जबाबदार कोण ? पाक, चीन की भारत ?

बांगलादेशमध्ये झालेले हिंसक आंदोलन, परागंदा झालेल्या पंतप्रधान शेख हसीना, अस्थिर सरकार, लष्करी राजवट हे सारे नक्कीच अनपेक्षित नाही
जबाबदार कोण ? पाक, चीन की भारत ?
@MEAIndia/ Twitter
Published on

-भावेश ब्राह्मणकर

देश-विदेश

बांगलादेशमध्ये झालेले हिंसक आंदोलन, परागंदा झालेल्या पंतप्रधान शेख हसीना, अस्थिर सरकार, लष्करी राजवट हे सारे नक्कीच अनपेक्षित नाही. गेल्या काही महिन्यांतील आणि दिवसांतील घडामोडींचा नीट अभ्यास केला तर ते अधिकच ठळकपणे स्पष्ट होते. पाकिस्तान व चीनच्या साथीने हे घडवले जात होते, तर बांगलादेश व भारताने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. पाक आणि चीनने जाणीवपूर्वक बांगलादेशची वाताहत घडवून आणली. पण, भारताने 'हाताची घडी तोंडावर बोट' हे धोरण का स्वीकारले?

शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशमध्ये दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व अशा घडामोडी घडल्या. तरुण आणि नागरिकांच्या हिंसक आंदोलनांमुळे पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर थेट मायदेशातून पलायन करण्याची नामुष्की ओढावली. लष्कराकडे सर्व सूत्रे आली आहेत. आता हंगामी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही स्थिती का आणि कशी निर्माण झाली? त्याला कारणीभूत कोण? याचा वेध घेणे अगत्याचे आहे. दक्षिण आशियातील भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये अस्थिर सरकार, असंतोष, हिंसक आंदोलने, हुकूमशाही आणि लष्करी वरचष्मा दिसून येतो. पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, मालदीव, चीन या राष्ट्रांचे भारताशी सख्य नाही. बांगलादेशात गेल्या दोन दशकात लोकशाही बळकटीकरणासाठी ठोस प्रयत्न झाले. मात्र, परवाच्या हिंसाचाराने त्यास तडा गेला आहे. आता तिथे हंगामी सरकार स्थापन होणार असले तरी नजीकच्या काळात लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन नवे सरकार सत्तेत येईल की लष्करी राजवटच असेल हे सांगता येत नाही, १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकारामुळे बांगलादेश नावाचे राष्ट्र जगाच्या पटलावर प्रकट झाले. मात्र, बांगलादेशचे राष्ट्रपिता समजले जाणारे शेख मुजीबूर रहेमान यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची लष्कराने निघृण हत्या केली. पुन्हा बांगलादेश संकटाच्या खाईत गेला. त्यानंतर रहेमान यांची कन्या शेख हसीना यांनी' अवामी लीग' या राजकीय पक्षाच्या माध्यमातून लोकशाही स्थापन करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. अखेर त्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यांच्या विरोधक असलेल्या बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाच्या खालिदा झिया यांनाही सत्तेत येण्याची संधी मिळाली. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून सलग हसीना या पंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात तेथील बेरोजगारी कमी होऊन कापड व्यवसायाला सुगीचे दिवस आले. पण, ही बाब फारशी प्रभावी ठरली नाही. तसेच, या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हसीना यांनी विरोधकांची मुस्कटदाबी केली आणि पारदर्शकपणे सर्व प्रक्रिया पार पाडली नाही, असे गंभीर आरोप झाले. खरे तर तेव्हापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासूनच हसीना यांच्याविषयीच्या असंतोषाने वातावरण तापत होते. त्याचा परिणाम आता आठव्या महिन्यात दिसला एवढेच.

बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील कुटुंबीयांना नोकरीत आरक्षण देण्याचा हसीना यांनी मांडलेला मुद्दा अतिशय कळीचा ठरला. बेरोजगारी, उपासमार, शैक्षणिक प्रश्न, अन्नधान्याची अनुपलब्धता, महागाई आदींमुळेही असंतोष धुमसत होताच. 'जमाते ए इस्लामी' या तेथील संघटनेने विविध माध्यमांतून वातावरण पेटविण्यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, या संघटनेचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'आयएसआय'शी साटेलोटे आहे. म्हणूनच हसीना यांनी या संघटनेवर बंदी घातली. त्यामुळे या संघटनेचे पदाधिकारी आणखीनच आक्रमक झाले. या साऱ्याला चीनचे पाठबळ लाभले. चीनने पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेच्या माध्यमातून बांगलादेशवर नेम धरला. पैसा, शस्त्र, प्रशिक्षण आणि अन्य बाबी चीनने चपखलपणे पुरवल्या. अर्थात हे सारेच छुपे असल्याने उघडपणे त्यावर भाष्य केले जात नाही. पंतप्रधान हसीना यांनी गेल्या महिन्यात भारताचा दौरा केला. हसीना यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध वाढविण्यावर भर दिला. तिस्ता नदीचे पाणी आणि त्यावरील धरण या प्रमुख उद्देशासह अन्य कारणांसाठी त्यांनी यावेळच्या भारत दौऱ्यात गाठीभेटी घेतल्या आणि वाटाघाटीही केल्या. त्यानंतर त्या चीन दौऱ्यावर गेल्या. तिस्ताच्या प्रकल्पासाठी चीननेही बांगलादेशला निधीचे आमिष दाखवले होते. मात्र, हसीना यांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला

