इतिहासाचे गुलाम होण्याचे नाकारण्यासाठी

इतिहासाला कलाटणी मिळण्याचे अनेक प्रसंग त्या त्या राष्ट्रांच्या अथवा समाजांच्या इतिहासातूनच निर्माण होत असतात.
इतिहासाचे गुलाम होण्याचे नाकारण्यासाठी

-संजय सोनवणी

असेही असते

इतिहासाला कलाटणी मिळण्याचे अनेक प्रसंग त्या त्या राष्ट्रांच्या अथवा समाजांच्या इतिहासातूनच निर्माण होत असतात. आज मनाला सुखद अभिमानास्पद संवेदना देणारा इतिहास वर्तमान सुसह्य करत असला तरी इतिहास हा आपल्याला शिकवला गेला त्यापेक्षा विपरीत होता हे सत्य सामोरे येते तेव्हा जी समाजमानसिक पडझड होते ती अन्य कोणत्याही विनाशक गोष्टींपेक्षा भयंकर असते. इतिहास हा अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची आणि समजावून घेण्याची बाब आहे.

इतिहासाचे दृश्य आणि अदृश्य रूप आणि त्यातून निर्माण होणारे विचित्र ताण हा सर्वच जागतिक समाजासमोरील एक प्रश्न आहे. त्याची व्याप्ती प्रत्येक नागरिकाच्या मानसिकतेशी जाऊन भिडते आणि हीच मानसिकता वर्तमान आणि भविष्यातील समाजजीवन आणि स्वाभाविकपणेच त्या त्या राष्ट्राचे भविष्य सुनिश्चित करत असल्याने तर इतिहास हा तसा निरुपद्रवी वाटणारा घटक अण्वस्त्रांच्या विस्फोटांपेक्षा गंभीर रूप धारण करत असतो. भारताला इतिहास असला तरी तो वास्तवाधारित “इतिहास” आहे असे दुर्दैवाने म्हणता येत नाही. आपला बहुतेक इतिहास मिथके, दंतकथा आणि आत्मप्रौढी किंवा न्यूनगंडात्मक आणि बचावात्मक पद्धतीने लिहिला गेला असल्याने आपल्या इतिहासाचे सर्वांगीण तथ्यात्मक दर्शन घडेल आणि त्याच पद्धतीने आकलन करून घेतले जाईल अशी स्थिती नाही. आजकाल तर इतिहासात मनमानी करत नकोसा वाटणारा इतिहास पुसून टाकायची परंपरा निर्माण झाली आहे. इतिहासातून खोटे समाधान शोधण्यासाठी इतिहास बदलण्यात कोणता इतिहास राहील? त्यात मिथकांना काटेकोरपणे वगळत अथवा त्यांची नि:पक्ष चिकित्सा करत तटस्थ इतिहास मांडायची आपल्या इतिहासकारांना मुळात सवयच नाही. दरबारी भाटांनी लिहिलेल्या प्रशस्ती, त्यातील अतिशयोक्ती किंवा पुराणामधील पक्षपाती वर्णने हीच आपल्या इतिहासाचे मुख्य साधने मानले गेली आहेत. उत्खनीत इतिहासाची आकलने इतिहासकार कोणत्या स्कूलचा आहे. त्यावर अवलंबून असल्याने राजकीय अथवा धार्मिक अहंभावातून केली जाणारी आकलने खरे तर इतिहासाचा भाग बनू शकत नसली तरी आपले हे दुर्दैव आहे की नेमकी तीच पक्षपाती आकलने आमच्या इतिहासाचा भाग बनतात. लबाड्या-खोटेपणा हा दुर्गुणही अनेक इतिहासकारांनी दाखवल्यामुळे भारतीय इतिहासाची अपरंपार हानी झालेली आहे.

शिवाय आपला जोही काही इतिहास लिहिला गेलेला आहे तो प्रामुख्याने राजकीय (राजा-महाराजांचा) आणि धार्मिक (आणि तोही एकांगी) स्वरूपाचा आहे. यात सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास वगळला गेलेला असल्याचे अथवा दुर्लक्षित ठेवल्याचे आपल्या लक्षात येईल. भारतातील असंख्य समाजघटक इतिहास-दुर्लक्षित ठेवले गेले असल्याने आता प्रत्येक समाज आपापला इतिहास लिहीत आपापली पाळेमुळे शोधण्याच्या प्रयत्नांना लागलेले आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचा इतिहास समग्रपणे आणि प्रामाणिकपणे जातीय अथवा धार्मिक भेदाभेद न करता लिहिला पाहिजे हेच आजवर भारतीय इतिहासकारांना उमगलेले नाही. त्यामुळे झालेय असे की, ज्या ज्या जाती आपापला इतिहास शोधतात तोही अहंभाव आणि उदात्तीकरण आणि जमेल तेवढा खोटेपणा करत असल्याने त्यांचे प्रयत्नही इतिहासाचे अवमूल्यन करत जातात.

