
- ग्राहक मंच
- उदय पिंगळे
यूपीआय व्यवहारात विक्रमी वाढ झाली असून, २०२४ मध्ये वर्षभरात १७२ अब्ज व्यवहारांची नोंद झाली आहे. डिजिटल व्यवहार सोपे आणि सुरक्षित असले, तरी त्यात फसवणुकीचेही प्रमाण वाढले आहे. यूपीआय लाईटसारख्या सुविधांमुळे व्यवहार अधिक वेगाने होतात, पण त्यात सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
यूपीआय व्यवहारात सातत्याने वाढ होत असून, सन २०२४ या पूर्ण वर्षभरात १७२ अब्ज व्यवहार झाले आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ४४ टक्के आहे. व्यवहार रक्कम रू. २४७ लाख कोटी होते जे मागील वर्षीच्या तुलनेत ३५ टक्के अधिक आहे. यातील सोयीमुळे व्यवहारात दिवसेंदिवस वाढच होत राहील आणि भविष्यात रोखीने व्यवहार करणाऱ्याचे प्रमाण नगण्य असेल. रोख व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला कदाचित काही प्रमाणात सेवाकर द्यावा लागण्याची शक्यता आहे.
हे व्यवहार सुलभ सुरक्षित आहेत. तसेच त्यात काही धोके आहेत. तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, काही लोक त्याच्याच सहाय्याने त्याचा दुरूपयोग करीत आहेत. त्यासाठी नवनव्या युक्त्या योजित आहेत. त्यामध्ये बोलण्यात गुंतवून ओटीपी मागणे, केवायसी नसल्याने खाते बंद होईल, असे सांगून आधार पॅन मिळवणे, डिजिटल अटक करणे इ. यामध्ये फसणारे केवळ अशिक्षित नाहीत, तर अनेक उच्च विद्याविभूषित आहेत. यासंबंधात सर्वांनीच काय करा आणि काय करू नका, याबाबत जनजागृती केली जात असेल, तरी भामटे त्याच्या एक पाऊल पुढे आहेत.
मग या पद्धतीने व्यवहार करायचे नाहीत का? तर याचे उत्तर ते सावधानतेने करायचे एवढेच आहे. ‘सावध तो सुखी’ हा मंत्र लक्षात ठेवायचा. अलीकडे एक माझ्या बाबतीत असा किस्सा घडला रक्कम अगदीच किरकोळ आहे. पण हे कसं झालं असेल, त्या संबंधात उत्सुकता आहे. १९ फेब्रुवारीला संध्याकाळी पनवेलहून येताना एपीएमसी मार्केट बाहेरील एका फळ विक्रेत्याकडून संध्याकाळी ०६:२५ वाजता मी रू१३०/- ला एक किलो सफरचंद घेतली. त्यानंतर ०६:२९ ला रू १०० देऊन सव्वा किलो द्राक्ष घेतली. यासाठी मी यूपीआय लाईट या वॉलेटचा वापर केला. यामध्ये एका वेळेस अधिकतम रू५००/- चे किरकोळ आणि दिवसभरात एकूण रू ४००/- चे व्यवहार करता येतात. त्यासाठी पिन आवश्यक नसतो. स्कॅन किंवा स्वाईप केल्यावर व्यवहार पूर्ण होतो. वॉलेटमधील शिल्लक रू२००/-च्या खाली गेल्यास ही रक्कम आपोआप बँक खात्यातून टॉपअप केली जाते. हे किरकोळ व्यवहार आपल्याला बँक खात्यात दिसत नाहीत, अॅपमध्ये दिसतात. व्यवहार झाल्याचा एसएमएस बऱ्याच वेळानंतर बहुतेक दुसऱ्या दिवशी येतो. काही वेळा येतही नाही. ग्राहकाच्या दृष्टीने उपयुक्त अशी ही पद्धत याची एका वेळेची अधिकतम मर्यादा रू१०००/- पर्यत आणि वॉलेट अधिकतम मर्यादा रू२०००/- वरून रू५०००/- करण्याचे प्रस्तावित आहे. या व्यवहाराचे संदेश ग्राहकांना ताबडतोब मिळावेत, अशी अपेक्षा आहे.
