुलांना माझं लिहिणं डाचत होतं, तसंच सत्ताधाऱ्यांचं, भाजप नेत्यांचं वागणंही डाचत होतं. मी त्यांना म्हटलं, ‘संघ वा भाजपविरोधात लिहिताना त्यांचं सरकार कोलमडून पडावं, त्यांची सत्ता जावी, असा माझा उद्देश निश्चितच नाही; पण जे गैर आहे ते गैर म्हणणं हे पत्रकारचं काम आहे आणि ते करण्याचाच माझा प्रयत्न आहे; पण मोदी, शहा, फडणवीस, भागवत यांच्यासह सारे भाजप नेते हे तत्त्वाधिष्ठित, मूल्याधिष्ठित राजकारण करण्याची भाषा करत होते. आपण संघात घडलेले कार्यकर्ते आहोत हे दाखवत होते, म्हणत होते. मंत्री असले तरी संघ शाखेवर जाऊन ध्वजप्रणाम करत होते. हे सारे वरून कीर्तन करतानाच त्यांच्या कारभाराचा मात्र तमाशा सुरू आहे. खुर्ची मिळावी म्हणून त्यांनी तत्त्वशून्य तडजोडी केल्याच होत्या. आता खुर्ची मिळाल्यावर मूल्यांना डावलण्याची त्यांची धिटाई वाढतेय. काँग्रेसचा चोरबाजार संपावा, मूल्याधिष्ठित राज्य असावं म्हणून लोकांनी भाजपला आपलंसं केलं, सत्तेवर बसवलं; पण निवडणूक काळात दिलेली आश्वासनं ‘जुमला’ म्हणत धुळीला मिळालीत, सामान्य माणसाला जीवन जगणं असह्य होऊ लागलंय. सोशल मीडियावर सरकारची लक्तरं काढली जाताहेत. केवळ जनतेशीच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी प्रतारणा केलीय असंच म्हणावं लागेल. हे सगळं इतक्या सहजपणे होऊ देण्यानं भाजपचं परिवर्तन हे पक्क्या बनेल, बातामारू, धोकेबाज, स्वार्थी राजकारण्यांत होईल म्हणून जे तत्त्व मानतात, मूल्यांची कदर करतात, साधनशूचितेचा आग्रह धरतात, अशा सर्वांनी आपली नाराजी व्यक्त करायला हवी. ती वृत्तपत्रातून टीका करूनच व्यक्त व्हायला हवी, असं नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून, पत्रं लिहून त्याबाबत आपलं मत कळवूनही नाराजी व्यक्त करायला हवीय. तुम्ही तुमच्या बळानं नव्हे, आमच्या बळानं खुर्चीवर बसला आहात, स्वतःला सावरा, तुमच्यावर आमची नजर आहे, हे लक्षात ठेवा. बहकू नका. तुम्हाला आम्ही मोकाट स्वार्थामागे धावू देणार नाही, हे सातत्यानं लोकांनी लोकप्रतिनिधींना सांगायला हवंय. पक्षाचे धिंडवडे निघत असताना सारे गप्प का? मी हे सांगण्याचं काम करतोय!’
त्या तरुणांनी हे ऐकल्यावर ‘अशाप्रकारे सांगून काय होणार,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तेव्हा मी त्यांना गोळवलकर गुरुजी सांगत ती गोष्ट ऐकविली. ती गोष्ट अशी, एका विमानात एक पायलट आणि एक हवाईसुंदरी असे दोघेच योगायोगानं होते. पायलट त्या हवाईसुंदरीला वश करण्याची संधी शोधत होता; पण ती दाद देत नव्हती. त्याला आज संधी प्राप्त झाली होती. त्याने आपोआप विमान उडत राहण्याची व्यवस्था करून त्या हवाईसुंदरीवर झडप घातली. झटपट उरकून घ्यायची त्याची धडपड होती आणि ती हवाईसुंदरी जीवाच्या आकांतानं धडपडत ओरडत होती. पायलट तिला म्हणाला, ‘‘कशासाठी एवढी बोंबाबोंब करतेस? कोण येणार तुझ्या मदतीला? आपण २५ हजार फुटांवर आहोत. विमानात आपण दोघेच आहोत. निमूटपणे माझी इच्छा पूर्ण कर. कुणाला काही कळणार नाही.’’ हवाईसुंदरीनं म्हटलं, ‘‘माझ्या मदतीला कुणी येणार नाही, माझी बोंब कुणाला ऐकायला जाणार नाही, हे सगळं मला कळतंय; पण हे तुझं विमान कधीतरी खाली उतरणार आहे. मी निमूटपणे तू जे करतो आहेस ते करू दिलं तर तुझ्या या करण्याला माझी संमती होती, असंच म्हटलं जाईल. मी विमान उतरल्यावर तुझ्याविरुद्ध तक्रार करणारच. तेव्हा मला पहिला प्रश्न विचारला जाईल, तू काय केलंस? त्यावेळी मला ही बोंब मदत करेल. माझ्या सद्सद्विवेक बुद्धीसाठी हे आवश्यक आहे..!’’