वैदिक धर्मीय इतिहासकार आजही आपली पाळेमुळे शोधत आहेत. वैदिक आर्य हे मूळचे आर्क्टिक प्रदेशातील या प्रतिपादनापासून वैदिक आर्य हे भारतातीलच हरयाणातील अशी वाटचाल करत सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्यच होते हे ठसवण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे. त्यासाठी अगदी जनुकीय शास्त्राचे निर्वाळेही धुडकावून लावत शास्त्राचाही दुरुपयोग केला जात आहे. त्याचवेळी दाक्षिणात्य इतिहासकार “सिंधू संस्कृतीचे निर्माते द्रविडच आणि आक्रमक आर्यांमुळे त्यांचे विस्थापन दक्षिणेत झाले.” असे प्रतिपादन हिरिरीने तर करतातच, पण सिंधू मुद्रांमध्ये प्राचीन तमिळ भाषा शोधात असतात. थोडक्यात द्रविड अस्मितेला पाठिंबा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. इतिहास येथेही असत्याच्या दलदलीत अडकतो. दक्षिण आणि उत्तर भारत यातील सांस्कृतिक संघर्षाची कारणे इतिहासात दडली आहेत ती अशी.

हे झाले उत्खनीत इतिहासाचे. लिखित इतिहासाचे कमी धिंडवडे निघालेले नाहीत. चाणक्यासारखे काल्पनिक पात्र “ब्राह्मण” असल्याचे आमच्या इतिहासकारांना माहीत असते, पण अखिल भारताला एका सूत्रात बांधणारा चंद्रगुप्त, जो इतिहासात खरेच होऊन गेला, त्याच्या पाळामुळाबद्दल मात्र घोर अज्ञान असते. मग जो-तो इतिहासकार आपापल्या सोयीने त्याला आपापल्या जातींशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. वैदिक इतिहासकारांचा सर्वस्वी भर असतो तो प्रत्येक काळात सर्व समाज वैदिक स्मृत्यांनुसार आचरण करत होता हे सांगण्याचा, मग प्रत्यक्षातील समाजजीवन कितीही विपरीत का असेना. वैदिक प्रभुसत्ता प्रत्येक काळात होती हे अनैतिहासिक विधान वारंवार सांगत तीच काल्पनिक का होईना, प्रभुसत्ता आजही निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. हिंदूंचा (ज्यांना वैदिक धर्मी शुद्र म्हणतात ते) इतिहास तर आजही दुर्लक्षित आहे. पण मुस्लीम आक्रमणांचा इतिहास लिहिताना वैदिकवादी इतिहासकारांच्या कल्पनाशक्तीला उधाण येत असल्यास आश्चर्य नाही. कम्युनिस्ट इतिहासकार आणि बहुजनवादी म्हणवणारे इतिहासकारही याच प्रवृत्तीचे बळी असल्याने एकच इतिहास परस्परविरोधी पद्धतीने समोर येतो हे आपले “इतिहास वास्तव” आहे.

आपण जेव्हा राष्ट्र म्हणतो तेव्हा राष्ट्राचे अविभाज्य असणारे काश्मीर, उत्तर-पूर्वेतील राज्ये यांचाही समग्र इतिहास असावा आणि तो राष्ट्रभावना वाढण्यासाठी आणि एकमेकांना समजावून घेण्यासाठी देशभर पसरवावा ही भावना तर नाहीच. त्याचे राष्ट्र-सामाजिक दुष्परिणाम आपल्या डोळ्यांसमोर आहेत.

भारतातील बहुतेक सामाजिक संघर्षांचे मूळ कारण इतिहासच आहे. आपल्याला फार शौर्याचा इतिहास आहे असे अज्ञानाने मानणारे समाज आणि आपल्याला इतिहासात कसलेही स्थानच नव्हते की काय, असे आक्रोशत विचारणारा बहुसंख्य समाज यातील संघर्ष कोणत्या ना कोणत्या रूपाने व्यक्त होत सामाजिक विभाजनाला हातभार लावत जातो. खरे तर इतिहास नाही असा कोणताही समाज नाही. सर्वांचाच इतिहास सतत उज्ज्वल असेल असेही नाही. उतार-चढाव येतच असतात. पण अवनतीचे दर्शन कोणाला नको असते. खोटी असली तरी अस्मिता मात्र हवी असते. अस्मितांच्या दलदलीत देश रुतला आहे. तो कसा त्यातून बाहेर निघेल आणि वास्तव इतिहास, तोही समग्रपणे कसा लिहिला जाईल आणि लोकांनाही तो तसाच इतिहाससाक्षर होत वाचायची सवय लावली जाईल यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.

भारतात इतिहास अनेकदा सामाजिक संघर्षाचे, वादांचे आणि कधी हिंसेचे विषय बनला आहे. वर्चस्ववाद, श्रेष्ठतावाद आणि तो गाजवण्यासाठी प्रसंगी खोटारडेपणा करत कोणा समाज अथवा ऐतिहासिक मानकांची बदनामी केल्याच्या असंख्य घटना भारतात प्रत्यही होत असतात. इतिहास हा कलह निर्माण करण्यासाठी नसतो, तर आपले जे असेल ते गतकाळाचे वास्तव स्वीकारत आणि समजावून घेत भविष्याची दिशा ठरवण्यासाठी असतो. इतिहासाचे गुलाम होणे नाकारत इतिहासाला आम्ही भविष्याकडे जाण्याचा राजमार्ग बनवण्यासाठी काय करू शकतो याचा विचार आपण केलाच पाहिजे!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in