नाही. मग चीननेही हसीना यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुढची चाल खेळली. हसीना चीनच्या दौऱ्यावर गेल्या असता चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी हसीना यांना भेट दिली नाही. ही बाब हसीना यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे चीन दौरा अर्धवट सोडून त्या मायदेशी परतल्या. ही बाबही चीनला चांगलीच खटकली. एक इवलासा देश आणि त्याच्या पंतप्रधान आपल्याला वाकुल्या दाखवतात, या विचाराने ड्रॅगन आक्रमक झाला. गेल्या महिन्याभरात जो काही गोंधळ बांगलादेशात माजला किंवा झाला, त्या आगीत चीन आणि पाकिस्तानने सोयीसोयीने तेल टाकले. ही आग कशी भडकेल याची पुरेपूर व्यवस्था केली. यासाठी तेथील विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष, जमाते ए इस्लामी ही संघटना आदींचा अतिशय प्रभावीपणे वापर करून घेतला. अखेर हसीना यांची सत्ता उद्ध्वस्त करण्याचा पाक-चीनचा डाव यशस्वी झाला. कारण, पाकिस्तानला १९७१चा हिशोबही चुकता करायचाच होता.

आता प्रश्न आहे तो बांगलादेशच्या या स्थितीला भारत कसा आणि किती जबाबदार आहे? शेजारी राष्ट्र आणि जवळपास चार हजार किलोमीटरची भूसीमा लागून असल्याने भारताचा बांगलादेशशी घनिष्ट संबंध आहे. जानेवारीपासून बांगलादेशात कुरबुरी सुरू होत्या. मात्र, त्या एवढ्या मोठ्या होतील, याचा अंदाज भारताला आला नाही का? मार्चपासून जूनपर्यंत भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती हे लक्षात घेतले तरी जूनमध्ये नवे आणि तेच मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरही बांगलादेशातील वातावरणाची फारशी दखल घेतली गेली नाही का? भलेही हसीना यांचे सरकार आणि तेथील गुप्तहेर खाते बदलणारी परिस्थिती समजून घेण्यात कमी पडले असतील, पण भारतीय गुप्तहेर काय करत होते? सीमारेषेवरील सुरक्षा दलांना काहीच चाहूल लागली नाही का? भारत आणि बांगलादेशातील व्यापाराचे आकडे सांगतात की, २०२०-२१ मध्ये १०.७८ अब्ज अमेरिकन डॉलर, २०२१-२२ मध्ये १८.१४ तर २०२२-२३ मध्ये १५.९३ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी उलाढाल झाली. म्हणजेच भारतीय व्यापारी, आयात-निर्यातदार, ग्राहक, नोकरदार, अधिकारी हे सारेच कुठे ना कुठे गुंतलेले आहेत. त्यांच्याकडून कुणाला काहीच माहिती मिळाली नाही का? बांगलादेशच्या या स्थितीचा भारताला अंदाज आला नाही की आपण त्याकडे डोळेझाक केली? बांगलादेशातील भारतीय दूतावास आणि त्यातील अधिकारी काय करत होते ? आणि जर भारत सरकारला हे सर्व माहीत होते, असे असेल तर त्यांनी तातडीने हसीना यांच्याशी त्यावर चर्चा का नाही केली? हे सारे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. चीनसारखा कुटील देश भारतविरोधी कारवाया करण्यासाठी भारताच्या शेजारी राष्ट्रांनाच गळाला लावतो आहे. हे माहीत असूनही भारताचे 'हाताची घडी तोंडावर बोट' नक्की काय सांगून जाते? हुकूमशाही आणि लष्करशाहीमध्ये जनतेची ससेहोलपट होते. त्यामुळे लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेला भारत हा बांगलादेशच्या असंतोष ही त्या देशाची अंतर्गत बाब आहे, असे म्हणून गप्प बसू शकतो का? हे सारेच शंकास्पद आहे. जर बांगलादेशात स्थैर्य निर्माण झाले नाही तर त्याचे परिणाम भारतावर होणारच आहेत. रोजगार आणि अन्नाच्या शोधात अनेक लोंढे भारतात दाखल होण्याची भीती आहे. त्यामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होणार नाही का? शिवाय भारताच्या ईशान्येकडील राज्यात असलेल्या फुटीर गटांना आगामी काळात पाक-चीन हे बांगलादेशातून बढावा देणार नाहीत का? पाक आणि चीनने जाणीवपूर्वक बांगलादेशची वाताहत घडवून आणली. पण भारताने जाणते-अजाणतेपणी नक्की काय साध्य केले आहे?

(संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार.)

bhavbrahma@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in