दूरदृष्टी असणारे रामोजी!

दूरदृष्टी, उद्यमशीलता आणि धडाडी असेल तर सामान्य घरातील माणूसही किती मोठी मजल मारू शकतो, हे रामोजी राव यांच्या जीवनचरित्रातून समजते.
दूरदृष्टी असणारे रामोजी!
Published on

-स्वाती पेशवे

श्रद्धांजली

दूरदृष्टी, उद्यमशीलता आणि धडाडी असेल तर सामान्य घरातील माणूसही किती मोठी मजल मारू शकतो, हे रामोजी राव यांच्या जीवनचरित्रातून समजते. जागतिक पातळीवर नोंद घेतल्या गेलेल्या रामोजी फिल्म सिटीप्रमाणेच ‌‘ईनाडू‌’, ‌‘ई-टीव्ही‌’सारख्या माध्यमातून त्यांनी मनोरंजन, प्रकाशन, टेलिव्हिजन क्षेत्रात आपला ठसा उमटवला. खेरीज अन्य व्यवसायक्षेत्रांमध्येही आपली ओळख निर्माण केली.

रामोजी ग्रुपचे अध्यक्ष आणि ई-टीव्ही ग्रुपचे प्रमुख रामोजी राव यांच्या निधनामुळे देशातील एक द्रष्टा उद्योजक काळाच्या पडद्याआड गेला आहे. आंध्र प्रदेशातील पेडापापरपुडी येथे एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामय्या अर्थात रामोजींनी विविध क्षेत्रामध्ये अनमोल कामगिरी बजावून प्रसिद्धीची शिखरे पादाक्रांत केली असली तरी शेतीशी असणारे त्यांचे घट्ट संबंध अखेरपर्यंत अभंग होते. साहित्याचा उत्तम अभ्यास असणारी ही व्यक्ती नंतरच्या काळात यशस्वी व्यापारी आणि माध्यम उद्योजक म्हणून ख्यातकीर्त झाली.

१० ऑगस्ट १९७४ रोजी विशाखापट्टणममध्ये सुरू केलेल्या त्यांच्या ‌‘ईनाडू‌’ या वृत्तपत्राला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पुढील चार वर्षांतच ते मोठे प्रकाशन झाले. ‌‘ईनाडू‌’ व्यतिरिक्त रामोजी राव जगातील सर्वात मोठे फिल्म प्रॉडक्शन हाऊस असणाऱ्या ‌‘रामोजी फिल्म सिटी‌’, ‌‘रामोजी ग्रुप‌’, ‘ई टीव्ही नेटवर्क‌’ आणि फिल्म प्रोडक्शन कंपनी असणाऱ्या ‌‘उषा किरण मूव्हीज‌’चे प्रमुख होते. खेरीज ‌‘मार्गदर्शी चिट फंड‌’, ‌‘रमादेवी पब्लिक स्कूल‌’, ‌‘डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स‌’ आणि ‌‘प्रिया फूड्स‌’ यांसारखे इतर व्यवसायही रामोजी ग्रुपच्या मालकीचे आहेत.

रामोजी यांनी अशा नानाविध क्षेत्रात ठसा उमटवला असला तरी आजही सर्वसामान्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या आणि १९९६ मध्ये बांधल्या गेलेल्या ‘रामोजी फिल्म सिटी’चे महत्त्व काही वेगळेच म्हणावे लागेल. ती रामोजी रावांची सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. काळाच्या पुढे जाऊन विचार करत प्रत्यक्षात उतरलेले त्यांचे हे स्वप्न आजही बघणाऱ्याला चकित करणारे आहे. या फिल्म सिटीमध्ये अनेक मोठे स्टुडिओ असून तिथे अनेक चित्रपटांचे सेट उभारले जातात. ‌‘चेन्नई एक्स्प्रेस‌’पासून ‌‘बाहुबली‌’पर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. ‌‘बाहुबली‌’ चित्रपटात दाखवलेला तो मोठा धबधबा फिल्म सिटीमध्येच बांधला गेला होता. ‌‘पुष्पा २‌’, ‌‘सालार‌’, ‌‘आरआरआर‌’सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे शूटिंग त्यांच्या फिल्म सिटीमध्ये झाले आहे. ‌‘चेन्नई एक्स्प्रेस‌’मधील ‌‘बन के तितली...‌’ हे गाणे तसेच विद्या बालनच्या ‌‘डर्टी पिक्चर‌’मधील ‌‘ओ ला ला...‌’ हे गाणेही येथे शूट करण्यात आले आहे. ही यादी कितीही लांबू शकते. पन्नासहून अधिक लहान-मोठ्या सुंदर बागा, ५० पेक्षा जास्त स्टुडिओ, अधिकृत सेट, डिजिटल फिल्ममेकिंग सुविधा आणि उच्च-तंत्रज्ञान प्रयोगशाळा असे इथले वैभव अचंबित करणारे आहे. त्यामुळेच १,६६६ एकरमध्ये पसरलेली ‘रामोजी फिल्म सिटी’ ही चित्रपट निर्मात्यांबरोबरच मनोरंजनविश्वाबद्दल, फिल्ममेकिंगबद्दल आकर्षण असलेल्या व्यक्तींसाठीही महत्त्वाची आहे. या सिटीला पर्यटन स्थळ बनवण्याची दूरदृष्टी दाखवल्यामुळेच आज जगभरातून दररोज काही हजार पर्यटक इथे येत असतात.

