
विशेष
श्री. नरेंद्र मोदी, पंतप्रधान
आज २५ डिसेंबर. हा आपल्या सर्वांसाठी खूप विशेष दिवस आहे. आपला देश, आपले लाडके माजी पंतप्रधान दिवंगत श्री. अटलबिहारी वाजपेयीजी यांची १००वी जयंती साजरी करत आहे. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे मुत्सद्दी राजनीतिज्ञ म्हणून ते आजही अगणित लोकांना प्रेरणा देत असतात.
एकविसाव्या शतकात प्रवेश करताना भारताचे स्थित्यंतर घडवून आणणारे शिल्पकार म्हणून, आपला देश अटलजींप्रति सदैव कृतज्ञ राहील. पंतप्रधान म्हणून त्यांनी १९९८ मध्ये शपथ घेतली तेव्हा आपला देश राजकीय अस्थिरतेच्या गर्तेतून बाहेर पडत होता. सुमारे नऊ वर्षांत आपण चार लोकसभा निवडणुका पाहिल्या होत्या. भारतातील जनतेचा संयम सुटत चालला होता आणि सत्तेवर येणारी सरकारे कसा कारभार करतील याबाबत लोक साशंक होते. अटलजींनीच स्थिर आणि प्रभावी राज्य कारभार देऊन हा प्रवाह उलट दिशेने वळवत परिस्थिती अनुकूलपणे पालटवली. अटलजी स्वतः सामान्य, पण सत्शील कुटुंबातून आले असल्यामुळे, सामान्य नागरिकांना करावा लागणारा संघर्ष आणि परिणामकारक राज्य कारभारातून घडवून आणता येऊ शकणाऱ्या परिवर्तनाची ताकद ते जाणून होते.
आपल्या सभोवतालच्या अनेक क्षेत्रांमध्ये अटलजींच्या नेतृत्वाचा दीर्घकालीन प्रभाव दिसून येतो. त्यांच्या कारकीर्दीत, भारताने माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि संपर्क व्यवस्थेच्या जगात मोठी झेप घेतली. अतिशय धडाडीची युवाशक्ती लाभलेल्या आपल्यासारख्या देशासाठी हे विशेष महत्त्वाचे होते. अटलजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने, सामान्य नागरिकांना तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा पहिला गंभीर, मनापासून प्रयत्न केला. हे करताना, सोबत भारताला एकत्र जोडण्याची, जवळ आणण्याची दूरदृष्टी होती. आजही, अनेक जण भारतातील मुख्य ठिकाणे चहू दिशांनी जोडणाऱ्या सुवर्ण चतुष्कोन या महामार्ग प्रकल्पाची आठवण काढतात. पंतप्रधान ग्राम सडक योजनेसारख्या उपक्रमांद्वारे स्थानिक दळणवळण वाढवण्याचे वाजपेयी सरकारचे प्रयत्नही तितकेच उल्लेखनीय होते. त्याचप्रमाणे, त्यांच्या सरकारने दिल्ली मेट्रोसाठी व्यापक आणि विस्तृत काम करून दिल्ली मेट्रोच्या माध्यमातून दळणवळण व्यवस्थेला, वाहतुकीला चालना दिली. दिल्ली मेट्रो प्रकल्प आज जागतिक दर्जाचा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून जगात वाखाणला जातो. अशा प्रकारे, वाजपेयी सरकारने केवळ आर्थिक विकासालाच चालना दिली असे नाही, तर दूर दूरपर्यंत पसरलेल्या प्रदेशांना जवळ आणले. देशाची एकता आणि एकात्मता वाढवली.
सामाजिक क्षेत्राचा विचार करायचा झाला तर सर्व शिक्षा अभियान हा उपक्रम, अटलजींनी कशा प्रकारे एका अशा आधुनिक भारताची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिले होते जिथे देशातील सर्वांना विशेषतः गरीब आणि वंचित घटकांना आधुनिक शिक्षण उपलब्ध असेल, ते अधोरेखित करतो. त्याचवेळी त्यांच्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करून भारताच्या आर्थिक उत्थानाचा पाया रचला जी अर्थव्यवस्था अनेक दशकांपासून घराणेशाहीला प्रोत्साहन देणाऱ्या आर्थिक तत्त्वज्ञानाच्या मार्गावर चालल्यामुळे ठप्प झाली होती.
