Asia Cup : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! २०२५चा आशिया चषक भारतातच होणार

टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने २०२५च्या अखेरीस भारतातच आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) जाहीर केले.
Asia cup 2025
२०२५चा आशिया चषक भारतातच
Published on

नवी दिल्ली : २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने २०२५च्या अखेरीस भारतातच आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) जाहीर केले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अमेरिका व वेस्ट इंडिज येथे झालेल्या टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. आता २०२६मध्ये भारतात टी-२० विश्वचषक रंगणार आहे. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तयारी व्हावी म्हणून भारतातच आशिया चषक खेळवण्यात येईल, असे एसीसीने जाहीर केले. तसेच २०२७मध्ये दक्षिण आफ्रिका येथे एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने त्यापूर्वी बांगलादेश येथे ५० षटकांच्या स्वरूपात आशिया चषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.

२०२३च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी श्रीलंका व पाकिस्तान येथे संयुक्तपणे आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत भारतानेच जेतेपद मिळवले. दरम्यान, २०२७च्या आशिया चषकातसुद्धा टी-२० प्रमाणे १३ सामन्यांचाच समावेश असेल.

दिवस-रात्र सराव सामना

ऑस्ट्रेलिया दौऱ्याला प्रारंभ होण्यापूर्वी भारतीय संघ दोन दिवसीय प्रकाशझोतातील सराव सामना खेळणार आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. भारतीय संघ नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत ॲडलेड येथे प्रकाशझोतातील कसोटी खेळवण्यात येईल. पर्थ, सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन या अन्य चार ठिकाणी उर्वरित सामने होतील. २६ डिसेंबरपासून रंगणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीची आतापासूनच चर्चा सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in