सर्वसामान्यांना आकर्षित करण्यासाठी रामोजींनी या अनोख्या सिटीमध्ये वेळोवेळी कार्निव्हल आयोजित करण्यास सुरुवात केली. दसरा-दिवाळी, नवीन वर्ष किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये होणाऱ्या या कार्निव्हल्सच्या आयोजनातूनही राव यांची व्यावसायिक दृष्टी दिसून येते. या कार्निव्हल परेड लहानग्यांबरोबरच सर्व वयोगटातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या. विदूषक, नर्तक, जुगलबंदी आणि आनंदाचे इतर सर्व रंग मिसळल्याने त्याला मोठी पसंती मिळाली. रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रत्येक रंगाच्या फुलांची अभूतपूर्व विविधता बघायला मिळते. ड्रीम व्हॅली पार्कमधील कारंज्यांभोवती फेरफटका मारताना स्वप्नातील खोऱ्यात आल्याचा भास होतो. अंब्रेला गार्डनमध्ये फुलांपासून बनवलेल्या छत्र्यांच्या रांगा मनोवेधक ठरतात. निर्मल गार्डनमध्ये अनेक वन्य प्राण्यांच्या आकृती एखाद्या अभयारण्यात आल्याचा भास निर्माण करतात. चहाच्या बागेच्या देखाव्यामुळे तर प्रेक्षकांना आसाम किंवा दार्जिलिंगमध्ये असल्यासारखे वाटते, तर दुसरीकडे जपानी गार्डनमध्ये गेल्यावर पर्यटकांना आपण जपानमध्येच पोहोचल्याचा भास होतो. त्याचप्रमाणे डेझर्ट गार्डन आणि कॉम्बो गार्डनचे विलोभनीय दृश्यही बघणाऱ्याला भुरळ घालते. या जादूई नगरीची आणखीही अनेक वैशिष्ट्ये रामोजींची सौंदर्यदृष्टी आणि कल्पकता दाखवणारी ठरते. जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेल्या ‌‘रामोजी फिल्म सिटी‌’त अनेकांनी असा विलोभनीय अनुभव घेतला आहे.

रामोजी फिल्म सिटीची सैर केल्यामुळेच सर्वसामान्यांना चित्रपटांमध्ये पाऊस कसा पडतो, विजांचा गडगडाट कसा होतो, ॲक्शन सीन कसे शूट केले जातात, चित्रपटांमध्ये रेल्वे स्थानके आणि विमानतळ कुठून येतात, चित्रपटामध्ये शहरे कशी असतात, गावे कशी असतात? इमारती बहुद्देशीय कशा असू शकतात हे सगळे समजते. एकच इमारत चार वेगवेगळ्या प्रकारे कशी वापरली जाते, हे पाहायला मिळते. म्हणूनच त्यांच्या या अनोख्या प्रयोगाला आणि प्रकल्पाला जगाची दाद मिळाली. इथे देशभरातील सुमारे ७५० कलाकार कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतात. चित्रपट निर्मितीशी निगडित अनंत अडचणी पाहून जिथे चित्रपट निर्माते फक्त स्क्रिप्ट घेऊन येतील आणि बनवलेला चित्रपट घेऊन परत जातील, अशी फिल्म सिटी उभारण्याचे रामोजी यांनी ठरवले आणि आपले हे स्वप्न सत्यातही उतरवले. येथे दरवर्षी जवळपास २०० चित्रपटांचे चित्रीकरण होते. आत्तापर्यंत येथे सुमारे २,००० चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

एकूणच रामोजींची जीवनकथा व्यवसायविस्तार कसा करावा, हे दाखवून देणारी आहे. त्यांनी उत्पन्नाचे अनेक स्रोत शोधले आणि कामात कमालीचे सातत्य राखत यशस्वी होण्याचा मंत्र जगाला दिला. म्हणूनच आज अब्जाधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने त्यांचे जीवनचरित्र अभ्यासायला हवे. कठोर मेहनत आणि काळाच्या पुढे जात, बाजारातील मागणीचा अभ्यास करत नियोजन केले तर एखादा सामान्य शेतकरी घरातील मुलगाही ४१,७०६ कोटी रुपयांचा मोठा आकडा गाठीशी बांधू शकतो, हे सत्य त्यांचे विस्तारलेले साम्राज्य पाहताना समोर येते. आज त्यांचे ‌‘ई-टीव्ही नेटवर्क‌’ दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय नेटवर्क आहे. रामोजी राव तेलुगु बातम्या आणि मनोरंजन चॅनेलच्या मोठ्या समुहाचे अध्यक्ष होते. त्याच्या अनेक शाखा असून त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये कार्यक्रम आणतात. ई-टीव्ही तेलुगु, ई-टीव्ही प्लस, ई-टीव्ही सिनेमा, ई-टीव्ही आंध्र प्रदेश, ई-टीव्ही तेलंगणा, ई-टीव्ही अभिरुची, ई-टीव्ही लाईफ यासारखी अनेक क्षेत्रे हा समूह कव्हर करतो. थोडक्यात रामोजींनी एकही संधी हातातून निसटू दिली नाही. मनोरंजन आणि प्रकाशन व्यवसायाबरोबर त्यांनी खाद्यपदार्थांचा व्यवसायही चालवला. त्यांनी ‌‘उषोदय एंटरप्रायझेस‌’ अंतर्गत ‌‘प्रिया आचार‌’ आणि ‌‘सोमा फ्रूट ड्रिंक‌’सारखी उत्पादने लाँच केली. ईनाडूप्रमाणेच ‘प्रिया आचार’ आजही आंध्र प्रदेशातील प्रत्येक घरात लोकप्रिय आहे. सोमा फ्रूट ड्रिंक देखील पॅकेटमध्ये विकले जाणारे पहिले पेय म्हणून ओळखले जाते. उद्यमशीलतेचा परिचय देणारी त्यांची ही ओळख कधीही मिटणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in