कराची/नवी दिल्ली : पुरुषांची आशिया कप स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत युनायटेड अरब इमिरेट्समध्ये (यूएई) होणार असल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी शनिवारी जाहीर केले. वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गटातील लढत रविवार १४ सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात असून २१ सप्टेंबरला होणाऱ्या सुपर ४ लढतीत ते दुसऱ्यांदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भारतीय संघ स्पर्धेची सुरुवात १० सप्टेंबरला यूएईविरुद्धच्या लढतीने करणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईतच होण्याची शक्यता आहे.
अ गटात भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान हे संघ आहेत. ब गटात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने १९ सामन्यांच्या स्पर्धेकरिता प्रत्येक संघात १७ सद्यस्यांना परवानगी दिली आहे. स्पर्धेतील सामने हे दुबई आणि अबुधाबी येथे खेळवले जाणार आहेत.
अशा होणार लढती !
भारतीय संघ १० सप्टेंबरला यूएई विरुद्धच्या लढतीने स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात करणार आहे. १४ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेल सामना होईल. १९ सप्टेंबरला भारतासमोर ओमानचे आव्हान असेल. २० सप्टेंबरला बी१ आणि बीर यांच्यात लढत होईल. २१ सप्टेंबरला ए१ आणि ए२ यांच्यात सामना होईल. हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होण्याची दाट शक्यता आहे. २३ सप्टेंबरला ए२ विरुद्ध बी१, २४ सप्टेंबरला ए१ विरुद्ध बी२, २५ सप्टेंबरला ए२ विरुद्ध बी२, २६ सप्टेंबरला ए१ विरुद्ध बी१ आणि २८ सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.