मी ०६:२५ वाजता ज्यांच्याकडे सफरचंद घेतली त्याला रू १३०/-दिले आणि व्यवहार पूर्ण झाल्याचे स्पीकरवर ऐकले. नंतर द्राक्ष घेतली घरी आलो. त्यांनतर बाहेरगावी गेलो असता, २३ फेब्रुवारीला यूपीआय लाईट मधील झालेले व्यवहार सहज तपासून पाहत असताना तीन व्यवहार दिसून आले, रुपये १३०, ९९ आणि १००. रुपये ९९ वजा झाल्याचा संदेश ०६:२६ मिनिटांनी आला होता. असा कोणत्याही विषम रकमेचा व्यवहार मी केलेला नसल्याने सहज लक्षात आले. ज्या व्यापाऱ्याला मी रू१३०/- दिले त्यालाच ते रू ९९/- गेले आहेत, हे माझ्या लक्षात आले. काय करावे, इतरांना सल्ला देण्याचा कसोटीचा क्षण माझ्यावर आला. मी जवळपास असतो तर चार लोकं घेऊन जाऊन काहीतरी करता आले असते. रक्कम किरकोळ आहे ती विषम संख्येमध्ये नसती, तर कदाचित लक्षात आली नसती. व्यवहार तपशील इतका हुबेहूब आहे की, मीच तो व्यवहार केला असावा असे वाटेल, परंतु मी तो केला नाही हे कसे सिद्ध करणार? म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो असे म्हणतात. नॅशनल सायबर क्राइमच्या पोर्टलच्या १९३० या टोल फ्री क्रमांकाला मी सर्व तपशील देऊन तक्रार केली आहे. तक्रार नोंदवून घेणारी व्यक्ती ती घेण्यास नाखूष होती आणि मला चुकीचा सल्ला देत होती, तरी मी त्यांना तक्रार नोंदवण्याचा आग्रह धरला त्यांनी तक्रार क्रमांक तयार करून मी राहतो तेथील जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार वर्ग केली आहे, अशा आशयाचा संदेश मला २४ फेब्रुवारीला पाठवला आहे. काय होतंय ते पाहू या. मी त्याचा पाठपुरावा करेनच. विक्रेत्याकडे असलेल्या स्कॅनरमधेच काहीतरी गडबड असावी, असा माझा अंदाज आहे. माझ्या परिचयातील अनेक जाणकार व्यक्तींशी बोलून मी त्यांना आवश्यक ती माहिती दिली आहे. यासंदर्भात कोणी अन्य जाणकार मदत करू शकत असल्यास त्याला सर्व तपशील देण्याची माझी तयारी आहे. परिचयातील एका तज्ज्ञाने हे झाले कसे हा मोठा विषय आहे. पण असे होऊ नये, असे वाटत असल्यास काय करावे यासंदर्भात सल्ला दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार,
- यूपीआय लाईट हे वॉलेट गैरसोयीचे वाटत असल्यास हेच नाही, असे कोणतेही वॉलेट अथवा अॅप वापरू नये.
- तरीही वापरायचे असेल, तर एका व्यवहाराची आणि दिवसातील एकूण व्यवहारांची अधिकतम मर्यादा निश्चित करून घ्यावी.
- जेथे-जेथे शक्य असेल तेथे दोन चरणातील पडताळणी करूनच व्यवहार करावेत.
अविश्वसनीय वाटत असली, तरी ही सत्य घटना आहे. तेव्हा सुजाण ग्राहक या दृष्टीने आपण काय करू शकतो, तर अनोळखी ठिकाणी शक्यतो सरसकट स्कॅनर वापरण्याचे टाळावे, तेथे रोखीने व्यवहार करावे. यूपीआय लाईटने एकाच दिवशी अनेक व्यवहार केले असतील आणि त्याचे संदेश आले नसतील, तर त्याच दिवशी तपासावे. एखाद्या व्यवहारासंबंधी तक्रार असल्यास गप्प बसू नये. रक्कम थोडी असेल, तर अनेकांची अशी रक्कम मिळून आपलेच नुकसान होते. तक्रार न केल्यामुळे सर्व काही ठीक असल्याचे समजून तपास यंत्रणा गाफील राहतात. माझ्याकडून मी हे कसे झाले असेल, त्याचा पाठपुरावा करतोय, काही ठोस समजल्यास त्याची माहिती आपल्याला सांगायला आनंद वाटेल.
मुंबई ग्राहक पंचायत
mgpshikshan@gmail.com