गैरगोष्टींबद्दलचा आपला संताप-विरोध व्यक्त झाला नाही तर गैरगोष्टीला आपलीही संमती आहे, असं मानलं जाईल. म्हणून आपला विरोध, आपला निषेध व्यक्त व्हायला हवाय, नोंदला जायला हवाय. गुरुजींची ही गोष्ट लक्षात घेऊनच भाजपच्या कारभाराबद्दलची नाराजी नोंदवण्याची काळजी घेतली जायला हवीय. वाकडं पाऊल पडतानाच त्याला अडवायला हवंय, नाहीतर सरळ वाटही वाकडी होऊन जाते. महात्मा गांधी आपल्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या मातब्बरांनाही मोकळे सोडत नसत. गांधींजीच्या नंतर गांधीवादी म्हणवणाऱ्यांनी हाच आग्रह ठेवून सत्तेवरच्या खादीधाऱ्यांना लोकांपुढं उभं करण्याचं धैर्य दाखवलं असतं, तर काँग्रेसमध्ये खादी घालून काळे धंदे करणाऱ्यांची गर्दी झालीच नसती; पण सत्ता हातात ठेवण्यासाठी काही तडजोडी करायलाच हव्यात असं मानून गांधीवादी, गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे कान-डोळे-तोंड बंद करून सर्वोदय साधू लागले आणि त्यांना गुंडाळून ठेवून काँग्रेसवर व्यवहारी, व्यावसायिक मंडळींचा कब्जा झाला. तत्त्वनिष्ठ, मूल्याधिष्ठित राजकारण दूर ठेवून तडजोडी करण्याची चटक जशी वाढेल, तसे संघवाले राजकारणात लुडबुड करू नयेत, हा आग्रहही वाढणार. तुमचं सुसंस्कृत, राष्ट्रनिष्ठ नागरिक बनवण्याचं काम सुरक्षितपणे चालावं म्हणूनच आम्ही आम्हाला वाटेल तशी सत्ता राबवतो आहोत. आमच्याकडं फार लक्ष देऊ नका, तुमचं काम संघस्थानावर चालू ठेवा, असं सांगून संघाच्या कार्यकर्त्यांना गुंडाळलं जाईल. याचा अनुभव अलीकडच्या काळात अनेकदा आलाय. भाजपची सत्ताधारी मंडळी, मंत्रिगण संघस्थानावर ध्वज प्रणामासाठी, कर्मकांड उरकायला अगदी गाजावाजा करून येत राहतील; पण खुर्ची कायम राहण्यासाठी नको त्या माणसांशी, नको त्या तडजोडी करून, नको तेवढी लाचारी आणि नको तेवढा उन्मतपणा दाखवत काँग्रेसवाल्यांच्या थाटात कारभार करत राहतील. हे अनेक प्रकरणात दिसून आलंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्ताकांक्षा नाही. त्याला सांस्कृतिक-सामाजिक पुनरुत्थानाचं कार्य करायचं आहे आणि सुसंस्कारित, सुजाण, शिस्तबद्ध नागरिकांची समर्पित भावनेनं सर्व कार्य करणारी संघटित अशी शक्ती समाजात उभी करायचीय. ह्यासाठी आवश्यक तर सत्ताही हवीय, असं मानणाऱ्यांनी भाजपला यासाठी निवडलंय. भाजपनं याचं भान ठेवलंय, असं मात्र दिसत नाही. भाजपात सत्तातुरांची गर्दी झाली आहे. त्यांना सामाजिक दबाव, नैतिकतेचं भय राहिलं नाही. कुणालाही न जुमानणारे हे नेते कार्यकर्त्यांना कसे जुमानणार? या सत्तातुरांना कोण आवरणार? संघाची शिस्त, वैचारिक बैठक, तत्त्वनिष्ठा, मूल्याधिष्ठित राजकारण आज कुठंतरी हरवलंय, असं वाटण्यासारखी स्थिती दिसून येतेय!