‘तिरंगा’ देशाची आन-बान-शान

तिरंगा भारतासाठी व भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अनमोल रत्न आहे. कारण यातूनच क्रांतीची मशाल उदयास आली व १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडला. यात सूर्याचा प्रखर तेजोमय प्रकाश, चंद्राची शांतीमय प्रतिमा, लखलखत्या ताऱ्यांचे प्रकाशमय वातावरण निर्माण करणे आणि वायू देवतेच्या सहवासाने विराजमान होऊन देशाच्या शूरवीरांना व क्रांतिकारकांना तिरंगा सांगतो की, ‘मेरा देश महान’.
‘तिरंगा’ देशाची आन-बान-शान
संग्रहित छायाचित्र
Published on

- रमेश लांजेवार

विशेष

तिरंगा भारतासाठी व भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अनमोल रत्न आहे. कारण यातूनच क्रांतीची मशाल उदयास आली व १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडला. यात सूर्याचा प्रखर तेजोमय प्रकाश, चंद्राची शांतीमय प्रतिमा, लखलखत्या ताऱ्यांचे प्रकाशमय वातावरण निर्माण करणे आणि वायू देवतेच्या सहवासाने विराजमान होऊन देशाच्या शूरवीरांना व क्रांतिकारकांना तिरंगा सांगतो की, ‘मेरा देश महान’.

शहिदांच्या आठवणी पुन्हा-पुन्हा जागृत व्हाव्यात व नवीन पिढीला शहिदांची, क्रांतिकारकांची, थोरमहात्म्यांची आठवण निरंतर हृदयात राहावी व इतिहास जागृत राहावा, या दृष्टिकोनातून १५ ऑगस्टला प्रत्येक घरावर तिरंगा फडकावून देशाची आन-बान-शान उंचावण्यासाठी सर्वांनीच अग्रेसर राहायला हवे.

महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्यांनी १५ ऑगस्टला वृक्ष लावण्याचा निर्धार करायला हवा. यामुळे १५ ऑगस्टला लावलेले वृक्ष क्रांतिकारकांच्या आठवणीच्या निमित्ताने अनंत काळापर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहील व संपूर्ण भारतात आपल्याला हिरवागार गालिचा सगळीकडेच दिसून येईल. १५ ऑगस्टला स्वागत करण्यासाठी आपल्याला संपूर्ण नद्यांचा खळखळाट ऐकू येईल, समुद्र देवता आपल्या लाटांच्या खुशीने स्वागत करेल, अशा प्रकारे स्थल, जल, वायू देवता १५ ऑगस्टला स्वागतासाठी सज्ज आहे. देशातील वाढते प्रदूषण व दिवसेंदिवस कमी होत असलेले ऑक्सिजनचे प्रमाण यामुळे पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवजंतू भयभीत आहेत. याकरिता १५ ऑगस्टचे औचित्य साधून महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्यांनी १५ ऑगस्टला झाडे लावण्याचा संकल्प करावा. या वृक्षलागवडीमुळे देशातील वातावरण प्रफुल्लित होईल व आपले पूर्वज आशीर्वाद देतील आणि त्यांना अभिमान वाटेल की, स्वतंत्र भारतात सर्वकाही ठीक आहे. वृक्षलागवडीमुळे गुरांना चारा, सर्वांना शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळेल. आपल्या पूर्वजांनी अनेक कठीण प्रसंगांशी सामना करत १९४७ला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज भारताला स्वतंत्र होऊन ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण भारतात जय्यत तयारी सुरू आहे. ही अत्यंत आनंदाची व स्वागतार्ह बाब आहे. देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर महात्मे, क्रांतिकारक, जहालवादी नेते, मवाळवादी नेते यांच्या एकसुत्री कार्यक्रमाने व बलिदानाने १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. त्यामुळेच आज आपण स्वतंत्रपणे मोकळा श्वास घेत आहोत. त्याकाळी स्वातंत्र्यासाठी घराघरातून आवाज बुलंद व्हायचा व स्वातंत्र्यासाठी संघर्षमय वातावरण निर्माण करून संपूर्ण युवावर्ग इंग्रजांशी टक्कर घेण्यासाठी काहीही करायला तयार रहायचे. आज आपल्याला आपल्या क्रांतिकारकांचे, शहिदांचे, थोरमहात्म्यांचे अनुकरण करून त्यांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून आणि देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षे पूर्ण होत असल्याचे पाहून प्रत्येकांनी १५ ऑगस्टला आपापल्या घरावर तिरंगा फडकविलाच पाहिजे, अशी प्रतिज्ञा देशाच्या १४० कोटी जनतेने घेतली पाहिजे. असे जर झाले, तर तिरंगा एवढ्या उंचावर गेलेला आपल्याला दिसेल की, संपूर्ण जग आश्चर्यचकित होईल व म्हणतील खरोखरच 'भारत देश महान'. कारण जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की, याठिकाणी अनेक धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक एकोप्याने राहतात.

जेव्हा देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा एकनिष्ठेने कार्य करतात. त्यामुळे भारतातील १४० कोटी जनता आपापल्या घरावर तिरंगा फडकवून जगाला आपली ऐकता अवश्य दाखवेल. कारण भारतातील छोटे-मोठे सर्वच जाणतात की, देश स्वतंत्र करण्यासाठी शूरवीरांना, क्रांतिकारकांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या, बलिदान द्यावे लागले, फासावर जावे लागले, घरदार सोडावे लागले. तेव्हा भारत स्वतंत्र झाला. आपण शूरवीरांना, क्रांतिकारकांना, थोरमहात्म्यांना सुईच्या टोकाएवढीही मदत करू शकत नाही. परंतु १५ ऑगस्टला प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या पूर्वजांच्या आठवणी ताज्या करू शकतो. आजही प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यात आपल्या पूर्वजांच्या आठवणी आहेत व स्वाभिमान आहे, यात दुमत नाही. कारण जोपर्यंत सूर्य-चंद्र, आकाश-पाताळ आहे, तोपर्यंत भारतभूमीतील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्यवीरांना, शहिदांना, क्रांतिकारकांना, थोरमहात्म्यांना आपल्या काळजात ठेवून स्मरणात ठेवील. आपले पूर्वज आपल्याला कुठून तरी अवश्य पाहत असतीलच. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येकांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवून शहिदांना स्मरण केले पाहिजे व याच दिवसाचे औचित्य साधून प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावून वाढत्या प्रदूषणावर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे प्रत्येक झाडांच्या पानात, फुलांत आपल्याला क्रांतिकारकांचे दर्शन अवश्य होईल.

आज देशाची स्थलसेना, वायुसेना, नौसेना तिरंग्याचा स्वाभिमान अबाध्य रहावा, यासाठी अहोरात्र देशाच्या सुरक्षेसाठी तत्पर दिसून येतात. त्यामुळे तिरंगा देशातील सीमावर्ती भागातील सैनिकांसाठी भारतमातेचा आत्मा आहे. जय हिंद!

(लेखक माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in