
श्रीलंकेविरुध्द गुरुवारी होणाऱ्या महिलांच्या पहिल्या टी २० सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना यांच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघ श्रीलंकेत दाखल झाला. हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर तिन्ही प्रकारच्या संघाची जबाबदारी देण्यात आली. तिच्या नेतृत्त्वाखाली भारतीय मुली श्रीलंका मोहिम सुरू करणार आहेत. हरमनप्रीतने १२१ टी २० सामन्यांमध्ये दोन हजार ३१९ धावा केलेल्या आहेत. क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारामध्ये मितालीला मागे टाकण्यासाठी तिला फक्त ४६ धावांची गरज आहे. स्मृती मंधानाला टी २० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त २९ धावांची गरज आहे. तिने जर दोन हजार धावा पूर्ण केल्या तर अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरणार आहे. मात्र, तीन टी २० आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश असलेल्या या दौऱ्याला अद्यापपर्यंत प्रसारकच मिळालेला नसल्याचे वृत्त आहे.
श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅशले डिसिल्वा यांनी सांगितले की, कोणत्याही प्रसारकाने या मालिकेचे हक्क घेतलेले नाहीत.