वाजपेयीजींच्या नेतृत्वाचा दाखला १९९८ च्या उन्हाळ्यात घडलेल्या घटनेतून पाहायला मिळतो. त्यांचे सरकार नुकतेच सत्तेवर आले होते आणि ११ मे रोजी भारताने ‘ऑपरेशन शक्ती’ या नावाने ओळखली जाणारी पोखरण अणुचाचणी केली. या अणुचाचणीने भारताच्या वैज्ञानिक समुदायाच्या सामर्थ्याची वेगळी ओळख जगासमोर आणली. भारताने अणुचाचणी केल्याने संपूर्ण जग थक्क झाले आणि त्याचवेळी काही देशांनी याबद्दल विनाकारण आपल्या संतापाचे देखील प्रदर्शन केले. यावेळी एखाद्या सामान्य नेत्याने कच खाल्ली असती, पण अटलजी हे वेगळ्या मातीतून घडलेले नेते होते. पुढे काय झाले? भारत खंबीर राहिला आणि दोन दिवसांनी १३ मे रोजी आणखी चाचण्या करण्याचे आदेश देत सरकारने आपला निर्धार दाखवून दिला. ११ मे रोजी झालेल्या चाचण्यांनी वैज्ञानिक कौशल्याचे दर्शन घडवले, तर १३ मे रोजी केलेल्या चाचण्यांनी खऱ्या नेतृत्वाचे दर्शन घडवले. हा संपूर्ण जगाला दिलेला एक संदेश होता की, आता ते दिवस मागे पडले आहेत ज्यावेळी भारत कोणत्याही इशाऱ्याखाली किंवा दबावाखाली येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही तत्कालीन वाजपेयी सरकार, आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या भारताच्या अधिकाराबाबत आणि त्याच वेळी जागतिक शांततेचा भारत खंदा पुरस्कर्ता असल्याच्या आपल्या भूमिकेबाबत ठाम राहिले.
भारतीय लोकशाहीचे अटलजींना ज्ञान होते आणि ती अधिक भक्कम करायला हवी, याची त्यांना जाणीव होती. भारतीय राजकारणातील आघाड्यांची व्याख्या बदलणाऱ्या रालोआचे अध्यक्षपद अटलजींनी भूषवले. त्यांनी लोकांना एकत्र आणले आणि रालोआला विकासाचे, राष्ट्रीय प्रगतीचे आणि प्रादेशिक महत्त्वाकांक्षांचे सामर्थ्य बनवले. त्यांच्या राजकीय प्रवासातून त्यांची संसदीय प्रतिभा दिसून येते. मूठभर खासदार असलेल्या पक्षाचे ते सदस्य होते, पण त्यांचे शब्द त्या काळात अतिशक्तिमान असलेल्या काँग्रेसच्या सामर्थ्याला हादरवण्यासाठी पुरेसे होते. एक पंतप्रधान म्हणून त्यांनी विरोधकांच्या टीकेला आपल्या शैलीने आणि विद्वत्तापूर्ण संवादांनी बोथट केले. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा मोठा काळ त्यांनी विरोधी बाकांवर व्यतीत केला होता, पण त्यांनी कधीही कोणा विरोधात मनात कडवटपणा ठेवला नाही. काँग्रेसने त्यांना गद्दार असे संबोधण्यापर्यंतची खालच्या पातळीची टीका केल्यावरही त्यांनी संयम सोडला नाही.
संधीसाधू डावपेचांचा वापर करून सत्ता मिळवण्याची हाव त्यांना कधीही नव्हती. १९९६ मध्ये घोडेबाजार आणि घाणेरड्या राजकारणाच्या मार्गावर चालण्यापेक्षा त्यांनी राजीनामा देणे योग्य मानले. १९९९ मध्ये केवळ एका मताने त्यांच्या सरकारचा पराभव झाला. अशा प्रकारच्या अनैतिक राजकारणाला आव्हान देण्याचा सल्ला त्यांना अनेकांनी दिला, मात्र त्यांनी नियमांना अनुसरून वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. शेवटी जनतेनेच त्यांना भव्य बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर आणले.
