अमानषतेचा कळस

अमानषतेचा कळस

कन्हैयालाल याच्यावर धारदार शस्त्राचे वार करून त्याचा शिरच्छेद करण्यात आला

उदयपूर शहरात कन्हैयालाल नावाच्या एका व्यक्तीची दिवसाढवळ्या त्याच्या दुकानात अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या कन्हैयालाल याने, भाजपच्या निलंबित वादग्रस्त प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावरील एक क्लिप शेअर केली होती. त्यावरून दोघा धर्मांध मुस्लिमांनी त्याची हत्या करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे कृतीही केली. कन्हैयालाल याच्यावर धारदार शस्त्राचे वार करून त्याचा शिरच्छेद करण्यात आला. ही हत्या करताना मारेकऱ्यांपैकी एक जण व्हिडीओ चित्रण करीत होता. कन्हैयालाल याची हत्या झाल्यानंतर मारेकऱ्यांनी सदर व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर टाकली आणि त्यानंतर राजस्थानमध्ये संतापाची एकच लाट उसळली. या हत्येच्या निषेधार्थ लोक रस्त्यांवर उतरले. परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून उदयपूर परिसरातील इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली. संपूर्ण राज्यात एक महिनाभरासाठी १४४ कलम जारी करण्यात आले. उदयपूर शहराच्या सात भागांमध्ये संचारबंदी जारी करण्यात आली. या घटनेचे पडसाद देशाच्या विविध भागांमध्ये उमटले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जनतेला संयमाचे आवाहन केले. तसेच सदर घटना चित्रित केलेला व्हिडीओ पाहू नका, असे आवाहनही केले. ही नृशंस हत्या ज्या दोघांनी केली त्यांनी अत्यंत योजनाबद्ध रीतीने हे हत्याकांड घडविले. कन्हैयालाल याची हत्या करणाऱ्या दोघांची नावे मोहम्मद रियाझ अख्तरी आणि गौस अख्तरी अशी आहेत. या हत्येपूर्वी ११ दिवस आधी मोहम्मद रियाझ अख्तरी याने एक क्लिप रेकार्ड केली होती आणि त्यामध्ये, आपण अशी हत्या करणार असल्याचे म्हटले होते. एवढ्यावरच तो थांबला नाही. आपल्या हातून पहिला खून झाल्यानंतर बाकीच्यांनी आपले अनुकरण करावे, असेही त्याने म्हटले होते. ज्याने इस्लामविरुद्ध गुन्हा केला आहे त्याचा शिरच्छेद केल्यानंतर व्हिडीओ ‘व्हायरल’ करू, असेही त्याने म्हटले होते. अशाप्रकारचे आणखी हल्ले होतील, असे सांगतानाच हल्लेखोराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकाविले होते. हत्या करणाऱ्यांना योग्य ये शासन केले जाईल, असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. आता या भयानक हत्येची दखल केंद्र सरकारने घेतली असून राष्ट्रीय तपास यंत्रणेने या संदर्भात तपास करावा, असे आदेश दिले आहेत. ही हत्या म्हणजे दहशतवादी कृत्य आहे का, या हत्येमागे एखादी संघटना आहे का, काही आंतरराष्ट्रीय धागेदोरे आहेत का, या सर्वांचा तपास करण्याचे आदेश या यंत्रणेस केंद्रीय गृहखात्याने दिले आहेत. राजस्थानमध्ये झालेले हत्याकांड लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले. मात्र राजस्थान सरकारने कन्हैयालाल याच्या तक्रारीची दखल घेऊन त्याला वेळीच योग्य ते संरक्षण दिले असते तर त्याची हत्या टळली गेली असती! दरम्यान, ही हत्या घडल्यानंतर काँग्रेस आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करणे सुरु झाले आहे. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे ही हत्या झाल्याचे भाजपने म्हटले आहे. तर या परिस्थितीला भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचा आरोप राजस्थानचे एक मंत्री परसादीलाल मीणा यांनी केला आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर हे सर्व आता थांबणार नाही, असे भाकीत करण्यासही ते विसरले नाहीत. भाजप नेते राज्यवर्धन राठोड यांनी, मुस्लिमांच्या तुष्टीकरणातून अशा घटना घडल्या असल्याचा आरोप केला. असे आरोप होत असले तरी काही मुस्लीम नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यामध्ये एमआयएमचे असादुद्दीन ओवैसी, रझा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नूरी, जमियत इ उलेमा, महाराष्ट्रचे सरचिटणीस गुलझार आझमी यांचा समावेश आहे. एखाद्या अन्य व्यक्तीचा जीव घेण्याचा अधिकार मुस्लीम व्यक्तीस नाही, त्या दोघांनी जे कृत्य केले आहे ते कायद्याविरुद्ध आणि शरियतच्या विरुद्ध आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा कायदा पाळला पाहिजे, असे इस्लाम शिकवितो, असे या मुस्लीम नेत्यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी, श्रद्धेच्या नावाखाली केली जाणारी क्रूरता अक्षम्य आहे. अशा हिंसक हल्ल्याद्वारे जे दहशत पसरवितात त्यांना त्वरित शासन झाले पाहिजे, आपण सर्वांनी मिळून द्वेषाचा पराभव करणे आवश्यक आहे, असेही म्हटले आहे. उदयपूरमध्ये दिवसाढवळ्या जी नृशंस हत्या झाली त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे! अशा प्रकारच्या तालिबानी प्रवृतींनी आणखी डोके वर काढण्याआधीच त्यांचा पुरेपूर बंदोबस्त करण्याची दक्षता सर्वांनीच घेतली पाहिजे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in