बांगलादेशमध्ये सुरू असलेला आशिया चषक महिला क्रिकेट २०२२ मध्ये मंगळवारी भारताने संयुक्त अरब अमिरातचा (यूएई) १०४ धावांनी पराभव केला. ४५ चेंडूत ७५ धावा करणाऱ्या जेमिमाह रॉड्रिग्जला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले. तिने दुसऱ्यांना हा पुरस्कार पटकाविला. भारतीय संघाने स्पर्धेतील सलामीचे तिन्ही सामने जिंकून विजयाची अनोखी हॅट्ट्रिक लगावली आहे.
विजयासाठी १७९ धावांचा पाठलाग करताना यूएईला २० षट्कात चार बाद ७४ धावांपर्यंतच मजल मारता आली. राजेश्वरी गायकवाडने २० धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स मिळविल्या; तर आठ धावांच्या मोबदल्यात एक विकेट मिळविली. एक बॅट्समन धावचित झाली. यूएईच्या काविषा एगोडागे (५४ चेंडूत नाबाद ३०) आणि खुशी शर्मा (५० चेंडूत २९) यांनाच फक्त दोन आकडी संख्या गाठण्यात यश मिळाले. अन्य फलंदाजांना प्रभाव पाडण्यात अपयश आले.
त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने डावाची सुरुवात निराशाजनक झाली. शभ्भिनेनी मेघना (१२ चेंडूत १०) आणि रिचा घोष (१ चेंडूत ०) या लवकर बाद झाल्या. त्यानंतर पाचव्याच षट्कात दयालन हेमलता (४ चेंडूत २) धावबाद झाली. अवघ्या १९ धावांतच तीन फलंदाज बाद झाल्या. त्यानंतर मग दीप्ती शर्मा (४९ चेंडूत ६४) आणि जेमिमाह यांच्यात (४५ चेंडूत नाबाद ७५) १२९ धावांची दमदार भागीदारी झाली. या दोघींच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षट्कांत पाच गडी गमावत १७८ धावा केल्या.