ज्यावेळी आपल्या संविधानाच्या रक्षणाच्या बांधिलकीचा विषय येतो त्यावेळी देखील अटलजी सर्वांपेक्षा वरच्या स्थानावर दिसतात. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हौतात्म्याने ते कमालीचे व्यथित झाले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी ते आणीबाणीविरोधी चळवळीचे प्रमुख स्तंभ बनले. आणीबाणीनंतरच्या १९७७ च्या निवणुकांमध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या पक्षाचे (जन संघ) जनता पक्षात विलिनीकरण करण्यासाठी सहमती दर्शवली. त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी हा निर्णय नक्कीच वेदनादायी ठरला असेल, अशी माझी खात्री आहे. पण कोणत्याही परिस्थितीत संविधानाचे रक्षण त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. अटलजींच्या व्यक्तिमत्त्वात भारतीय संस्कृती किती खोलवर रुजलेली होती, याचाही विशेष उल्लेख आपण करायलाच हवा. ते जेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री झाले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभांमध्ये हिंदी भाषेत भाषण करणारे ते पहिले भारतीय नेते ठरले होते. त्यांच्या या कृतीतून भारताचा वारसा आणि अस्मितेबद्दलचा त्यांचा अभिमान दिसून येतो आणि म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या पैलूने जागतिक पटलावर स्वतःचा अमिट ठसाही उमटवला आहे.
अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे कोणालाही सहजपणे आकर्षून घेणारे होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्य आणि अभिव्यक्तीच्या प्रेमाने त्यांचे अवघे जीवन समृद्ध झाले होते. आपल्या जीवन प्रवासात समृद्ध साहित्यकृतींच्या निर्माता असलेल्या या लेखक आणि कवी मनाच्या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखनात शब्दांचा वापर हा प्रेरणा देण्यासाठी, विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी, तर कधी सहवेदना व्यक्त करण्यासाठी केला. त्यांच्या असंख्य काव्यरचनांमध्ये त्यांच्या मनातील संघर्षाचे आणि राष्ट्राविषयीच्या आशांचे प्रतिबिंब उमटलेले दिसते.
भारतीय जनता पक्षाच्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे हे भाग्यच होते की, आम्हाला अटलजींकडून शिकता आले, त्यांच्याशी संवाद साधता आला. भाजपसाठी त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते. त्यावेळी जोरात असलेल्या काँग्रेसला सशक्त पर्याय उभा करणे आणि त्या पर्यायाचे नेतृत्व करणे यातूनच त्यांची थोरवी कळून येते. लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गज सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यांनी पक्षाला त्याच्या स्थापनेपासूनच आकार दिला, खडतर आव्हाने, अपयश आणि विजयाच्या काळात दिशा दाखवली. जेव्हा जेव्हा विचारधारा आणि सत्ता यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली, त्या त्या वेळी त्यांनी कायमच विचारधारेचीच निवड केली. काँग्रेसच्या चष्म्यातून जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा असा जागतिक दृष्टिकोन भारतासाठी शक्य आहे आणि असा जागतिक दृष्टिकोन भारताला लाभदायक ठरू शकतो हे देशाला पटवून देण्यात ते यशस्वी झाले.
त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या आदर्शांची जाणीव जिवंत ठेवण्यासाठी आणि भारतासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला पुन्हा झोकून देऊया. सुशासन, एकता आणि प्रगती या त्यांच्या तत्त्वांना मूर्त रूप देणारा भारत घडवण्याचा आटोकाट प्रयत्न करूया. आपल्या देशाच्या क्षमतेवर असलेला अटलजींचा अढळ विश्वास आपल्याला उच्च ध्येय आणि कठोर परिश्रम करण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे…देत राहील.